Monthly Archives: जून 2011

आषाढी एकादशीयात्रा- एक विचार.

आषाढी एकादशीयात्रा- एक विचार.

 आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.

कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात. पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.

पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिरय़ाने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.

निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.

१ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular )

२ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. ( Nature repeats itself )

3   अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार .

Miracle by Nature

काय अर्थ याचा  ?  केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.

पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या

आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते.  कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होवू तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले.

ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. त्यांनी फक्त एक लक्ष्य केंद्रित केले होते. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती वा सती सावित्रीने पती सेवा भक्ती. हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.

पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकून व त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल.

आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची  पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही सर्व बघून ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.

निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम  आणि पुंडलीक-विठ्ठलाची  पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ?  हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.

कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला.  तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा  Ecstasy of Joy  चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला  त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.

निसर्गाच्या  नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब आजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत.

हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां  ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?

(ललित लेख)

घड्याळ

घड्याळ

घड्याळ होते भिंतीवरती

टिक टिक करुन चाले

सतत दिसली चाल काट्यांची

एकाच दिशेने हाले

धावत होता एक तुरु तरु

दुजा हळूच धांवे

छोटा जाड्या मंद असून

पळणे ना ठावे

पळत असती पुढे पुढे

समज देतो काळ-वेळेचा

किती राहील शिलकीमध्ये

प्रवास आपुला जीवनाचा

जीवन चक्रापरि फिरती

घड्याळ्यामधले सारे काटे

जाणीव करुन देती सतत

आपण कोठे अन् जीवन कोठे

(कविता)

एक आदर्श शिक्षिका

एक आदर्श शिक्षिका

डॉ.देशमुख हे आम्हास Physiology  हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन,  वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या.  विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark ”  ठेवलेले असे. प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत आगदीच वेगळी होती. एखादा विषय, त्याची व्याख्या, प्रस्तावना, संदर्भ, चर्चात्मक टिकाटिपनी, सारे ते निरनिराळी पुस्तके काढून बुकमार्कने पान उघडून चक्क वाचून दाखवित. सोप्या, वेगळ्या भाषेत त्यावरचे भाष्य ते केंव्हाच करीत नव्हते. कुण्या विद्यार्थ्याने एखादी शंका विचारली तर त्याचे उत्तर कोणत्या पुस्तकांत कोणत्या Chapter मध्ये आहे, हे ते सांगत.  विद्यार्थाना ते अत्यंत रुक्ष वाटत होते. त्या प्रचंड ज्ञानी प्राध्यापकाकडून तसूभर ज्ञान मुलाना मिळाल्याचे समाधान दिसून आले नाही.

डॉ. मँडम नाडकर्नी मेडीकल कॉलेजमध्ये बालरोग ( Pediatric ) ह्या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून नुकत्याच रुजू झाल्या होत्या. तरुण, तडफदार व्यक्तीमत्व होते. त्या केवळ एका महीन्यांच्या काळांतच विद्यार्थ्यांच्या चहात्या झाल्या. त्यांचे भाषा प्रभूत्व होते. अतिशय सरळ सोप्या आणि साध्या शब्दांत विषय फुलविण्याची विलक्षण कला साध्य असलेली. प्रत्येक विषयाची सुरवात एकदम प्राथमिक स्थरावर जाऊन करीत. विषयच्या मुळापासून समजावण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. कोणताही मुद्दा जोपर्यंत वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षांत येणार नाही, तो पर्यंत सर्व अंगाने त्या तो फुलवित होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी, त्यांची समज, त्यांच्या अंगगुणांची झेप, व तो विषय ग्रहन करतो कां ?  ह्यात त्या बारकाइने लक्ष देत होत्या. चित्र, फोटो, ग्राफ, आलेख, प्रोजक्षन, एखाद्या बालरुग्णाला वर्गात आणून प्रात्यक्षिके दाखवित असे. विषय आगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आकलन झाला किंवा नाही हे तगमगीने जाणण्याचा त्या प्रयत्न करीत असत.

