Monthly Archives: एप्रिल 2017

मानसिक तणाव

प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.

मानसिक तणाव

(हा लेख क्रमशः आहे )

माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.
अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.
शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.
दोन गोष्टींचा शोध आजतागायत देखील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन.
मनाचे Physicial Existance अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.
मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.
चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर
असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.
याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.
शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले.
पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.
ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.
१) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.
२) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि
३) वैयक्तीक स्वभाव विशेष.
ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.
घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.
घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही “मानसिक तणाव निर्माण करते” ह्या सदरांत मोडत नसते. निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.
म्हणून अत्यंत महत्वाचे – अत्यंत महत्वाचे – म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.

क्रमशः पुढे २ वर चालू –

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !

बालकाच्या बुद्धीचा विकास कसा व केव्हां !

रस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी होती. बालगट म्हणून १ ते ४ वर्षे. त्याना दिले होते चित्रविषय एखादे फळ वा प्राणी काढणे. माझी नांत दोन वर्षाची. तिला कागद पेन दिला की, रेघोट्या काढीत बसते. वाटल की तिला थोडेसे मार्गदर्शन केल की ती एखादे गोलाकार फळ रेखाटू शकेल व त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. मी हा विचार सुनेला सांगीतला. ती बी.एड. करीत होती. तिने लगेच त्याला विरोध केला.
‘ बाबा हे आमच्या शैक्षणिक गृहपाठानुसार चुक आहे. मुल साधारण पांच वर्षाचे होईपर्यंत त्याच्यावर कोणतीही शैक्षणिक संकल्पना लादू नये. आपणास कांहीतरी शिकवले जाते, ह्याची शिशुवयांत त्याला कल्पना होणे हे अपेक्षीत नाही. ते फक्त त्याचे खेळण्याचे, बागडण्याचे, वय. नाचण्याचे, हूंदडण्याचे, गाण्याचे, रडण्याचे, मागण्याचे, हट्ट करण्याचे, वय असते. जसे त्याला वाटत राहील तसे त्याला बागडू द्या. कोणताही ताण, कोणतीही जबाबदारी, कोणतेही त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याचे मानसिक नुकसान करेल. चांगली वा वाईट संकल्पना त्यांत निर्माण होईल. अहं वा न्युनगंड त्याच्यामध्ये उत्पन्न होईल. तुलनात्मक विचारसरणी ही डोकावेल व स्थिर होण्यास मदत होईल. तेंव्हा त्या चिमुकल्या बालवयांत वैचारीक बांधीलकी नको. ‘
ह्याच क्षणी मला शेजारच्या शिक्षीत आजीपण दिसू लागल्या. त्या त्यांच्या नातवाची सतत करमणूक करताना दिसत. त्यांची एक वर्षाची नांत होती.
” चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोनीच्या झाडामागे लपलास कां ” म्हणत असताना ती चिमुकली चंद्राकडे झेपावते. ” Twinkle Twinkle little star ” ऐकताना ताऱ्याच्या चमचमण्याकडे बघत डोळे मिचकावते. फुलाला कुरवाळते, पाळलेल्या कुत्र्याला वा मांजराला गोंजारते, खेळते. आजी नातीला खेळवताना ज्या क्लुप्त्या करीत होती, त्याचे चित्र मी डोळ्यापुढे आणले. चांदोबा कुठे ?, फुल कोठे ?, भू भू कोठे ? हे प्रश्न विचारताना एक वर्षाची नात आपल्या नजरा, चेहरा, वा हात त्या गोष्टीचा वेध घेऊन आजीने पूर्वीच शिकवलेले गृहपाठ व्यक्त करीत त्या परिक्षेंत प्रथम क्रमांकात उतीर्ण झालेली दिसली. तुमच्या समजण्यांत ते त्यांच्यासाठीचे ज्ञान असते. तर बालकासाठी ते त्याची करमणूक असते. हासत खेळत ज्ञानार्जन ते हेच नव्हे का ? कोठे येतो येथे वयाचा, शिक्षणाचा आणि मानसिक तणावाचा संबंध ? एकदा रस्त्याने एक हत्ती चालला होता. आजी म्हणाली बघ बघ हा हत्ती त्याला जय जय कर. नातीने दोन्ही हात जोडून नमन केले. हत्तीचे महाकाय शरीरयष्टी दाखवित त्यातील देवत्वाची संक्लपना सांगत होती.
लहानगीला खेळविताना जे दिसले ते असे. अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं, रुप्याचा वाळा
तान्हा बाळा, तीट लाऊ. चिव चिव ये, दाणा खा, पाणी पी, भूर ऊडून जा. इथ इथ बस रे मोरा- इत्यादी. ती ताई आली, मामा आला, काका आला, बाबा आला, बाळाला भूर घेऊन जाईल. झुकु झुकु झुकु आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. छोटी छोटी गाणी, छोटी छोटी वाक्ये – – हे सारे बालकांच्या बुद्धीला चालना देणारे, वाढ करणारे खाद्यच नव्हे कां ?

