Monthly Archives: डिसेंबर 2012

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ

(ईश्वर निर्मितीला जाणा)

ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितले गेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेक माध्यमे  वैचारिक जडण-घडणामध्ये भाग घेत होते. शाळेत शिक्षकांचे तत्त्वज्ञान व घरांत वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन ह्याचा मारा सतत होत होता. घरामधली नातेमंडळी मित्र – परिवार हे त्या त्या महान तत्त्वाला अनुसरुन वागणाऱ्या आणि इतरांना वागविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे सारे दैनंदिन डोळ्यांदेखत होत होते, घडत होते.   अनेक प्रश्न समोर येत, परंतु ते काळाप्रमाणे, वयाप्रमाणे सोडविले जातील, याची जबरदस्त खूणगाठ मनामध्ये बांधण्यात परिसर, वातावरण व संस्कार यशस्वी झाले होते.

हिरा असा सहज प्राप्त होत नसतो. प्रचंड खोदकाम, श्रम केल्यानंतरच तो हाती लागतो. ह्या विषयीचे  तत्त्वज्ञान मनाला शंभर टक्के पटले होते. श्रम आणि साध्य ह्याचे अतूट नाते मनावर चांगलेच  बिंबले होते. हिऱ्याची तुलना ईश्वरासाठी करताना, जरी ते प्राप्त होण्यासाठी श्रमाची संकल्पना पटली, तरी मन साशंक होत राहिले. कारण श्रमानी हिरे प्राप्त केलेले अनेक दिसले, कळले होते. ईश्वरांचे मात्र तसेच असेल का?  हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचे अस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्र मनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हा ईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटत नव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याची पात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्त झालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय? तो कुणांला आज तागायत तरी दिसला, प्राप्त झाला हे ठामपणे कळले नव्हते. त्याच्या प्राप्तीची जगाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, जागेमध्ये आणि केंव्हाही एक वाक्यता त्यावर  झालेली दिसली नाही. हा एक मात्र प्रखरतेने मान्यता पावलेले तत्वज्ञान दिसून आले की ईश्वर जरी प्रत्यक्ष दिसला भेटला नसला, तरी त्याच्यासंबधी अनुभव मात्र  अनेक थोर व्यक्तीना आलेले आहे. जे त्या ईश्वराचे दिव्य भव्य असे वर्णन केले गेले ते त्यांच्या आत्मिक प्रयत्नामध्ये अनुभवांनी साध्य केले. जे अनुभव सर्व सामान्यांना सहज मिळणार नाही असे अनुभव, अनेक व्यक्तींना आल्याचे ऐकू येते. मात्र जर ते त्या ईश्वरासंबंधीचे अनुभव होत असतील तर ते सर्वत्र परंतु सारखे असे असणारच नाही. ते भिन्नभिन्न असतील

२             व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तसेच तितकेच अनुभव होतील आणि जेथे भिन्नता तेथे अनेक मार्ग वर्णीले जातील.

कोणते तत्वज्ञान मला ह्यातून मिळाले, ईश्वर दर्शनाच्या प्रयत्नाचा शेवट, एक भव्य दिव्य अनुभवाच्या रुपांतच मिळणार. जर मी तसाच अनुभव मला प्राप्त व्हावा ही संकल्पना केली, ध्येय आखले तर ते कदाचित पूर्ण होणार नाही. कारण शेवटी अनुभवांतील भिन्नता, माझ्या ध्येयाआड येईल, त्याच क्षणी मात्र साशंकता मनांत येवू लागते. जर   ‘ फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करा ‘ हा कुणी संदेश दिला, तर मात्र अंधश्रद्धा हीची निर्मीती होईल व ती भरकटत घेवून जाईल. काही तरी ऐकले, काहीतरी वाचले, काही तरी समजणे झाले,  हे ते होईल. केवळ त्या विचारातील भव्यता, दिव्यता मनाचा कोंडमारा करेल. मग ते त्याच विचारांना सत्याची झालर लावून, व्यक्त केले जात असल्याचे होईल. अनिश्चित ध्येय हे महान तत्त्वज्ञानाची वस्त्रे धारण करेल.

मग मी काय करावे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. साधा विचारक आहे. कोणाच्यातरी महान तत्वज्ञानासमोर झुकणारा. त्यांचे विचार मानणारा. कारण त्या त्या व्यक्तीने परिश्रम केलेले असतात. प्रयत्न केलेले असतात. जीवनातील सारे तन, मन, धन, परिश्रम त्याने खर्च केले असते. आपले सर्व आयुष्य त्या संकल्पनेच्याच ध्येयात घातले असते.  हे सारे मी बघीतले असते. त्या ठराविक महान व्यक्तीविषयी मी समजलेलो असेन. मी त्याचे सारे श्रमसाध्य घेऊन, त्याच्याच विचाराने, मार्गदर्शनाने माझा मार्ग निश्चीत करु इच्छितो. मग कोठे चुकले?  एखादा व्यक्ती अ, आ, ई हे शब्द घेवून अभ्यासास सुरुवात करते, प्राथमिक धड्याचा आधार घेत घेत पुढे एखाद्या प्रांतात डॉक्टरेट करते. याचाच अर्थ ती आपले सारे आयुष्य तीच्या ध्येयासाठी पणाला लावते. तीला एक प्रकारची मान्यता मिळते. मला जर तेच हवे असेल, तर माझी वाट त्याच्या प्रमाणेच प्राथमिक पासून शेवटपर्यंत तशाच प्रकारे असेल. सार आयुष्य खर्च होईल. नाही – मी त्याच्या प्राप्त शेवटच्या धाग्याला धरुन पुढे जाऊ इच्छितो. त्याचप्रमाणे प्रयत्नाने त्याला दाद देत, तोच मार्ग पुढे घेवून जाण्याचे ठरवितो. ह्यात माझे प्राथमिक श्रम वाचतात व वेळही. कारण आयुष्य मर्यादेचे आहे.