प्रत्येक विद्यार्थाचा नावानिशी परिचय करुन घेत होत्या.

त्या इतर वेळीही  Extra Classes  घेत होत्या. केंव्हाही क्लासेस, केंव्हाही  Laboratory, Wards, Out Patient Department, ह्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्याना बालरोगाविषयी मार्गदर्शन करीत असत. विद्यार्थी देखील त्यांच्याबद्दल सतर्क होते. मिळणारय़ा प्रत्येक क्षणाचा ते उपयाग करुन घेत. ज्या ज्या वेळी जमेल, कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी डॉ. नाडकर्णीचे कोठे लेक्चर आहे याची नोंद ठेवत होता. सर्व विद्यार्थी अटेंड करण्याचा प्रयत्न करीत असे.

विद्यार्थ्यावरचे, शिकवण्यावरचे प्रेम, आपलेपणा, तगमग, ध्यास हे त्यांचे गुणधर्म दिसले. कोठेही राग नाही. तिटकारा नाही. कंटाळा नाही. शिक्षकी व्यवसायातील एक आदर्श व सन्मानित व्यक्तीमत्व.

प्रत्येक शिक्षक  ज्या स्थरावर शिकवण्याचे कार्य करतो, हे त्याचे ज्ञानदान असते. त्या वेळच्या त्या स्थराच्या विद्यार्थ्यासाठी तो ज्ञानानी परिपूर्ण असतो.  विद्यार्थ्याला शिक्षक किती ज्ञानी आहे, ह्याच्याशी कांही घेणे वा देणे नसते. देणारय़ाची क्षमता केवढी ह्यापेक्षा, तो ते ज्ञान विद्यार्थ्यांच्या समज बुद्धीत कसे घालतो, ह्यातच त्या शिक्षकांचे यश असते.

डॉ. देशमुख हे प्रचंड ज्ञानी असले, तरी मला डॉ. मँडम नाडकर्णी खरय़ा ज्ञानदात्री वाटल्या.

(ललित लेख)

लाडक्या नातीस

लाडक्या नातीस

 

जन्मापासूनी बघतो तूला

परि जन्मापूर्विच ओळखले

रोप लावले बागेमध्ये

फूल तयाने दिले

चमकत होती नभांत तेंव्हा

एक चांदणी म्हणूनी

दिवसाही मिळावा सहवास

हीच आशा मनी

तीच चमकती गोरी कांती

तसेच लुकलुकणे

मध्येच बघते मिश्कीलतेने

हासणे रडणे आणि फुलणे

चांदणीचा सहवास होता

केवळ रात्रीसाठी

दिवस उजाडतां निघून गेली

आठवणी ठेवून पाठी

नको जाऊस जरी ही इच्छा

परि जाशील सोडून दुजा घरी

आठवणीसाठा देत जा मजला

दिलासा तोच हे समाघान धरी

(कविता)

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

 संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.

अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचे दगड उचलून ते रेल्वेच्या हेडवायरला नेम धरुन मारीत होते. कुणाचा अचूक नेम लागतो, ह्याची त्यांची चढावोढ लागलेली दिसून येत होती. बहूतेक नेम चुकत होते. परंतु रेल्वेरुळामध्ये लहान लहान खडीचे बरेच दगड होते. ते त्या दगडांचा सर्रास वापर करुन त्या हेडवायरला लक्ष्य करीत होते. त्याच्या दिशेने दगड फेकीत होता. सारा खेळ भयानक होता. तो रेल्वेरुळ मार्गाला घातक देखिल होता.  दूर अंतराहून मी हे सारे बघत होतो. मी बेचैन झालो. त्या मुलांच्या खोडकर खेळण्यावर अंकूश ठेवण्यासाठी जवळपास कुणीही दिसून येत नव्हते. शेवटी आपणच त्या विचित्र खेळाला टोकावे, मुलांना समज द्यावी ह्या उद्देशाने मी उठलो.