एका वैद्यकीय मासिकांत डॉक्टरांच्या शोधाचा प्रबंध वाचण्यांत आला. एका आडीच/तीन वर्षाच्या बालकाला ११ निरनीराळ्या शिकवण्यांत आल्या होत्या. प्रत्येकाचा मेंदू हा कंपुटर प्रमाणे असतो. ( अर्थात खर म्हणजे कंपुटर मेंदू प्रमाणे असतो. ) जन्मताच कोरी पाटी. सभोवताल, परिस्थीती, ह्या माध्यमातून सतत त्यावर लहरीच्या रुपाने आघात होत असतात. ज्ञानेद्रियाच्या प्रत्येक माध्यमातून त्या चेतनांचे स्वरुप मेंदूपर्यंत जावून तो Upload and Fix होत राहतो. त्या चेतनेचे स्वरुप, विश्लेशन, अर्थ, प्रयोजन इत्यादी बाबी प्राथमिक अवस्थेतील मेंदूला समजण्याच्या पलीकडच्या असतात.
आपण देखील एखादी घटना बघीतली, ऐकली तर प्रथम संकलीत करतो. नंतरच तिच्याविषयी अनुमान, माहिती, विचार, मत, उपाय, इत्यादीची यादी समोर येऊन, मेंदू तसे विश्लेषन करीत राहतो. लहान बालकाचे, शिशूचे वा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे तसेच असते. ( ” Grasping is there, Fixing is there immediately. Analysis is later on, when understanding develops ” ) असे पुस्तकातील वाक्य आहे. खर म्हणजे बालकाला काय कळते, काय समजते, काय उमगते, हे प्रश्न जेंव्हां तो बोलण्याची कला जाणून व्यक्त करतो. तेंव्हांच ते आम्हालाही कळू लागते. सत्य मात्र असे की त्याच्या मेंदूच्या ग्रहण शक्तीची
योग्यता सामान्य Normal Brain असेल तर ती जन्मापासूनच सुरु होते. नुकत्याच डेन्मार्क येथे वैद्यकीय शास्त्रातला एक प्रबंध प्रसिद्ध झाला. एक अचंबित करणारे निष्कर्श. तब्बल ६००० गर्भवती स्त्रीयांची व गर्भातील अर्भकांच्या मेंदूची तपासणी अत्यंत अधूनिक तंत्रानी केली गेली. त्या पोटातील बालकांचे विकसीत होणारे मेंदू कार्यक्षमतेमध्येही प्रगत झालेले आढळले. त्यांचे Normal Brain Understanding Inference अर्थात ज्ञानाचा निष्कर्ष हेच सिद्ध करतात की हजारो वर्षापूर्वी महाभारत काळी अभिमन्युची कथा ही देखील तेच सुचित करते. गर्भांत असताना सुभद्रेच्या अर्थात आईच्या माध्यमातून त्याला चक्रयुहाचे ज्ञान प्राप्त झाले होते. व त्या ज्ञानाचा उपयोग पुढे झालेल्या महाभारत युद्धांत त्याने केला. ज्ञान मिळणे, आकलन करणे, व त्याचा उपयोग करणे, ह्या वेळेच्या चक्रांत कदाचित् निरनीराळ्या बाबी असतील. परंतु संपूर्ण चक्र फक्त हेच सुचविते की ही निश्चित घडणारी नैसर्गिक संकल्पना आहे. ईश्वरी कलाकृती आहे.
मुलाला शिक्षण केव्हां द्यावे व तो त्याचा व्यवहारांत उपयोग केव्हां करेल ही बाब भिन्न आहे. परंतु ती अशक्यतेच्या चाकोरीत जात नाही. शिकवताना मुलावर मानसिक तणाव पडू नये ह्याच्याशी जरी सहमती असली तरी ते ज्ञान कशा सोप्या व करमणूक प्रधान माध्यमातून साघ्य करता येते कां हे बघीतले पाहीजे. ज्ञानाचे संकल्पन होत असताना मुलाला त्याची त्या दृष्टीकोणातून मुळीच जाणीव येऊ नये.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