हा!  थांबा – –  थोडा विचार करा! हेच जीवनाच्या वाटचालीमधले अत्यंत महत्त्वाचे व निर्णयपूर्व वळण असते. तेच तुम्हांला श्रमाकडे अथवा अंधश्रद्धेकडे घेवून जाणारे सिद्ध होईल. कारण यातील गोष्ट आहे की हा त्या महान व्यक्तीचा आपला अनुभव, आपला साक्षात्कार असेल. ह्यासाठीचे हे त्याचे आपले प्रयत्न असतील व त्यासाठी त्यांनी तयार केलेली वाट,  ही देखील त्याचीच असेल. त्याच वाटेवरुन जावून कुणासही खऱ्या अर्थाने काहीच साध्य होणार नाही. त्याचा वैचारिक बांध,  हा त्याच्या मनातून –  नव्हे अंतःकरणातून निर्माण झालेला होता. मन म्हटले की भिन्नता येतेच, हाच तर निसर्गाचा चमत्कार नव्हे का?

3          ईश्वर त्याच्या अस्तित्वाची झलक नेहमीच देत आलेला आहे. मात्र  पूर्वी म्हटल्याप्रमाणे दर्शनाने नव्हे तर अनुभवांनी.

एक प्रसंग आठवतो. – कोणता विचार मी करु इच्छितो. फार बैचेन मनातल्या अवस्थेमध्ये गुरफुटून जात चाललो होतो. एका निवांत जागी  चिंतच करीत बसलो होतो.  अचानक संगीताचे अत्यंत मधुर स्वर ऐकू आले. मन आनंदाने भरुन आले….. ज्याला अत्यानंद……म्हणतात. त्यात तल्लीन व्हावे. तंद्रीत जावे, परिसर, जग  यांना विसरुन जावे. हे सारे  त्या संगीताने केले होते. आनंद, समाधान ज्याला आपण म्हणतो तो सर्व प्राप्त झाला होता. काय हवयं मला आता? येथेच माझे पूर्व संस्कार, पूर्व ज्ञान झालेला वैचारिक मारा, वाचलेले ऐकलेले ईश्वरी दिव्यत्वाचे भव्यतेचे वर्णन बैचेन करु लागले. ईश्वरी दर्शन, साक्षात्कार त्यांच्यात एकरुप होणे ही ज्ञांनाची, ग्रंथांची मार्गदर्शक तत्वे चोहोबाजून मजवर आघात करु लागलो.  प्रयत्न करा, श्रम करुन तुम्हाला हा हिरा प्राप्त होईल. असेच तत्त्वज्ञान. श्रम, तपश्चर्या, भक्ती, विश्वास इत्यादींच्या … आलेल्या ईश्वराला प्राप्त करण्याच्या मार्गाकडे घेऊन जगण्यास उत्सुक होता.

फार बैचेन झालो. नुकताच मिळालेल्या संगीताच्या आनंदात तंद्री लागलेली असताना, विचार आला की त्या संगीताला आपलस करण्यापेक्षा,  त्याला माझ्यातच सामावण्यापेक्षा, मी त्या संगीतातच सामावू इच्छित होतो. ईश्वराने दिलेल्या कांनानी, श्रवणद्रींयांनी संपूर्ण आनंद लूटण्यापेक्षा, माझे चंचल मन, डोळ्याकडे अर्थात दृष्य स्वरुपाकडे झेप  घेण्याचा विचार  करीत होतो. मला आता ते ध्वनी लहरी जे अत्यांनंद देत होते,  ते कुणी निर्माण केले त्याचा शोध घेण्याची इच्छा होऊ लागली. कारण इतका आनंद निर्माण करणारा तो फक्त ईश्वरच असेल ना, त्याला मी बघू इच्छितो. पुन्हा परत बैचेनी. कारण माझी इच्छा, आशा यांची झेप अशीच उंचावत  राहणार.

जे पंचेद्रीये मला निसर्गाने दिलेले आहेत, त्या सर्वांना  त्यांच्या त्यांच्या परी एकरुप होता येईल.  व आनंदाच्या सीमा मिळत राहतील, हीच सैरावैरा धावणाऱ्या मनाची विचार स्थिती. मला प्राप्त पंचेद्रीयांतील एक इंद्रीय ऐकण्याचे साधन, वाद्याचा, ध्वनीचा आस्वाद घेण्याचे इंद्रीय, शब्दांचा झंकार आत्मसात करण्याचे एक अवयव. शब्दांमध्येच उत्कठता असते. ही समज आणि त्याच ईश्वराचे ध्वनी स्वरुप मी माझ्यांत एकरुप करत घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी स्वत: त्या ध्वनी माध्यमांत, अक्षर स्वरुपात एकरुप होण्यास असमर्थ होतो. ती कला, ते ज्ञान मला प्राप्त नव्हते व कुणासही नसले तरी मी त्या ध्वनी स्वरांत  शिरु शकत नव्हतो. अर्थात त्या ध्वनी स्वरांचे  जे स्वरुप ईश्वरी संकल्पनेचे वाटले होते, त्यात म्हणजे त्या विश्वात मिसळून जाऊ शकत नव्हतो. मात्र त्याची दुसरी बाजू ते ध्वनी मी माझ्यात माझ्या देहांत, आत्म्यांत एकरुप करणे शक्य  होते. अर्थात त्यास लागते आनंदाची तंद्री, मग्नता, लय. त्या ध्वनी लहरी ते संगीत ज्याला मी ईश्वरी स्वरुप समजलो होतो.

4            मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ईश्वरी संकल्पना दुरावते हे जाणले तो फक्त प्रयत्न असतो, विचार असतो, आत्मा असतो. मात्र त्या संगीतामध्ये जेव्हा एकरुप होऊन जातो,  स्वत:ला विसरुन जातो, त्याचवेळी ते ईश्वरी सानिध्यात असते. त्याची  उकलन करता येणार नाही, ज्याचे विश्लेषणही करता येणार नाही. ज्या विषयाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती स्थीती ब्रह्मानंदाची Ecstasy of joy म्हणतात , ते हे नव्हे का?