मुले थोड्याशा अंतरावर होती. मी दुरुनच ओरडलो.  “ये मुलानो, काय चालले आहे ?, रेल्वे मार्गाचे व हेडवायरचे नुकसान करु नका. जा धरी जा आता. ”    त्यांचे लक्ष माझ्याकडे जाताच त्यानी आपला खेळ बंद केला. मी त्याना हाताने जा म्हणून खुणावत होतो. अचानक त्याच्यातील एकाने पुढे येवून हातातील दगड माझ्याच दिशेने भिरकावला. मी ओरडून त्यांच्यावर रागावलो. परंतु आश्चर्य म्हणजे ती मुले निघून जाण्याऐवजी, सर्वांनीच हाती दगड घेवून ते माझ्याच दिशेने फेकूं लागले. एक अनपेक्षित व भयावह परिस्थिती निर्माण झाली. शेवटी मला माझे वय आणि शक्तिच्या मर्यादा जाणून, मीच तेथून माझा पाय काढता घेतला.

लहान शाळकरी मुले. खेळकर वय. परंतु त्यांच्यामधली विध्वंसक वृत्ती बघुन मी चक्रावून गेलो. असे म्हणतात की प्रेम आणि अहंकार ह्या फक्त दोन स्वभावगुणधर्माचे रोपण हे जन्मापासूनच निसर्ग करीत असतो. इतर गुणधर्म त्यांच्या पासूनच उत्पन्न होत असतात. चांगला स्वभाव, चांगल्या वृत्ती, सद्सदविवेकबुद्धी अशा गुणांची वाढ ह्या प्रेमाच्या बिजामधून होत असते. त्याचप्रमाणे राग लोभ मोह इत्यादी षडरिपूं वा विद्धवंसक वृत्तिंची वाढ ही अहंकार ह्या मुळ स्वभावापासूनच होत जाते. जीवनचक्रामध्ये अत्यंत प्रभावी, परंतु गरजेचे असलेले हे दोन स्वभावगुणधर्म प्रेम व अहंकार होत. ह्या जीवन नाण्याच्या दोन बाजू असतात. खेळातल्या चितपट ह्या संकलपणेप्रमाणे जीवनाचा मार्ग ते आखत असतात. कधी अहंकाराचा तर कधी प्रेमाचा विजय होत असताना आपण बघतो. निसर्गाचे एक वैशिट्य म्हणजे तो प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतीम टप्यावर, प्रेमाचाच विजय नोंदवितो. आजची ही खट्याळ वाटणारी मुलेही निश्चीतच स्वभावानी बदलतील ह्याची मला खात्री वाटते.

(ललित लेख)

मोबदला

मोबदला

एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे

पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने

तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी

कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं

मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत

निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत

भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची

आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं

(कविता)

अट्टाहास ?

अट्टाहास ?

एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास लावणारे व परिस्थितीची जाणीव करण्याची गरज वाटण्यास लावते.

मी परिवाहनच्या बस मधून चाललो होतो. अचानक मला एका कामाची आठवण झाली. करण मी ज्या भागातून चाललो होतो, तेथेच माझे काम होते. आता येईल त्या थांब्यावर आपण उतरुन जावे, हा विचार मनांत आला. त्याच क्षणी माझे लक्ष एका बिल्डींगकडे गेले, जेथे मला जावयाचे होते. समोर  सिग्नल आले म्हणून गाडीचा वेग एकदम मंदावला. आपण ह्या मिळालेल्या परिस्थितीचा उपयोग करुन घ्यावा, ह्या विचाराने मी चटकन चालत्या परंतु कमी वेग झालेल्या बसमधून उडी मारुन उतरण्याचा  प्रयत्याचा प्रयत्न केली. अर्थात दुर्भाग्य माझे.  मला तोल सांभाळता आला नाही. मी पडलो. दुखापत झाली. आणि चार सहा दिवस विश्रांती घ्यावी लागली.