‘मृत्युदंड ‘ प्रक्रियेमधील एक दिलासा !

‘मृत्युदंड ‘ प्रक्रियेमधील एक दिलासा !

नुकतीच बातमी वाचण्यांत आली की बॉम्ब स्फोटामधील तीन आरोपीना न्यायालयाने मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली. एक विचार चक्र मनांत येऊन मी जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयांतील वाचनालयांत गेलो. एका थोर जागतीक मान्यवर लेखकांचे पुस्तक न्यायवैद्यक शास्त्र Medical Jurisprudence घेतले. ते बराच वेळपर्यंत वाचले. मृत्युचे प्रकार Mode of death व त्याचे शरीरावर होणारे परिणाम वाचले. त्यावरच्या टिपणी लिहून घेतल्या.
अनेक प्रकारे मृत्यु घडत असतो. जसे जळणे, बु़डणे, विषप्रयोग, आजार, अपघात, इत्यादी. मृत्युच्या शेवटच्या क्षणी सर्व शरीर शिथील व शांत होण्यापूर्वी होणारा प्रतिकार आणि परिणाम ह्या विषयी माझे लेखन होते. एका प्रकरणांत असलेली टिप्पणी वाचून मी फार चकीत झालो. माझे लक्ष वेधून घेतले गेले. प्रकरण होते लटकावून घडून आणलेला मृत्यु. अर्थात ‘ Death by Hanging. ‘ फाशीमुळे घडणारा मृत्यु – ‘ प्रक्रिया नि परिणाम ‘
कोणत्याही मृत्युच्या घटनेमध्ये शेवटचा क्षण हा भयावह वाटणारा असतो. म्हणून सर्व साधारण व्यक्ती त्याला सामोरे जाताना शरीर व मनाने प्रचंड दबावा खालती असतो. एक प्रकारची तडफड व्यक्त होत असते. वेदना आणि धक्का ( Pain and Shock) हे सर्वाना अनुभव न घेताही ज्ञात असते. व ते एक सत्य आहे. ‘ Death by Hanging ‘
ह्या प्रकरणातील एक वाक्य होते- “Hanging is a painless form of death ” जे सुत्र व स्पष्टीकरण वाचण्यांत आले ते खुपच विस्मयकारक व मजेदार वाटले. फाशीबद्दल प्रचलीत गैरसमजाला छेद देणारे होते. वाईटातील चांगले म्हणतात तसे ते मला समाधान देणारे वाटले.
छताला बांधलेला गळफास व्यक्तीच्या माने भोवती टाकला जातो. एकदम त्याच्या पायाखालील आधार काढून घेतला जातो. व्यक्तीच्या वजनाने तो फास त्याच्या माने भोवती आवळला जातो. ह्या प्रकारांत आवळलेल्या फासामुळे मानेतील मेंदूकडे जाणाऱ्या मोठ्या रक्तवाहिन्या व हवेची नलिका ह्यावर प्रचंड दाब येतो. मेंदूला होणारा रक्त पुरवठा एकदम खंडीत पडतो. ताच क्षणी प्राण वायु ह्याचा पुरवठा एकदम बंद पडतो. हा फक्त कांही सेकंदाचाच अवधी, ज्यांत प्राण वायुचा मेंदुला होणारा पुरवठा खंडीत होतो. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मेंदूच्या मागील मानेजवळच्या भागांत कांही महत्वाचे केंद्रबिंदू असतात. Active brain centers in Medulla Oblongata त्यावरही दबाव पडून त्यांचे कार्य थांबते. शरीरातील मेंदू हा अवयव प्राणवायुसाठी अत्यंत संवेदनशील असतो. (Brain tissue is Very Sensitive for Oxygen lack). त्याकारणाने प्राणवायु (Oxygen) थोडा जरी मिळाला नाही तरी मेंदू आपले कार्य एकदम थांबवितो. मेंदूचे प्रमुख कार्य हे ज्ञानेद्रियाशी संबंधीत असते. संवेदनांची जाणीव त्वरीत थांबते. शरीराला होणारा त्रास, दुःख, वेदना ह्या सर्व भावना क्षणार्धात लोप पावतात. एकदम खुंटीत होतात. व्यक्ती त्या परिस्थितीत, त्या क्षणाला वेदना जाणीवरहीत होतो. त्याच प्रमाणे विचाररहीत होतो. न शारीरिक वेदना ना कोणते विचार अशी भावनाहीन स्थिती होते. फक्त बेशुद्धीच्या वाटेवरचे पाऊल. मृत्युच्या दाराजवळ.

