Monthly Archives: जून 2017

मानसिक तणाव (क्रमशः ८ वर पुढे चालू)

मानसिक तणाव (क्रमशः ८ वर पुढे चालू)

000 सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.

एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे ( Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोऱ्यानी बांधलेला. दोऱ्यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते. त्यामुळे तो खांब केव्हांही स्थिर नसतो. मात्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विचारांचे तुफान, परिस्थितीचा मारा, घटनांची वर्दळ ही सारी त्या जीवनतंबूंच्या खांबाचे दोर असतात. ते जीवनाच्या खांबाला अस्थिर वा स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या ह्या हालचालीच मानसिक तणाव निर्माण करतात. संसारिक प्रश्नांचा तुमच्या जीवनावर पडणारा भडिमार आणि तुम्हाला त्याची करावी लागणारी सोडवणूक, हेच तर तुमच्या जीवनाच्या यशाचे कौशल्य असते. ह्याचे ठोकताळे नाहीत. परंतु एक मार्गदर्शन असते. नेहमी निर्माण झालेल्या प्रश्नांमधून त्वरित एका प्रश्नाची निवड करा. त्याचे उत्तर शोधा. कोणत्या प्रश्नाला प्राधान्य द्यावयाचे, हे ती त्यावेळची परिस्थितीच तुमचे मार्गदर्शन करेल. तुम्ही फक्त मन शांत ठेवून, सारासार विचाराला प्राधान्य देत चला. एका नंतरच दुसरा प्रश्न समोर घ्या. त्याची उकल करा. संभ्रमित होऊ नका. तुमचा आत्मविश्वास, संकल्पना, व धडाडी सारे प्रश्न सुलभ करतील. त्यावेळी तेथे मानसिक तणाव येणार नाही.
एक सुंदर उदाहरण देतो. माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. लग्न समारंभ खूपच चांगला, आनंद व उत्साहाने चालू होता. बराच मित्रपरिवार जमला होता. माझी भेट माझे मित्र श्री एकनाथराव यांच्याशी झाली. गप्पा टप्पा, अभिनंदन झाले. मी सभामंडपांत बसलो होतो. लग्न सोहळा सुरु झाला.
अचानक माझे लक्ष गेले की तेथे एकनाथराव दिसत नव्हते. लग्नाची वेळ आणि मुलीचे वडील कोठे गेले. मी चौकशी केली. मला उत्तर मिळाले नाही. असतील इकडे तिकडे असे मोघम उत्तर मिळत गेले. जशी जशी वेळ जाऊ लागली, मी बेचैन झालो. सारे त्या तगमगीत बघत बसलो. लग्न लागले. अभिनंदन झाले. सर्वांच्या जेवण्याच्या पंगती बसल्या. जेवणे झाली, परंतु एकनाथराव मात्र दिसले नाही. मन शंकाकुशंका करु लागले. लग्नात, वऱ्हाडी माणसांत काहींतरी बिनसले असेल, हा विचार येवू लागला. परंतु ना माहिती ना उपाय. शांत बसून मी लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना हजेरी देत गेलो.चार तास झाले. श्री एकनाथराव आल्याचे कळले. ते खोलीत बसले होते. मी लगेच त्याना भेटण्यास गेलो.
मजकडे बघून ते किंचीत् हसले. ” Any Problem ? ” मी त्याना उत्सुकतेने विचारले. त्यानी शेजारी झोपलेल्या त्यांच्या नातवाकडे बोट दाखविले. त्याच्या पायाचे हाड मोडले होते. Fracture झाले होते. नुकतेच प्लास्टर करुन आणले होते. हा खेळत असताना पडला. त्याचा पाय मोडला.
मुलीचा लग्न समारंभ होता. त्यामध्ये विघ्न निर्माण होऊ लागले होते. एका महत्वाच्या प्रश्नांची ते सोडवणूक करीत होते. प्रासंगीक निर्माण झालेल्या प्रश्नाची तिवृता ही त्या क्षणी जास्त महत्वाची वाटली. प्रसंग आणि निर्णय हेच जीवनांचे अत्यंत महत्वाचे टप्पे असतात.

तुमच्या यशाचे गमक तुमच्या निजी प्रश्नांची सोडवणूक आणि प्राध्यान्य (Solution and Priority ) यांत असते. योग्य वेळी योग्य विचार हे मानसिक तणावापासून संरक्षण करतात.