निसर्ग हा महान आहे. कुणाकडून तुम्ही जीतके शिकू शकणार नाही, तीतके जीवनाचे ज्ञान वा तत्वज्ञान तो शिकवत असतो. त्याचा प्रत्येकक्षण आपणास जगायच कस ? ह्याचे मार्गदर्शन करीत असतो. प्रत्येक अनुभव परिपूर्ण असतो. जे त्याबद्दल जागृत असतात, तेच यशस्वी जीवन जगू शकतात. त्याचे कोणतेही मार्गदर्शन दुर्लक्ष केले, तर परिणाम हा वेगळाच होऊ शकतो. ज्याला सर्वसामान्य ‘ भोग भोगणे ‘  असे संबोधून, आपल्या अज्ञानी, भाननिक वागण्यावर पांघरुन टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

मी पूर्वी उड्या मारल्या नव्हत्या कां ? खिडकीतून उडी, झाडावरुन उडी, गच्चीवरुन उडी, सायकलवरुन उडी, डोहांत डूबण्यासाठी उडी, हे सारे आणि असेच करीत भागदौडीत आयुष्याचा मार्ग चालू होता. ह्यातच उडी आणि उडीचा अंदाज, खोली झेपेची छलांग, हे सारे दृष्टीकोण निसर्गानेच तर आम्हास शिकवले होते. ह्या उड्यांच्या खोलांच्या अंदाजामध्ये  सर्वांत महत्वाचे होते ते स्वतःला जाणने की आपली क्षमता किती आहे. शक्ती किती आहे.

निसर्ग तुमच्यामध्ये असलेल्या शक्तीची तुम्हास पूर्ण जाणीव देतो. तशीच ती कशी वाढते वा कमी होते, ह्याचेपण ज्ञान देतो.  बालवय वा तारुण्य वयाप्रमाणे वाढणारय़ा हालचाली जादा शक्तीची निर्मिती दाखवतो. त्याचप्रमाणे वृधत्वाकडे झुकणारय़ा वयांत कमी शक्ती निर्मीती होत असल्याचे सुचवितो. ह्यावेळी तुमच्या शारीरिक गरजाना बंधने पडू लागतात.  वयाप्रमाणे अवयवांचे कार्य मंदावत जाते. त्याचा परिणाम आवडी निवडी कमी होऊ लागतात. समाधानी वृत्ती निर्माण होते. संघर्ष करण्याची क्षमता जाते. जीद्द हाट्ट ह्या बाबी मंदावतात. आयुष्य रेषेच्या मर्यादा समोर दिसू लागतात. जीवनाभोवती एक बंधनाची चौकट निर्माण झाल्याची जाणीव येऊ लागते. जीवनासाठी संघर्षमय धडपड कमी होऊ लागते. जे जसे आहे, जसे मिळते, जसे होते ते मान्य करण्याची वृत्ती निर्माण होते. दुसरय़ाना सहकार्य, प्रेम संबेध ही भावना जागृत होते. निसर्गाचा हा मार्ग तुमच्या उर्वरीत शांततामय जीवन जगण्याच्या संबंधात असतो.

आयुष्याच्या तर मर्यादा तर ठरलेल्या असतात. त्याची जाणीव देखील निसर्ग वृधाप काळांत करुन देत असतो. आपल्या भावनेना लगाम, तो अवयव अशक्त करुनच करतो. तुम्ही निसर्गाला माना व तसे वागा हाच त्याचा योजनाबद्ध संदेश असतो.

हे सारे सर्व सामान्यासाठी. ज्याना जीवनाची चाकोरी चांगल्या त-हेने समजली असते. परंतु दुर्दैवाने कांहीजण निसर्गाचे हे त्तवज्ञान दुर्लक्ष करतात. ते आपल्या पुर्वानुभवानुसार, अहंकारी स्वभावानुसार वा इतर भावनांच्या अहारी जाऊन, निसर्गाच्या सुचना चाकोरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हिशोबाचा मेळ जमत नाही. परिणाम परिस्थिती सुख-दुःखाच्या हेलकाव्यामध्ये जीवन जगण्यास भाग पाडते.

” वय झाल, उड्या मारण्याचे दिवस आता संपले. प्रचंड शारीरिक हालचाली करण्याचा आता काळ राहीला नाही. सावधतेने जगा.  ”  हा संदेश माझ अंतरमन अर्थात निसर्ग देतच होता

ना ?  पण मी ऐकले नाही. होऊन जाईल सहज हे सारे. त्याक्षणाच्या ह्या भावनिक विचारांना मी बळी पडलो. आणि उडी मारताना खाली पडलो.