मृत्यु हा शरीरापासून अजून थोडासा दुर असतो. प्रकृतीच्या शारिरीक प्रक्रिया अद्यापी चालू असतात. ज्या दिसतात. धडपड, झटक्याच्या हालचाली, होत असतात. पाय, हात, डोळे, जीभ, वा इतर अवयव ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. बघणाऱ्याला हे सारे क्लेशदायक वा भयावह वाटत असले तरी त्या शेवटच्या १०-१५ मिनीटाच्या धडपडीत हा मृत्युला सामोरे जाणाऱ्या जीवासाठी वेदना, जाणीव विरहीत काळ असतो. हे वैद्यकीय शास्त्र सांगते. म्हणूनच वैद्यकशास्त्रज्ञाने त्या प्रक्रियेला Hanging Painless form of death
संबोधिले आहे.
जर जगाचा इतिहास जर वाचला, मृत्युदंड देण्याची प्रथा पुर्वापार चालत आलेली आहे. शिरच्छेद, उंचावरुन कडेलोट करणे, हत्तीच्या पायी देणे, जाळणे, बंदुकीच्या गोळीने मारणे, दगड बांधून पाण्यांत ढकलने, विष देणे, फाशी देणे इत्यादी. अनेक प्रकारे होते. परंतु सर्व देशानी आजतागायत मृत्युदंड ह्या संकल्पनेसाठी फक्त फासावर लटकावने ह्यास मान्यता दिलेली आहे. कारण ह्यांत मृत्युदंड साधत असतांना, त्या व्यक्तीला मृत्युप्रक्रियेच्या कोणत्याही शारिरीक इजा, वेदना, आथवा जाणीवा होणार नाहीत हे वैद्यक शास्त्राने बघीतले.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मला न पटलेली कथा