000 जेवढे होईल तेवढे दुसऱ्यास सहकार्य करण्याचा प्रयत्न करुन दुसऱ्यास सहायक झाल्यास आपण आपली चिंता विसरुन जाल.
स्वभावामध्ये काहीं चांगले गुणधर्म जोपासावे लागतात. ते तुमच्या मनाला आनंदी व समाधानी ठेवण्यास हातभार लावतात. जसे इतरांना सहकार्य करणे. हे प्रासंगिक न बनता, म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्ही कुणाची मदत केली असे न होता, मदत करण्याची वृत्ती अंगी बाळगावी. सहाय्य सर्वतोपरी क्षमतेनुसार असावे. तुमची मदत तुमच्या अहंकाराला खतपाणी देणारी न बनता ती तुमच्या समाधान वृत्तीला चेतना देणारी असावी. ह्यासाठी मदत करा व विसरुन जा. वाच्यता नको. ह्यानी तुमची आत्मिक शांतता मात्र सदैव तेवत राहील. कारण हा सहाय्य करणे ईश्वरी गुणधर्म असतो. मानसिक तणाव रहीस हे जगणे असेल.

कित्येक घटनासाठी तुम्ही प्रचंड प्रमाणात प्रयत्न करीत असतात. तुम्हाला यश येत नाही. निराशा मानसिक तणाव निर्माण करते. त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. तुमच साध्य कदाचित् योग्य असू शकेल, परंतु मार्ग चुकीचे निवडले गेले असतील. त्यावर चिंतन करा. सल्ला घ्या. तुमच्या विचारांना गरज वाटल्यास बदला. मीपणा, Ego अहंकार हे विचाराना नेहमी हानीकारक ठरतात. तुमच्यामध्ये विचारांची क्षमता असते. शांत राहून करीत असलेल्या मार्गाना, विचारांना बदला. बदललेला दृष्टीकोन कदाचित् तुमच्या दुःखाचे सुखांत परिवर्तन करु शकेल. ह्यात मानसिक तणाव कमी होइल.

000 अस म्हणतात की कमळाच्या फुलाभोवती बागडणारा भवरा हा आपल्या आनंदात इतका मग्न होऊन जातो की त्याला रात्र होऊ लागलेली कळत नाही. फुलांच्या पाकळ्या सांजसमयी मिटून जात असतात. भवरा त्यातच अडकून जातो. गुदमरुन प्राण गमवतो. आनंदी वातावरण आणि सभोवताल हे जेव्हां विसरले जाते, जीवनाला ते घातक ठरु शकते. कित्येक चांगली माणसे, थोर समाजसेवक, निस्वार्थी भावनेने इतरांना प्रेम, आनंद, सहकार्य, अशा महान मानवी गुणधर्मांत व्यग्र असतात. सारे सद् हेतूने होत असते. पण मनाला काय चांगल वा काय वाईट. कोणत्याही विचारांचा अतिरेक होऊ लागला की मन तणाव निर्माण करते. आपण देखील अशा थोर व्यक्तीना म्हणतोच प्रकृतीचा काळजी घेत चला. धवपळीत व्याधी सुरु होतील. व्याधी ह्या विचारांच्या मारय़ामुळे उत्पन्न होत असतात. मग विचार कसेही असोत. स्वभाव अशा विचारांच्या उत्पन्नाला खतपाणी घालत असतात.
000 एक महान तत्वज्ञान आहे की जी गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही ती मान्य करा. त्याबद्दल विचार करीत राहून आपला मानसिक तणाव वाढू नका. प्रत्येक घटनावर वेळ हे अप्रतिम श्रेष्ठ औषध असते. प्रचंड दुःखाचे, निराशेचे प्रसंग देखील काळाच्या ओघांत शिथील होऊन विसरले जातात. निसर्गाचे हे वरदान असते. ज्या व्यक्ती ही समज

मनाशी बाळगतात, ते मानसिक तणावापासून बचाव करण्यात यशस्वी होतात. त्यांची समजदार वृत्तीच त्याना सदैव समाधानी ठेवण्यास मदत करते.