कशासाठी हे घडले. निसर्गाला हे दाखऊन द्यायचे होते की

” तू स्वतःला जाणून घे. तुझी क्षमता जाण. वयाचा आदर कर. हे जाणने म्हणजे जसा मी कोण आहे हे समजणे. त्याच प्रमाणे   मी ‘   ला  जे शरीराचे कवच मिळालेले आहे ते देखील जाणने. हे होय 

(ललित लेख)

मन तुझे कां गहिवरले ?

मन तुझे कां गहिवरले ?

 

भाळी नसता कुंकंम तुझ्या गे

विरचक्र हे हातीं आले

मरणोत्तर हा किताब मळतां

मन तुझे कां गहिवरले ?

शुर विराची अर्धांगिनी तू

युद्धभूमिवर त्यास धाडीले

ओवाळूनी निरोप देतां

मन तुझे कां गहिवरले ?

देश सेवेत कामी यावे

ब्रिद त्याचे मनी ठसविले

सांगत असतां हेच दुजांना

मन तुझे कां गहिवरले ?

सुर्वणाक्षरीं वाचून गाथा

आदर्शमार्गी पडतील पाऊले

तव रक्ताचे नाते उसळतां

मन तुझे कां गहिवरले ?

(कविता)

एक समाधानी योगदान- —

एक समाधानी योगदान- —

सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता. ” सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. ” त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले. सहजगत्या घडलेले, सकारात्मक दृष्टीकोणातून केलेले एखादे काम, मानसामध्ये ऋणानुबंधाची भावना निर्माण करु शकतात. हे प्रथमच जाणले होते. माणस कांहीही करत नसतात. ईश्वर त्यांच्याकडून करुन घेतो, ह्याची मला त्या क्षणाला जाणीव झाली. छोटीशी कामे आपण करतो. परंतु जेंव्हा त्याची व्याप्ती महान होत जाते, त्यालाच नैसर्गिक योजना म्हणतात. सर्वांच्या चेहरय़ाकडे बघून मला तो ४० वर्षापुर्वीचा काळ आठवला. एक प्रसंग १९७० च्या सुमारास घडला होता. आपल्या प्रलंबीत मागण्या धसास लावण्यासाठी महाराष्ट्र त्रितीय-चतूर्थ कर्मचारय़ानी संप पुकारला. जवळ जवळ ११ दिवस तो संप चालला. एकजुटीचे त्यात दर्शन घडले. बरय़ांच मागण्या मान्य झाल्या. त्या काळांत मी ठाण्याच्या मनोरुग्णालयांत उप प्रमुख (RMO) म्हणून कार्यारत होतो. माझे वरीष्ठ वैद्यकीय अधिक्षक होते. मध्यरात्रीला संप सुरु झाला. संपाची नोटीस आमच्या कार्यालयाला देखील प्राप्त झाली होती. मनोरुग्णालयाचा भव्य परिसर, ५० हून जास्त वार्डस, त्यावेळी रुग्णसंख्या जवळ जवळ २००० होती. कर्मचारी संख्या ७०० च्या वर होती. सर्व व्यवस्थेचा भार फक्त १० आधिकारी व्यक्तीवरच होता. सर्व बाबींची जसे रुग्णांचे जेवण खाण, औषधी ह्या आम्ही कांही कॉंट्र्याक्टर्स नेमुन तातडीने करुन घेतले. परंतु रुग्ण व त्यांतही मनोरुग्ण, म्हणून मणूष्यबळ ही प्राथमिक गरज होती. पोलिस खात्याने आम्हास २५ पोलिस कॉन्सटेबलस व एक इन्स्पेक्टर मदत म्हणून देऊ केले होते. हे सारे बिन अनुभवी तर होतेच, परंतु त्यांचा संबंध मनोरुग्णाशी प्रत्यक्ष येणार असल्यामुळे सर्वजण प्रचंड दबावाखाली वाटले. चांगलेच घाबरलेले