मला न पटलेली कथा

अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या कथा आहेत. फक्त आनंद देणाऱ्या, करमणूक करणाऱ्या व काही मधून निती अनितीचा मुलायमा देणाऱ्या वाटतात. त्या फक्त ऐकावयाच्या, बघावयाच्या, असतात. शक्यतो त्याचे रसग्रहण वा तात्पर्य करण्याचा कुणी विचार करु नये.
तरी देखील कांही कथा ऐकताना, प्रसंगाची उकलन करताना, बघताना, मन विचलीत होते. सर्व कथा संग्रह थोर ऋषीमुनी, धर्मपंडीत, विद्वान, यांच्या विचार ज्ञानातून बाहेर आलेला. त्यामुळे त्याला आपल्या सारख्या सामान्यजनानी मान्यता देणे भागच पडते. रामायण कथा मधल्या अनेक कथा ऐकल्या. महान थोर गौतम ऋषीपत्नी आहिल्येची कथा समोर आली. थोडक्यांत जे सार वर्णन केले गेले ते असे. गौतम ऋषी पत्नी पतीवृता साधवी आहिल्यासह आश्रमांत रहात होते. देवलोकीचा राजा इंद्र ह्याची वक्रदृष्टी आहिलेवर पडली. त्याने चंद्राची मदत घेऊन दुष्टपणा करुन आहिल्येला फसविले. तिचा उपभोग घेतला. ऋषीना हे कळताच त्यानी दोघाना शाप दिला. आहिल्या शिळा होऊन पडली. श्रीरामाच्या पदस्पर्शाने ती कालांतरानंतर पावन झाली. कथानक सर्वसाधारणपणे असेच घडू शकते. अनेक प्रसंगात अशा गोष्टी झालेल्या आज तागायत दिसतात. त्यांत वेगळेपणा फारसा नाही. एक बाब मात्र माझ्या वैयक्तीक मनाला खटकली. कथानकांत देवराजा इंद्र याला गोवण्याचा प्रयत्न केला. स्वर्ग मृत्यु पाताळ ही आपली संकल्पना. स्वर्ग हा देवलोक. सर्व ३३ कोटी देवांचे अस्तित्व समजले गेलेले असे विश्व. आम्ही सर्व मृत्युलोकातील मानव. आपणास निसर्गानेविचार विवेक आणि समज ह्याचे वरदान दिलेले आहे. ह्याच्याच क्षमतेने आम्ही सर्व सृष्टीचे विश्वाचे मुल्यमापन करीत असतो. निसर्ग आहे तसाच असतो. प्रत्येक मानव आपल्या क्षमतेनुसार ज्ञान विचारानुसार त्याचे विश्लेशन करतो. ह्यातच निर्माण झाले ते काव्य, ग्रंथ संपदा, ज्ञान सागर. व्यक्ति तितक्या प्रकृती, तितके विचार ह्या सत्य धबधब्यातून अनेक विवीध प्रवाहाचे उगम झाले.
मानवाने देव योनीला सन्मानाचे स्थान दिले. आदर दिला. श्रेष्ठत्व दिले. कारण त्यांच्यामध्ये होती भव्यता, दिव्यता. एक वेगळीच उर्जा शक्ती, निर्मीती व संहार करण्याची क्षमता. ज्याचा विचार मानव करु शकत नाही. ते कार्य करण्याची योग्यता त्याना प्राप्त झालेली आहे. आम्ही देवाना भजतो, पुजा करतो, त्यांचे गोडवे गातो. ते याचसाठी की त्याची आमच्यावर कृपा द्दष्टी व्हावी. आमच्या संसाराचा गाडा व्यवस्थीत चालावा.
देव योनी मधील देवतानी मानवाला नेहमी सहाय्य केलेले आहे. संकटाचे निवारण केले आहे. संकट आणली वा कोणतेही दुष्कृत्य केलेले नाही. म्हणूनच सर्व ३३ कोटी देवता आम्हास आदरणीय आहेत. इंद्र तर ह्या सर्व देवांचा राजा समजला गेला आहे. तो पर्जन्याचा, पाण्याचा अर्थांत सर्व जीवांचा आधिष्ठाता मानला जातो. म्हणूनच सर्व मानव प्राणी त्याला महान आदर देत त्याच्या कृपेसाठी पूजन करतात.
2 अशा महान आदरणीय देवांने पृथ्वीवर येऊन, आपला देव योनीतील अस्थित्व विसरुन, त्यांच्यापेक्षा अत्यंत भिन्न अशा मानव योनीतल एका स्त्रीशी प्रेमचाळे करणे, हे मनास मुळीच पटणारे नाही. हे केंव्हाही शक्य होऊ शकत नाही. कदाचित् येथे १ अहिल्लेचे महात्म दाखविण्याचा विचार असावा, २ इंद्राचे अवमुल्ल्यन करण्याचा उद्देश असावा, ३ श्री. रामचंद्रांचे देवत्व उजळण्याचा प्रकार असावा, अथवा इतर कोणते तरी.
तसेच कित्येक पुराणातील कथा, सत्यता ह्याच्या कल्पनेत टिकत नाहीत असे केंव्हा केंव्हा वाटते. विद्वान व ज्ञानी लोकांनी ह्यावर अभ्यास करुन ह्या कथामध्ये जो विक्षीप्त वाटणारा प्रसंग असेल तो काढून त्या कथांची गोडी कायम ठेवीत दुरुस्त्या सुचवाव्यात. जे चालत आले तसेच चालू द्या. आपण त्यांत बदल करणारे कोण ही भूमिका नसावी. काळ बदलत आहे, जग बदलत आहे, तसाच कथानकामध्ये मनास न पटणारा भाग काढून टाकल्यास सर्व सामान्याना आनंदच वाटेल. मात्र ते करताना अधुनिकतेतील वेगळी विक्षीपता नसावी. ही सद् इच्छा.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