माझ्या तंद्रीमधून मी बाहेर आलो, माझ्या दुसऱ्या अवयवाचा विचार करु लागलो. माझी दृष्टी माझी नजर, माझे बघणे, माझे डोळे हे सारे आतूर असतात. सतत त्या ईश्वराच्या शोध संकल्पनेला गुरफटलेले असतात. माझ्या साऱ्या प्रयत्नांचे ध्येय … फक्त एकच असते. त्या ईश्वराचे दर्शन मिळवणे. त्याला डोळे भरुन बघणे. त्याचे स्वरुप जाणणे आणि तो ईश्वर कोण, कसा हे  विचाराने नजरेसमोर येवू लागते. तो ईश्वर ज्याला नाव दिलेले असते. त्याला रंग रुप, आकार, वेषभूषा, पेहेराव, अयुध्ये अथवा कोणत्यातरी पवित्र वस्तू ज्या संगीतल्या गेल्या आहेत. जसे कमलपुष्प, ओमकार, स्वस्तीक, शंख, इत्यादी. अशाच त्या ईश्वराला, त्याच्या वर्णन केलेल्या दृष्यामध्ये मी माझ्या चक्षुपटलांवर आणू इच्छितो. ग्रंथकारांनी महान थोर संतांनी देखील त्याला खऱ्या अर्थाने बघीतलेले नाही. तो निर्गुण निराकार, सर्वव्यापी, सर्व साक्षी असे अंतीम वर्णन केलेले आहे. आणि हे वर्णन जगातील सर्वच धर्म ग्रंथ मान्य करतात. सगुण, रुप हे फक्त , लक्ष केंद्रीत करण्यासाठी. पंरतु आपण आपली विचारांची हद्द तेथ पर्यंतच नेवून ठेवतो. व त्याला कोणत्यातरी स्वरुपांत दृष्टीपटलावर बघायचा प्रयत्न करतो. हे देखील त्याला ईश्वरानी दिलेल्या पंचेद्रीयातील एक इंद्रीय, ज्याच्या मार्फत हा आपला प्रयत्न असतो. ते दृष्य स्वरुप म्हणून त्याला अंतीम ध्येयामध्ये नेवून ठेवले जाते. त्याचवेळी जीवनाचे ध्येय ईश्वराच्या स्वरुप दर्शनात जावून बसते. त्याच्या लहरीप्रमाणेच त्याच्या दृष्यमय आविष्कारात.  वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे.  सुंदर गुलाबाचे  फुल  बघताना, उंचावरून  पडणाऱ्या  धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या  शीतल चन्द्राकडे  बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा  पिसारा फुललेला  असताना नाच  बघताना,  एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण  स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते,  ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते  तोच ईश्वर नव्हे काय? .  म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल.

५               हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तर परमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोच तर ईश्वर.

ह्यालायच तर आपण ईश्वरी अनुभव म्हणतो. लोक जेव्हा मला ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणतात. सदैव ज्या चित्रांचे, मूर्तीचे आकृतीचे त्यांचे चिंतन असते ते दिसण्याची मनांत प्रचंड आशा असते. त्याचप्रमाणे तशा प्रतिमा दिसू लागतात. आत्मसात होऊ लागतात. जे होते एका परिने समाधानकारक असते. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात. त्याप्रमाणे विचारांच्या रम्य कल्पनेमध्ये व्यक्ती आनंदून जाते. हे चांगले परंतू हेच तो सारे काही साध्य झाले असे धरुन जातो. येथेच अटकतो. सर्वस्व प्राप्त झाले, ह्यात समाधान मिळवतो.  असेच काही ईश्वरी अनुभवाचे देखील असते. पंचेद्रीयांच्याच माध्यमातून त्याला दैवी आविष्कार झाल्याचे वाटू लागते. यात देखील एक मात्र प्रखरतेने  जाणवते. ते म्हणजे जेवढी श्रद्धा जास्त बाळगली असते. जेवढे ईश्वरी विचार गहन झालेले असतात, जेवढी वैचारीक आच ईश्वरी अनुभवाची बाळगलेली असते, तेवढेच त्याच्या देह मनाभोवती

अनुभवाचे चक्र गुंफले जाते.    मला वाटले, मला अनुभवले ह्या दोन टोकांत तो फिरत राहतो. चांगल वागणं, चांगला विचार करणं, चांगलं राहणं हेच ते ईश्वरी गुणधर्म समजतो. त्यांत रममाण होतो. मात्र फक्त चांगलचं म्हणजे ईश्वर ही संकल्पना अयोग्य आहे. हा मानवी संस्कृतीचाही परिणाम आहे. सर्व काही म्हणजेच तर ईश्वर, हे सत्य आहे. मात्र ते चांगल असो वा वाईट असो. फक्त लय, सातत्य, मग्नता आणि त्या गुणधर्मातच सर्व जगाला विसरणे, हेच तर ईश्वरी गुणधर्म ठरतात. पौराणिक कथांमध्ये अनेक दुष्ट, वाईट प्रवृत्तीच्या देखील व्यक्ती, वर्णन केलेल्या आहेत ज्यांना ईश्वरांनी दर्शन दिले, वरदान दिलेले आहेत. ते केवळ त्यांच्या तनमय होणाऱ्या गुणधर्मामुळे. ईश्वर साध्यता ही कोणत्याही वैचारीक चौकटीत बसत नसते. अनुभव, साक्षात्कार ह्या धारणा मात्र वैचारिक जडण घडणांत बंदीस्त होतात.