000 कित्येक वेळा आपण काहीं स्वभाव दुर्गुण विनाकारण मनाशी बाळगतो. ती नंतर नैसर्गीक वृत्ती बनते. ज्यांत जरी क्षणिक मानसिक समाधान दिसून आले, तरी ते तुम्हास मानसिक तणावाखाली नेवून ठेवते. तुम्ही ती गोष्ट मुदाम करीत नसतात. पण केवळ वैचारीक ठेवन म्हणून तुम्ही अशा विचारांकडे ओढले जातात. जसे इर्षा, बदला घेण्याची भावना, गैरसमज, तुलनात्मक स्पर्धा करण्याची वृत्ती (Un-healthy Competition) इत्यादी. कित्येकदा हे आपण विनाकारण अंगी बाळगतो. क्षणिक मोठेपणा मिरवण्यासाठी हे कदाचित् होत असेल. ती वेळ निघून जाते, परंतु तुम्हाला अशांत मन करते. तुमच मन खात राहते. तुमचा स्वभाव Guilty Consciousness बनतो. अशा वृत्तीची माणसे सतत निराशेचे एक वलय बाळगुन असतात. असेच मानसिक तणावाला बळी पडतात. वाईट प्रवृत्ती बाळगण्याला कष्ट लागत नसतात. ते सहजतेने होते म्हणून सामान्य त्याकडे झुकतात. चांगले गुणधर्म बाळगणे याला श्रम लागतात. परंतु तेच तुमच्या मनाला शांततेकडे घेवून जातात. मानसिक तणावरहीत तुमचे जीवन बनते.

000 जे होत आहे वा होणार आहे- ते चांगल्यासाठीच.
महान शक्ती ईश्वरा समोर नतमस्तक, अभिवादन, चिंतन करा.

तुम्ही आस्तिक असाल वा नास्तिक. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वभाव. परंतु एक सत्य सारे जग मान्य करते. ते हे की ह्या जगामधल्या वा विश्वामधल्या सर्व घडामोडी कोणत्या तरी शक्तीमुळे वा उर्जेमुळे होत असतात. त्या शक्तीला मान द्या. मग तो कुणी ईश्र्वर समजून वा निसर्ग संबोधित. कोणत्याही महान शक्तीसमोर तुमचे नतमस्तक, अभिवादन, हे तुमच्या अभिमानी, अहंकारी, मनावर सतत पांघरुण घालेल. तुमच्यात राहिलेला सुक्ष्म अहंकार मानसिक जो असंतुलन निर्माण करतो, त्यावर तुमची सद्सद्- विवेक बुद्धी सतेज ठेवील. तुम्ही चांगले, समजदार, प्रेमळ बनण्यास मदत करेल. सर्वात महत्वाचे म्हणजे मनाच्या चंचलतेवर अंकूश ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय असेल. आपल्या सर्व चिंता त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. दररोज थोडा वेळ ईश्वर चिंतन करा. प्रणायाम करा. योगासने करा. व्यायाम घेत जा. त्यामुळे मानसिक व शारीरिक परिवर्तन होते. तसेच मानसिक तणाव कमी होऊन स्वास्थ्य लाभते.

मानसिक तणाव हा लेख येथे पूर्ण.
धन्यवाद
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

000 यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.

जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष नव्हेत. परंतु तुम्ही जर समजदारीची भूमिका घेतली तर येवू घातलेल्या मानसिक तणावाच्या चक्रातून जाण्याचे टाळू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे संघर्ष हे उत्तर नसत. कोणत्या घटनेला किती प्राधान्य द्यायच, त्यांत किती तिवृतेने स्वतःला गुंतवून ठेवायच ह्याचा तुम्ही शांततेने विचार करु शकतां. काहीं व्यक्तीतर वर्षानुवर्षे सुडाच्या वातावरणात, अहंकाराच्या चकरामध्ये आपले आयुष्य घालवितात. ही आमच्या घराण्याची दुष्मनी आहे, अशी दर्पोक्ती करण्यात त्याना धन्यता वाटते. आयुष्य कशासाठी व किती असते हाच मुळ प्रश्न ते जाणत नाही. व्यवहारिक दृष्टीने असल्या संघर्षामधून काहींही उत्पन्न होत नसते. फक्त Ego, मीपणा, अहंभाव, याना खतपाणी देण्यातच त्यांच जीवन खर्च होत. ही एक वृत्ती बनते. हा स्वभाव घातक तर ठरतोच पण मानसिक तणावाला कारणीभूत ठरतो. काय करावे ह्या यातना देणारय़ा संबंधी. चिंतन करा, विचार करा, कांही मार्ग सुचतो कां हे बघा. वेगळ्या वातावरणाची निर्मिती करा. क्षमा याचनेचा विचार करा आणि जर अत्यंत कठीण व अशक्य वाटत असेल तर अशांच्या सहवासातून स्वतःबाजूस व्हा. संपर्क टाळा. अशा व्यक्तीना विसरुन जाण्याचा प्रयत्न करा.
हे मी फक्त ठोकताळे सांगतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, आणि सहवासामधली जवळीक ही भिन्न असू शकते. परिस्थितीजन्य उपाय योजना ह्या तुम्हालाच घ्यावयाच्या असतात. जे कराल ते शांततेने व शांततेसाठीच असावे. मानसिक तणावाला प्राधान्य देत.