सौंदर्यातील एक दर्शन

सौंदर्यातील एक दर्शन

वयाची पंचाहत्तरी सुरु झाली होती. डोळ्याला चश्मा, कानांत Hearing Aid, तोल सांभाळण्यासाठी हाती काठी घेऊन बँकेत गेलो होतो. दोन महीन्यापासून पेन्शन येणे बंद झाले होते, त्याची चौकशी करावयाची होती. मी सांगितलेल्या टेबलाजवळ जाताच समोर एक तरुण पंचविशीतील मुलगी सेक्क्षनवर होती. माझे तिने हसून स्वागत केले व खुर्चीवर बसण्यास विनविले. काय झाले कुणास ठाऊक. मी त्या मुलीकडे बघतच राहीतो. ती जे सांगत होती त्याकडे माझे लक्ष नव्हते. मी चमत्कारीकपणे तिच्याकडे बघतच राहीलो. मला ती त्यावेळी सौंदर्याचा, प्रतिभेचा, तेजस्वीपणाचा एक जीवंत चेहरा वाटला. माझे मन तेथेच अडकून गेले. एक अप्रतिम सौंदर्य व शरीरबांधकाठी मला आकर्शून गेली. तिचे बोलणे, हालचाली, लकबा, पेहेराव, सारे सारे मनास एकदम प्रफूल्लीत करणारे वाटले. माझे भिरभिरणारे डोळे, थरथरणारी मान, त्या तरुण मुलीच्या तथाकथीत आकर्शकतेमध्ये, सौंदर्यामध्ये, गुंतून गेले. परंतु मला Sense of Orientation अर्थांत सभोवतालच्या व स्वतःच्या परिस्थीतीची जाणीव होती. मला गम्मत वाटली. विचीत्र वाटले. एक मात्र सत्य की तिला बघून अत्यंत आनंद वाटला, समाधान वाटले.
थोडीशी माझ्या कामाची चर्चा झाली. कांही कागदपत्रे मी आणली नव्हती. ती आणण्यास मला सांगितले गेले. मी तेथून निरोप घेतला.
असे कां व्हावे ? जीवनांतील सौंदर्याचा आस्वाद मी आयुष्यांत तर भरपूर घेतला हेता. मग असे हे विक्षीप्त परंतु प्रचंड आनंद देणारे कां वाटावे ?. एक बेचैनी, एक तगमग, एक आशंका, मनांत तुफान निर्माण करुंन गेले.
मी दुसऱ्या दिवशी लागणारी कागदपत्रे घेऊन पून्हा बँकेत गेलो. उत्सुकतेने तिला भेटलो. आज मात्र वेगळेच चित्र डोळ्यासमोर येऊ लागले. मला ती फक्त एक तरुण मुलगी दिसली. साधीसुधी इतर मुलीप्रमाणे. कांही भिन्न नव्हते. न ते कालचे सौंदर्य, न आकर्शन, न मनाला ओढ, ना आनंद. मी तिच्याकडे निरखून बघू लागलो. कालच्या प्रसंगाची उजळणी करुं लागलो. पण मन कोणतेच ठाव घेण्याचे स्विकारु लागले नाही. सारे तेच होते. मी, माझेच डोळे, आणि समोरचे देखील तेच. तीच तरुण मुलगी, तेच सौंदर्य. परंतु आज मजवर कोणतीच जादू झालेली दिसली नाही. कां असे ? कां मी चोविस तासांत मला माझ्या वयाला, विकलांगपणाला ओळख होते. अर्थात काल तर मी फक्त तिच्यातले सौंदर्य, प्रतिभा, तेज टिपले होते. मग आज ते सारे कां नष्ट झालेले वाटले ?