आपल्याला ज्ञानाच्या साधनेसाठी, निरसर्गाने ठरावीक दालने करुन दिलेले आहेत.  त्याच पद्धतीने आम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. सारे दिलेल्या पंचेद्रीयांच्या चौकटीनुसार असणार. ते आहेत डोळे, कान, नाक, जिव्हा व स्पर्श ज्ञान. मात्र वैचारिक ज्ञानाची झेप प्रचंड दिलेली आहे. पाच इंद्रीयांची चौकट मर्यादीत असते. मात्र सहावे इंद्रीय ज्याला वैचरिक  झेप म्हणतात, ही अमर्याद असते. पंचेद्रीयाच्या मर्यादा आखलेल्या असल्या कारणाने तुमच्या त्या त्या ज्ञानाला मर्यादा आपोआपच पडतात. हे सत्य आहे. विचार मात्र आकाश, विश्व वा सागर ईश्वरी कोठेही जाऊ शकतात. येथेच एक शंका मनांत येवू लागते. पंचेद्रीयामार्फत जे प्राप्त होते ते त्वरीत व समोरच आपल्या देहाशी निगडीत असते. त्यामुळे विश्वास प्राप्त ठरते. दुर्दैवाने व्यक्ती यातच अडकून जाते. त्याचमुळे त्या प्राप्त साधन योजनेच्या मर्यादेमुळे जे काही अवगत होईल ते देखील मर्यादेचे स्वरुप धारण करुनच .

६                         विचारांची झेप, विश्लेषण, तर्क ह्या ज्ञानाच्या  माध्यमाला मर्यादा नसल्यामुळे, त्याचा आविष्कार देखील प्रचंड होऊ शकतो.

आता प्रश्न पडतो तो त्या ईश्वराच्या शोधाचा. मर्यादेचे साधन पंचेद्रीयाच्या माध्यमातून हे शक्य आहे का? सांगितल्या गेलेल्या, वर्णन केले गेलेल्या, सगुणात्मक ईश्वरी रुप हे केव्हाही प्राप्त होणारे नाही. कारण ते झाले विचारांच्या प्रचंड झेपामधून महान व्यक्तीकडून. व्यक्त झालेले वर्णन आहे. एकाचे वर्णन त्याला दुसऱ्याच्या खऱ्या अर्थाने वा आत्मिक स्तरावर दुजारा मिळाल्याचे जाणवला नाही. कारण हे केवळ त्यांचे अनुभव वर्णन असते. मानवी इंद्रियांच्या मर्यादा जाणताना फक्त एकच बाब मनांत ठसते व पटते. ते म्हणजे ईश्वरी अनुभव येतो त्याचा खरा आनंद समाधान होणे, येथे पर्यतच. मात्र हे ही त्यांनाच जे आपल्या प्रयत्नात ते ईश्वरी अनुभव प्राप्त करण्याच्या मार्गावर जात असतात. अनेक  व्यक्ती मी बघीतल्या, त्याचे जीवन चक्र बघीतले, त्या सर्व ईश्वर दर्शन वा अनुभव साक्षात्कार ह्या संकल्पनेतच गुरफटून गेलेल्या आहे. जीवनामधला बराच काळ ते साधनेत व्यतीत करतात.

अनेकांना निराशाच हाती लागलेली जाणवते. त्याचे प्रमुख कारण ही मंडळी कर्मकांडात, नामस्मरणात वा अशाच सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या मार्गात सतत व्यस्त राहतात. आयुष्याचा फार मोठा काळ ते ह्यात खर्च करतात. हे सारे चांगले आहे. समाधान देणारे आहे. त्याच्या मनाला शांतता देणारे असेल. त्याच्याशी सहमती आहे. त्यांनी तसा प्रयत्न करावा. कुणाच्या प्रयत्नाना व योग्य संकल्पनेला मी का विरोध करावा. मला तो अधिकारही नाही व माझी क्षमताही नाही. मात्र स्वअनुभव असा की ह्या सर्व प्रयत्नात शेवटी काहीच निश्चित होत नसते. फक्त समाधानाचा ध्यास केलेल्या प्रयत्नाला यश लाभते, ही केवळ जाणीव. काय करावे मग मी ? प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महान गुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व  निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्य स्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळी त्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास करणे गैर होईल. ते फक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे ?  ह्या चिंतनात मी पडलो.

अचानक मला तेच संगीत तेच चित्र कला, तेच नैसर्गिक दृष्य …..सारे सारे आठवू लागले. ज्या घटनांनी मला प्रचंड समाधान, अत्यानंद दिला. मनाची शांतता त्यात मला दिसली.

एक ईश्वरी अनुभव आल्याचे वाटले. येथेच मनाने एक संकल्प केला.  ईश्वराचे जे काही अस्तित्व असेल ते त्याच्याच केलेल्या सर्व जगात, विश्वात विखूरलेले असेल.  प्रत्यक अणुरेणुमध्ये तो व्याप्त असेल.  हे सारे पटले कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येत गोष्ट, प्रत्येक

७                    सभोवताल हा ईश्वरमय असेल.  तर त्याला त्याच्याच कलाकृतीमध्ये शोध घेणे उचित ठरेल  कलेचा आनंद लूटा कलाराच्या शोधांत पडू नका  हा एक संदेश प्राप्त झाला. कारण ती कला देखील असामान्य आहे. मानव निर्मीतीच्या विचारांच्याही मर्यादेबाहेरची आहे. हीच कला अर्थात हे विश्व ह्याला संपूर्णपणे जाणणे, त्याचा आस्वाद घेणे, त्या कलेत एकरुप होणे हेच तर ईश्वरी सानिध्य असेल. न दिसणाऱ्या ईश्वर प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करण्यापेक्षा, ईश्वर निर्मित सजीव निर्जीव ह्या सर्वांच्या ज्ञान प्राप्तीत, संबंधात एकरुपतेत, जाणीवेमध्येच तो दडला आहे. तेच मिळवण्याचा प्रयत्न व्हावा. असे मला वाटते. कर्म करा म्हणतात,  त्यातच  ईश्वर प्राप्ती आहे हे ऐकले आहे. कर्म अर्थात चांगले मनाला आनंद देणारे, समाधान मिळणारे कर्म कऱणे म्हणजे दैनंदीन व्यहार ईश्वरी कलाकृती निर्मीतीच्या सानीध्यात जाण्याचा एक मार्ग खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला समजण्याचा एक प्रकार. ईश्वरी अनुभव म्हणतात ते हेच नव्हे का ?.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