होते. इन्स्पेक्टर तर म्हणाले ” आम्हाला चोरट्याना, गुंडांना वठनीवर आणण्यास सांगा. आम्ही सर्व ताकतीने करुं. पण हे मनोरुग्ण आमच्यासाठी भिन्न, अनिश्चीत असल्यामुळे एक प्रकारची भिती व शंका वाटते. तरी आम्ही तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे करुत. ” रुग्णसंख्या, आणि कामाचा व्याप बघतां मणूष्यबळ अत्यंत कमी पडू लागले. एखादी दुर्घटना वेगळाच Turning Point बनु शकेल. ही भिती उत्पन्न झाली. शासनानी आम्हास ज्या गोष्टींची तातडीने गरज लागेल ते करुन घेण्याचे आदेश दिले होते. वरीष्ठांचा सतत संपर्क चालू होता. सर्वात महत्वाची नी तातडीची गरज होती ती मनुष्य बळाची. आम्ही वरीष्ठांशी संपर्क साधला. व त्यांना कमीतकमी १५० लोकांना मदतीसाठी तात्पूरते ( हंगामी ) घेण्याची परवानगी घेतली. हाती वेळ थोडा. मी स्वतः लगेच आनंद नगर, समतानगर, भिमनगर, वर्तक नगर, लोकमान्य नगर ह्या त्या काळातल्या कामगार वस्त्यामध्ये गेलो. २ मनोरुग्णालयासाठी मदत करणारय़ा व्यक्तींची रोजंदारीने गरज असल्याचे कळविले. बघता बघता बातमी सर्वत्र पसरली आणि कामगार स्वयंसेवकाची रांगच लागली. आम्ही त्यावेळी बहूतेकाना मदतीसाठी घेतले. ग्रुप ग्रुप करुन वेग वेगळ्या वॉर्डसाठी नेमले. ठराविक चाकोरीबद्ध व रुग्णांची शारीरिक काळजी घेण्याची जबाबदारी त्याना दिली. सतत मार्गदर्शन करीत गेलो. आधिक्षक स्वतः वरीष्ठांशी व सरकारशी संपासंबंधीत सल्लामसलत व Up-Dated Information and getting guidance ह्यात व्यस्त होते. उप प्रमुख ह्या नात्याने मी व माझे सर्व सहकारी यांनी रुग्णालय, रुग्ण आणि सर्व स्थानीक कामे सांभाळली. अतिशय धावपळीत परंतु सर्व शिस्तशीर तो संपाचा काळ गेला. संप संपला. बरय़ाच मागण्या मान्य झाल्या. त्याच वेळी माझ्या हे लक्षांत आले की संपकाळांत आम्हास जवळ जवळ १२५ बाहेरच्या तरुण कामगारांनी खूप मदत केली होती. एकदम नविन व तथाकथीत मनोरुग्णाच्या अपरिचीत भयानक वातावरणांत हे सर्व लोक आपले जीवन घोक्यांत घालून रात्रंदिवस मनोरुग्णासाठी कष्ट करीत होते. रात्र रात्र जागून काढल्या. जे नियमीत कामगार रुग्णसेवा करीत होते, त्यापेक्षाही तसूभर जास्त सेवा ही नविन मंडळी उत्साहाने करीत असल्याची जाणीव मला झाली होती. त्या वेळी हे काम मजवरच वरिष्ठाकडून सोपविण्यात आले होते. त्यांत संपस्थितीचा सर्व आढावा रिपोर्ट तयार करणे व तो त्वरित संबंधीत अधिकारय़ाना वा सरकारला मिळेल हे बघत होतो. मी स्वतः त्या वेळची संप परिस्थिती, तत्कालीन व्यवस्थापना आणि विषेशकरुन हंगामी आणलेल्या सर्व कामगार संबंधीची अमुल्य मदत कार्य यांचे वर्णन सुद्धा होते. ह्याच वेळी एक महत्वाची नोंद व टिपणी केली गेली. ह्या सर्व हंगामी मदत करणारय़ा कामगाराना त्यांचे इनाम म्हणून