आकर्शन आणि उपभोग ह्या भिन्न गोष्टी आहेत. जेंव्हा भिन्न, तेंव्हा त्याच्याकडे बघण्याचा द्दष्टीकोण देखील वेगळांच असू शकतो. उपभोगाची साधने, फक्त दोनच आहेत. एक शरीर व दुसरे मन. दोन्हीवर ताबा असतो तो विचारांचा, विवेकाचा. शरीराचा विकलांगपणा बघतांच मन त्याची साथ सोडून देते. बुद्धीमधला विवेक वरचढ बनतो. हाच विवेक मनाच्या चंचल स्वभावाला मुरड घालून, शरीराला जगवण्यासाठी साथ देण्यास सरसावतो. तुमच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध तो शरीराला तन्दुरुस्त, आरोग्यवर्धक ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवेकासमोर असतात फक्त दोन मार्ग. त्या निसर्गाचा शोध घेणे. अर्थात ईश्वर सान्निध्य व शरीराला त्याच्याशी एकरुप करण्याचा प्रयत्न करणे.
विकलांग शरीर आणि दुर्बल मन हे कसे करणार. केवळ कल्पनेने ईश्वर अस्तित्वाच्या जाणीवेचा शोध घेणे ह्या समाधानांत आनंद असतो. आनंदात ईश्वरी रुप दडलेले असते. त्याच ईश्वरी रुपांत एकरुप होण्याचा सतत प्रयत्न व्हावा, हेच तुमच्या जीवन मार्गाचे ध्येय असेल.
जीवनाच्या चाकोरीमधले कित्येक प्रसंग असे येत जातात की जेव्हां त्या निसर्गाच्या भवव्यतेचे, दिव्यतेचे स्वरूप आम्हास जाणवते. आम्ही आनंदी, उल्हासीत होतो. काही क्षण तर आम्ही आम्हाला व सभोवतालच्या जगाला पूर्ण विसरून जातो. रिम-झिम पडणाऱ्या पावसांत दिसणारे नयन मनोहर इंद्रधनुष्य, गारांचा पडणाऱ्या पावसात गारा जमा करतानाचा आनंद, प्रचंड पडणाऱ्या धबधब्याचा लयबध्द आवाज, जमीनीवर वेगाने पडणाऱ्या पाण्याचे उडणारे तुषार , समुद्रकिनारी सुर्यास्ताचे देखावे, समुद्राच्या खडकाळ किनारी आदळणाऱ्या पाण्याच्या लाटा, कोकीळेच्या मधूर ताना, मोराचे पसारा फुलवित थुई-थुई नाचणे, फुलांच्या ताटव्यात उमललेली रंगीबेरंगी फुले, जंगलामध्ये स्वैर बागडणारे वन्य प्राणी, उंच पर्वताच्या रांगा, नदीचे संथ वाहणे, सूर्य किरणांमुळे सोनेरी छटा प्राप्त झालेले निरनिराळ्या आकाराचे चमकणारे ढग. एक नाही अनेक-अनेक प्रसंग तुम्ही त्या अप्रतीम निसर्गाच्या अविष्कारामध्ये आनंदाने एकरूप होतात. विचार करा, कसले हे निसर्गाचं दिव्य स्वरूप. हेच तर तुम्हाला मिळालेले परमेश्वराचे दर्शन नव्हे काय? ह्यालाच (Reality of Consciousness) वा सत्याची जाणीव म्हणतात. तसे बघीतले तर आपणास प्रासंगीक वाटणारी नैसर्गीक भव्यता ही सर्व ठीकाणी आणि सदैव असते. फक्त आपल्या दृष्टीची जागृतता असावी.
त्या तरुण मुलीच्या सौंदर्यातील ईश्वरी अंश माझ्या विवेकाने टिपण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच तो क्षणिक होता. त्याच वेळी प्रकाशमान झाला होता. विजेप्रमाणे चमकून माझ्या ह्रदयाला भिडणारा होता. पुन्हा नंतर ती अत्यंत आनंदाची लहर केव्हांच भासली नाही. कारण ईश्वरी जाणीवेचे दर्शन असे क्वचीत अनुभवते.
मी तिच्यांत काय बघीतले ? मला काय हव होत ? ह्याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. कारण ते सौंदर्य, त्या प्रकारचे तेज मला कुणांतही, आगदी तीच्यामध्येही नंतर दिसले नाही.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com