* तू लपलास गुणांत

*   तू लपलास गुणांत

कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी

वाटे मजला,    तू बसलास लपुनी

इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती

बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती

ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी

ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी

फुलातील गंध,    तल्लीन करी मना

होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना

फळातील रस,    देई मधुर स्वाद

उल्हासी मनाला,    देऊनी आनंद

वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी

देई देहा सुख,    अल्हाद्कारी

रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाण

तू लपलास गुणांत,    तुला शोधणे कठीण

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

 

नामस्मरणाच्या खोलांत

नामस्मरणाच्या खोलांत

जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण  मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे असो. त्यांत मानवी मर्यादा येतीलच. फक्त ईश्वरी तत्त्वच परिपूर्ण असते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही एक वैशिष्ठपूर्ण ईश्वरी निर्मिती असते. कोणतेही कार्य मग ते केवढेही महान असो. जर मानवी मर्यादांच्या क्षमतेमधील असेल तर ते कुणीही करु शकतो. ही नैसर्गिक देणगी आहे. फक्त दुर्भाग्याने हे तत्वज्ञान व्यक्ती समजत नाही. अंगीकारत नाही. तसा त्याचा प्रयत्न होत नसतो.

इतरांचे विचार, इतरांची समज ही तुमच्यासाठी फक्त ‘ मार्गदर्शक ‘ ह्या संकल्पनेंत असावी. एखाद्याचे त्या प्रांतातले यश देखील एक उदाहरण म्हणून असावे. मात्र हाच केवळ एकमेव सत्याचा मार्ग सर्वासाठी असू शकत नाही. जर प्रत्येकजण आपल्यापरी वैशिष्ठपुर्ण आहे, तर व्यक्तीने आपला मार्ग, ध्येय हे स्वतःच्या आत्म्याला साक्षी ठेवितच चेतवावे. कारण ते आन्तरीक सत्य, हेच फक्त त्याच्यासाठी एकमेव सत्य असेल. इतरांसाठी मार्ग दर्शनपर. कदाचित तो मार्ग आगदी त्याच पद्धतीने हाताळता येणे शक्यच नसते. त्यांत कोठेतरी कांहीतरी भिन्नता येणारच.

‘सदैव ईश्वरी नामस्मरण करावे’ हा संदेश माझ्या बुद्धीने, विचारांनी त्याला मान्यता दिली. कां कुणास ठाऊक माझा आत्मा मात्र शासंक होता. कुणाचे नामस्मरण ? कुणी त्याना बघीतले ? कुणी हे सत्य अनुभवले ? व जर हा अनुभव असेल तर हे फक्त त्याचे त्याच्यासाठीचे सत्य असेल. हे नैसर्गिक सत्य कसे असेल. हा एक मार्ग ठरु शकेल. पण पुन्हा तोच मार्ग चालणे केवळ अशक्य. उत्पन्न होणारे अनुभव देखील भिन्न असतील ना ?. जरी ध्येय ( Aim ) हे एकच असले तरी.

पुन्हा प्रश्न उत्पन्न होतो की कोणते ध्येय  ?  ईश्वर दर्शनाचे, अनुभवाचे,  सान्तवनाचे, ईश्वरांत एकरुप होण्यांचे. खुप द्विधा मनस्थीती झाली. ईश्वराने, निसर्गाने मला त्याच्यापासून वेगळे काढले ते कशासाठी ?  पुन्हा त्याच्यांतच मिसळण्यासाठी. एकरुपता तर होतीच की. मग भिन्नता कशासाठी निर्माण केली गेली. निसर्गाचे त्या जीवाचे चक्र पुर्ण करण्यासाठी. हेच ते प्रयोजन. मुल. ते आईच्या  सान्नीध्यांत फार अल्प काळासाठी असते. पोटचा तो गोळा. आईचे एक अंग. तीच्याशी  एक रुप झालेला. वाढत वाढत मातेच्या शरीरामधून वेगळे अस्तित्व निर्माण केले गेलेला. काळाच्या चक्रांत संपुर्ण वेगळा केलेले. आता तर त्याचे सर्व व्यवहार, दैनंदिन अस्तित्व भिन्न होऊन जाते. आपले जीवन स्वतंत्र व आपल्याच पद्धतीने ते जगते. सर्व जीवनाचा खेळ खेळून व्यक्ती बनुन शेवटी विश्रांतीसाठी त्याच ईश्वरी तत्वात विलीन होऊ इच्छीते. हेच त्याचे ध्येय असते. विश्रांति, पुन्हा खेळणे, अर्थांत आता खेळ वेगळा, वातावरण भिन्न. सारेच निराळे.

नामस्मरणाचा उद्देश कोणता ? लयबद्धता (वा मग्नता) आणि आठवण. त्या ईश्वराची आठवण काढीत एका लयबद्धतेमध्ये विलीन होणे. इष्ठ देवतेच्या सतत आठवणीत राहणे. परंतु खोलवर विचार केला तर हे दोन्ही साधणे आवघड नव्हे , अशक्य वाटते.

लयबद्धतेच्या प्रक्रियेंत सर्व सभोवताल, परिस्थिती, स्वतःचे देखील अस्तित्व हे संपूर्ण विसरुन जाण्याचा प्रयत्न असतो. नामस्मरण करीत करीत अशा स्थितीमध्ये जाणे जरुरी असते, जेंव्हा हेच नामस्मरण विसरुन जावे लागते. शब्द जावून विचार, भावना, यांची एक तंद्री लागावी लागते. पुढे तेही विसरुन जावे लागते. सारे कांही जेंव्हा गळून पडते, त्याच वेळी ईश्वरी तत्वांत, अनुभवांत, नितांत आनंदात व्यक्ती पदार्पण करते. मग त्याला सारे विसरावे लागते. सर्वस्व विसरणे हा क्षण सर्व कांही मिळवणे ह्यासाठी ठरतो.