शासनांत समावून घ्यावे. मी माझ्या आढावा रिपोर्टच्या प्रति वरिष्ठा बरोबर मंत्रालयांत स्थानिक आमदारामार्फत पाठपुरावा केला. सर्व हंगामी कामगारांचे नशिब चांगले होते. सरकारने स्पेशल नोटीफिकेशन काढले. मनोरुग्णालयांत संपकाळांत मदत करणारय़ा कामगारांना शासकिय नोकरीमध्ये समावून घेण्याचा निर्णय घेण्यांत आला. तसा आदेश आमच्या रुग्णालयास प्राप्त झाला. ज्या कामगारांनी त्या काळांत मदत केली, त्यांची त्वरित वैद्यकीय तपासणी व पाठविलेला नमुना फॉर्म भरुन सादर करण्याचे सांगण्यात आले होते. कामगारांची तपासणी, छाननी. व निवड ही कामे मजवरच सोपवली गेली. आम्ही दोन दिवसांतच सर्व सोपस्कार पुर्ण केले व १०१ हंगामी कामगारांचा अहवाल संबंधीतांकडे पाठविला. थोड्याच दिवसांत सर्वांच्या नेमणूकांचे शासनाचे पत्रक मिळाले. मी एक अत्यंत साधा व दुय्यम दर्जाचा ( त्या वेळी ) वैद्यकीय आधिकारी, परंतु केवळ निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये एकाग्रतेने लक्ष देऊन, एक वेगळीच वातावरण निर्मीती करुं शकलो. कर्मचारय़ांचा संप, मनोरुग्णालयातील सेवा विस्कळीत होणे, प्रचंड संख्येनी असलेले मनोरुग्ण, मणुष्य बळाची आपत्तीजनक गरज, निरनिराळ्या कामगार वस्त्यामधून स्वतःजाऊन बोलावून आणलेले कामगार, त्याच्याकडून घेतलेली सेवा, ३ आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या कामगारांचा शासकीय सेवेत कायम समावेश होण्यासाठी स्थानिक आमदारामार्फत यशस्वी प्रयत्न हे मी माझ्या जीवन प्रवाहांत केंव्हाच विसरणार नाही. हीच ती मनोरुग्णालयामधली चार कामगार वर्ग मंडळी, तो दिवस केंव्हाच विसरु शकत नव्हती, ज्याना मी जाऊन बोलावून कामासाठी नेले होते. त्यांचे आणि अशाच इतर १०१ जणांचे जीवन त्या रुग्णालयाच्या वातावरणात रुजले, फुलले, आणि फळले होते. एक निमित्य वा ईश्वरी हस्तक म्हणा मी फक्त बिया घेतल्या व योग्य जमिनीत पेरल्या. शेवटी झाडे आपल्याच पद्धतीने वाढतात व फोफावतात. त्या १०१ जणांचे रोपण हेच माझे समाधानी योगदान नव्हे कां ?

(ललित लेख)

त्यागवृत्ति

त्यागवृत्ति

जीवनाच्या सांज समयीं

उसंत मिळतां थोडीशी

हिशोब केला स्वकर्माचा

वर्षे गेली होती कशी

दिवसामागून वर्षे गेली

नकळत अशा वेगानें

सुख दुःखाच्या मिश्रणीं

जीवन गेले क्रमाक्रमानें

आज वाटे खंत मनीं

आयुष्य वाया दवडिले

ऐहिक सुखाच्या मागे जातां

हातीं न कांहीं राहीले

‘ घेणे ‘ सारे आपल्यासाठीं

करीत जीवन घालविले

‘ देण्या ‘  मधल्या आनंदाला

मन सदा वंचित राहिले

सुधारुन घे आतां तरी

अनुभवाने चूक आपली

उर्वरित वर्षे जाऊं दे

त्यागवृत्ति मध्यें सगळी

भोगातले सुख कसे ते

क्षणांत येवून क्षणांत जाई

त्यागातील समाधान परि

उशीरा लाभून सदैव राही

(कविता)