मी शांत बसलो होतो. नामस्मरणाचा प्रयोग चालला होता. एकाग्र होऊन इष्ठ देवतेचे चिंतन करीत होते. नामस्मरण चालू होते. अचानक ते एका मग्नतेत सुटले. तसा मला कविता करण्याचा छंद आहे. कवितेचे शब्द उत्पन्न होण्यासाठी भावनेचा कढ भरुन यावा लागतो. त्याच भवना मग शब्दरुप धारण करतात. कवितेचा जन्म होतो. मी माझ्याच विचारांत बराच वेळ गुरफटून गेलो होतो. भावना, विचार, आणि शब्द यांच्या द्वंद्वांत मग्न झालो होतो. एक काव्य बाहेर पडले. जे मला अत्यानंद देत होते. समाधान देत होते. मनाची शांती खऱ्या अर्थाने लाभली होती. हेच तर मला ईश्वरी दर्शन वाटले. कारण जर ईश्वर कसा व कशांत आहे हे निश्चीत नसेल, तर मग तो मला माझ्याच आन्तरीक विचारांत, भावनेंत, शब्दांत मिळाला असे मी समजतो. ते मिळण्याचा प्रांत कोणताही असेल. पण जर शेवट अत्यानंदांत, समाधानांत, असेल तर ह्यालाच ईश्वरी अनुभवाचे दर्शन समजतो.

नामस्मरण अतिशय चांगले व योग्य. महान व्यक्तीनी सांगितलेला मार्ग. एकदम पटणारा. परंतु अनुभव असा की ती ध्येयाकडे, पुढे घेऊन जाणारी एक पायरी असते. दुर्दैवाने असेही दिसते की व्यक्ती त्याच पायरीवर सतत घुटमळतच राहतो. एखादा घान्याच्या बैलाप्रमाणे. फक्त चकरा मारणारा. कोणताही दुरचा प्रवास न करणारा. जसे पुजाकर्म, आन्हीके इत्यादी. असतात. जे प्रथम पायरी प्रमाणे असतात. त्यांचाच आधार घेऊन पुढे लांब छलांग मारावी लागते. ईश्वरी तत्वांचा शोध घ्यावा लागतो. परंतु हे सहसा होत नाही. व्यक्ती त्याच पायरीवर, त्याच वातावरणात घुटमळत राहतो. अचानक कांही चमत्कार घडेल, वेगळाच मार्ग मिळेल, ईश्वरी अनुभव येईल, ह्या रम्य विचारांत रममान होतो.

अशाने हाती कांहीच लागत नाही. तो मात्र कर्मकांडी, व फक्त नामस्मरण घेणारा असाच राहतो. एकदम अपूर्ण. फक्त अंधश्रद्धावान. जर मार्ग दाखविला गेला तर चालताना मात्र स्वतःत्या आत्म्याला जागृत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण योग्य परंतु लयबद्धतेमधूनच ते विसरावे लागते. अर्थात हे विसरणे दुसऱ्या महान तत्वासाठी. हे विसरणे जाणून, समजून,नसावे. सहज असावे. चिंतनांत, घ्यानधारणेत, समाधी अवस्थेत जाण्यासाठी असावे. एका दालनात शिरलो. तेंव्हा पहीले दालन अपोआप सुटून गेले. त्याची आता त्या क्षणाला आठवण देखील नसावी. न नाम, न नामस्मरण, ना कोणती आठवण, ना कोणता विचार. नामस्मरणाला पर्याय असावा लय, एकाग्रता. आणि ती देखील विसरावयास हवी. आपोआप, सहजपणे.  कशासाठी – तर त्याचे उत्तर नाही. तेथे असेल फक्त नितांत आनंद (  Ecstasy Of Joy ), समाधान, शांतता – – –

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

         

  

                

रक्त आणि रोग निदान

रक्त आणि रोग निदान

 

एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व  क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले.

आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहे. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून सर्व मान्य करावे हे त्यांच्या पचनी पडत नाही.  मुलाच्या वडीलांनी चौकस बुद्धीने मला प्रश्न केला. ”  डॉक्टर तुम्ही रक्ताचा रिपोर्ट बघून कसा तर्क बांधू शकता? रक्ताचा रिपोर्ट हा निदान करण्यासाठी कशी मदत करतो. ”  त्यांचा प्रश्न हा साधा, योग्य व सर्वसाधारण व्यक्तीच्या मनांत येणाऱ्या शंकाच बोलून दाखवणारा होता. अर्थांत वैद्यकीय शास्त्र प्रचंड आहे. ज्या ज्या शक्यतेचे बारकावे आम्ही शिक्षण घेताना शिकलो ते सर्वच त्याना सांगणे शक्य नव्हते. व अयोग्यही होते. त्याना फक्त त्यांचा छोटासा तर्क –”  रक्ताचा रिपोर्ट व निदान ह्याचा कसा संबंध ? ”  आणि ते मला त्याना त्यांच्या भाषेत समजेल ते सांगणे हीच मजसाठी परिक्षा होती.

मी खिडकीवाटे बाहेर बघू लागलो. विचार करीत होतो. अचानक माझे लक्ष्य वेधले गेले ते एका पोलिस गाडी मुळे. एक पोलिस Vane  व्हॉन व कांही पोलीस त्याच्या भोवती उभे होते. त्यांची आपसांत चर्चा चाललेली दिसत होती. अशी पोलिस गाडी पोलिसांसह त्या जागी मी पूर्वी बघीतली नव्हती. आज अचानक ते सारे बघीतले. मी किंचीत हासत त्या मुलाच्या वडीलांना प्रश्न केला.  ” बघीतल ती पोलिसांची गाडी व कांही पोलिस. ते आज अनपेक्षीत असे येथे दिसतात. काय तुमचा तर्क असावा ? ”

ते निरखून बघू लागले. ” मला वाटते जवळपास कांहीतरी घटना घडली असावी. कदाचित् चोरी, मारामारी, आत्महत्या, खून, वा असलेच कांही असावे. ”

”  बरोबर आहे तुमचा तर्क. असेच असते बघा दैनंदिन जीवनाच्या प्रसंगाचे. फायर ब्रिगेडची गाडी जर आली असेल तर तर्क करता येतो की कुठे आग लागली असावी. ऍम्बुलन्स (Ambulance) जर दिसली तर कोणीतरी रुग्ण मदतीच्या आपेक्षेत आहे असे वाटते. शववाहिका  ( HEARSE  )  त्याच वेळी दिसेल, जेंव्हा कुणातरी मृत व्यक्तीसाठी आलेली असेल. क्वचित प्रसंगी जर मिलीटरी वाहन वा सैनिक दिसले तर जवळपास आतंकवादी अथवा शत्रु गटातील कुणीतरी त्या भागांत असावा हा तर्क माणसे काढतात. ह्याचा अर्थ निर्माण झालेली परिस्थितीचे अवलोकन, तर्क, कल्पना ह्याचा अंदाज त्या त्या परिस्थितीला काबूत आणणारी यंत्रणा बघून करता येतो. हा जरी तर्क असला तरी तो त्या कारणाच्या खूपच जवळ नेण्यास मदत करतो.

शरीराच्या आतील कार्यशाळे बद्दल असेच कांहीसे असते. रक्त शरीराचा अत्यंत महत्वाचा प्राथमिक भाग असतो. शक्ती, उर्जा, अन्न, रक्षण, सारे सारे रक्ताच्या मार्फतच होते. अनेक घटक पदार्थ असलेल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी हा एक घटक पदार्थ. रक्षणाची प्राथमिक जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता असते. ज्या पद्धतीचा रोग प्रादुर्भाव ( जंतू मार्फत ) शरीरावर होतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी, त्या रोगाचा प्रतीकार करण्यासाठी रक्तामध्ये त्वरीत बदल होतो. शरीरांत असलेला Reserve Blood stock जो कांही अवयवांत असेल तो रक्त वाहीन्यामध्ये उतरतो. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये त्या त्या रोगाला अनुसरुन त्वरीत वाढ होते. बस त्या ठराविक वाढलेल्या पेशी वा रक्त बदल हा कोणत्या रोगामुळे ते शक्य झाले असावे असा तर्क काढण्यास  मदत करतो.

चोरी, खून, मारामारी, इत्यादी तुम्ही प्रत्यक्ष न बघताच केवळ पोलीसांची गाडी व पोलीस याना बघून जसे अनुमान काढू शकतात, त्याच प्रमाणे रक्त लघवी इत्यादींचे रिपोर्ट आम्हास त्या रोगाचे अप्रत्यक्ष निदान करण्यास मदत करतात.

मुलाच्या वडीलांनी हासत माझ्या तर्काला व निदानाला साथ दिली. मी त्याना लिहून दिलेले   Prescription घेऊन ते औषधी आणण्यासाठी गेले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

       

चांदण्यातील आठवणी

चांदण्यातील आठवणी

हवाच मजला तोच चंद्रमा

तेच नभी चांदणें

गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।

आजीसंगे गच्चीवरती

फुलराण्यांच्या कथा ऐकती

बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।।

गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

फुलले होते यौवन सारे

अंगी झोंबे शितल वारे

पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।।

गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

सगे सोयरे मित्रमंडळी

परसदारी तुळशीजवळी

गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने   ।।३।।

गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

 

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

 

नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.

जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. सारा परिसर सुवर्णमिश्रित दगडांच्या खाणीनी भरलेला. जगातील सर्वांत जास्त खनिज सोन्याचे उत्पादन देणारा हा प्रांत समजला जातो. अतिशय कलात्मक आणि नाविण्यपुर्णतेने वसलेले हे शहर आहे. केवळ शे – दोनशे वर्षाचा इतिहास त्यांच्या वसाहतीचा आहे. थोर जागतिक किर्तीचे नेते नेल्सन मंडेला यांचे वास्तव्य असलेले शहर. त्यानीच द. आफ्रिकेचे प्रथम अध्यक्षपद भूषविलेले होते. जोहानेसबर्ग येथेच भारताचे महान नेते महात्मा गांधीजी यांचे वास्तव्य २१ वर्षे होते. त्यानी गरीब, वर्णभेदामुळे अत्याचार होत असलेल्या जनतेला जाणले. एक लढा दिला. त्यांत ते अशस्वी झाले. पुढे भारतामधील कार्य तर त्याना जागतीक स्थरावर घेऊन गेले. जोहान्सबर्गने गांधीजींची य़ोग्यता, थोरवी जाणली. त्याना अजरामर अशी श्रधांजली अर्पिली.

प्रसंगः-  एक प्रसंग घडला. दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वर्णभेद, उचनीचता अतिशय प्रखरतेने मानली जात असे. एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते. गांधीजी प्रथम वर्गाच्या बोगीमध्ये रीतसर तिकीट काढून बसले होते. गाडीचा तिकीट तपासनीस तेथे आला. त्याने गांधीजीना त्या डब्यामध्ये बसण्यास हरकत घेतली. गांधीजीनी आपल्या जवळचे नियमाप्रमाणे घेतलेले प्रथम वर्गाचे तिकीट दाखविले. तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो वर्णद्वेष्टा इंग्रज होता. तो तरुण गांधीजीवर खेकसला.

.       ” Black passengers are not allowed to sit in this compartment with white persons ”

असे गांधीजीना ब्ल्याक म्हणत, इंडीयन म्हणत, फॉरीनर्स म्हणत आरोप केले. गांधीजी गोऱ्या लोकांच्या सहवासाठी अयोग्य असल्याचे व्यक्त केले. गांधीजीना हे अत्यंत अपमानकारक वाटले. त्यानी त्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. ही वर्ण भेदाची बाब उच्यायुक्ताकडे व त्यावेळच्या सकरारी दरबारांत निदर्शनास आणून देण्याचे सुचविले. त्या उर्मट उद्धट आणि मग्रुर अशा इंग्रज अधिकाऱ्याना जनाची वा मनाची लाज राखली नाही. त्याने गांधीजीना चक्क हात धरुन प्रथम वर्गाच्या डब्यातून खाली उतरुन दिले.

गाधीजीनी Bar-At Law ची पदवी घेतलेली होती. ते साऊथ आफ्रिकेमध्ये २१ वर्षे राहीले. प्रखर देशाभिमान आणि कायद्याचे ज्ञान ह्यामुळे एक वेगळेच व्यक्तीमत्व त्याना प्राप्त झाले होते.

कालाय तस्मै नमः  काळाचा महीमा अगाध असतो. ते सत्य आहे. भारतातील अन्याय, वर्णभेद, उच्य-निचता, असत्य, हिंसक वृती, यांच्या विरोधांत गांधीजीनी प्रचंड झगडा दिला. जगभर शक्तीच्या जोरावर राज्य करणाऱ्या इंग्रजाना अहिंसा व सत्य ह्याच्या महामंत्राने भस्मसांत केले. इंग्रजांची जागतिक स्थरावर माघार होत गेली. हाती कोणतेही शस्त्र न घेतांच त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. गांधीजी महान बनले. त्यांची योग्यता दक्षिण आफ्रिकेतील जनतेने, सरकारने तिव्रतेने जाणली. महात्माजींचा एके काळी त्यांच्याच भूमिवर करण्यांत आलेल्या अपमानाची पश्चातापपूर्ण भरपाई करण्यांत आली. ज्या वयांत गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेंत वर्णभेद व  उच्यनीचतेला आवाहन दिले, त्याच वयातील ( तिशीतील ) त्यांचा पुतळा जोहान्सबर्ग आणि दरबन  ह्या दोन प्रमुख शहरांत उभारला जाऊन त्या चौकांना गांधी चौक  (Gandhi Square.) हे नामकरण करुन सन्मानित केले.

त्यांचा तारुण्यातील , तिशीच्या जवळपासचा पुतळा, तेजःपुंज चेहरा, उंचपुरा मात्र सडसडीत बांधेसुद अंगकाठी व्यक्त होत होता. वकीली पेहेराव घातलेला, दिसत होता. काळा मोठा कोट परिधान केलेला होता. अंगात सुटबुट टाय शर्ट चमकत होते.

आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तारुण्यातील भव्य ब्रांझचा पुतळा बघून भाराऊन गेलो. आमचे डोळे आनंदाने, प्रेमाने, अभिमानाने, आणि आदराने भरुन आले. अश्रु स्वयंस्फूर्तीनेच आपली वाट काढीत होते. मन गहीवरुन आले होते.

आम्ही भारतामध्यें महात्मा गांधीजींचे अनेक ठिकाणी, अनेक जागी भव्य दिव्य असे पुतळे बघीतले आहेत. त्यांच्या महान कर्तृत्वाचा, सत्य आणि अहिंसा यांचा मंत्र देत हे सारे पुतळे अजरामर झाल्याचा भास होत असतो. ज्येष्ठत्व-श्रेष्ठत्व यांचे भव्य दर्शन देत, वाकून गेलेले शरीर, हाती काठी, चष्मा, तुरळक केस आणि केवळ पंचा व धोतर हा पेहेराव, मनांत इतका बसला आहे की त्यांची महान भव्यता आणि वेगळेपणा केवळ भारतीयांनांच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मा्यता पावलेले ते एक महान मानव समजले जातात.

जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथील शासनाने गांधीजींचा भव्य ब्रॉन्झचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागांत स्थापन केला.

चौकाला गांधी चौक  (Gandhi Square.)   हे नामकरण करुण करुन पुतळ्या खालती एक स्तंभ ( शिलालेख ) कोरला होता. तो असा.

                        M. K. Gandhi  Attorney at law             Mohandas K. Gandhi was a famous figure at Johannesburg’s first law courts located on Government Square, now renamed Gandhi Square. He kept offices near the law courts from 1903 to 1910, at the corner of Rissik and Anderson Streets, and challenged racially discriminatory enactments, both inside and outside of the courts. Gandhi’s legal work soon merged with his Satyagraha ( ‘Soul Force ‘ ) movement of passive resistance, putting his legal career behind him. Gandhi dedicated himself to a lifetime of public service.

Gandhi returned to India in 1914 after 21 full and fruitful years in South Africa.

Continuing the search for truth which he had begun in South Africa, he plunged in to India’s struggle for freedom and came to be hailed by his people as  Mahatma, ‘ Great Soul ‘

        

                                          Sculptor :  Tinka Christopher

 

Unveiled by His Worship the Executive Mayor Councillor  Amos  Masondo,

                                               2 October 2003

त्याच पुतळ्याच्या दुसऱ्या बाजूला स्थंभ ( शिलालेख ) कोरलेला असून त्यावरती त्यावेळचे गांधीजींचे विचार व्यक्त केलेले आहेत.

I learn during all those years to love Johannesburg even though ir was a mining camp. It was in Johannesburg that I found my most precious friends. It was in Johannesburg that the foundation for the great struggle of Passive Resistance wasLaid in the September of 1906…Johannesburg, therefore, had the holiest of all the holy associations that Mrs. Gandhi and I will carry back to India.M. K. Gandhi, 1914

 

जगातींल सर्वांत श्रीमंत व बलशाली असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा हे महात्मा गांधीजीना खूप आदरणीय स्थानावर मानतात. त्यांचे तैलचित्र हे आजही त्यांच्या भव्य कार्यालयांत दिमाखाने जगासमोर आहे.

 

डॉ. भगवान नागापूरकर\

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com