000 सृष्टी एकविशाल नाटक- एक रंगभूमी

अस म्हणतात की हे जग, ही सृष्टी, एकविशाल नाटक आहे. एक रंगभूमी आहे.आणि आपण सर्वजण कलाकार आहोत. प्रत्येकाची भूमिका वेगळी व स्वतंत्र असते. कुणाचीही भूमिका एक सारखी नसते. भिन्नता आणि तरीही त्या त्या भूमिकेतील वैशिष्ठपूर्णता, हाच निसर्गाचा चमत्कार असतो.
एखाद्या नाटकांत कुणी राजाची भूमिका करतो तर कुणी भिकारय़ाची.त्या भूमिका ते कशी वठवतात, ह्यावरच त्या कलाकाराचे यश असते. जीवनाच्या ह्या रंगभूमिवर देखील प्रत्येकाने ज्याच्या नशिबी जी भूमिका आलेली असेल ती तशीच हूबेहूब करणे, हे अपेक्षित असते.


नाटकांत देखील भिकारी आपल्या कर्तृत्वाने, हिमतीने राजा बनू शकतो. तसाच राजा आपल्याच दुर्गुणाने, मुर्खपणाने राज्यपद गमावतो.
भिकारी बनतो. हे सत्य आपण बघतो. जीवनाच्या लढ्यात, संघर्षात देखील क्षमता, योग्यता, कर्तृत्व, हिम्मत याना मोठे स्थान असते.
मानसिक तणाव येतो कोठे ?
ज्यावेळी अशी माणसे स्वतःमधील क्षमता, योग्यता विसरतात. कसलेही प्रयत्न करीत नसतात. केवळ इच्छेने, विचाराने इतरांच्या यशाबद्दल कल्पना करतात. मला हे ईश्वराने कां दिले नाही ? याची तक्रार करतात. परिस्थितीला, वातावरणाला बोल लावतात. अशांचे जसे स्वभाव गुणधर्म तयार होतात, त्याला मानसिक तणावामध्ये ढकलतात. दुसरय़ाचे शेत अशाना नेहमी हिरवेगार वाटत असते. आपल शेत देखील कसे हिरवेगार करता येइल, ह्याचा ते प्रयत्न ते करीत नसतात.
अशांच्या स्वभावात निर्माण झालेली वैचारीक ठेवण, त्याना सतत विचारांमध्ये लोटते. तेच मानसिक तणावगृस्त होतात.
जीवनाच्या ह्या रंगभूमिवर, इतर भूमिकांचा अवास्तव विचार न करता, जो आपली स्वतःची अपेक्षीत भूमिका चांगली वठवतो, तोच जीवनात यशस्वी होतो. हीच मानसे तणावरहीत जीवन जगू शकतात.
एक मित्र आहे. त्याच दुकान आहे. खूप मेहनत करतो. व्यवसायांत चांगली कमाई करतो. परंतु जे त्याला मिळत, त्यात सदैव निराश असतो.
तो बघ कंपनीत नोकर आहे, बस महीना संपला की हाती पगार.
तो Contractor आहे. एखादे काम केले की भरपूर पैसे. माझ्या कामासारखी रोजची आणि सतत किच किच नाही. प्रत्येक अभिनेता आपला श्रेष्ठ अभिनय सादर करीत असतो. म्हणून कोणाच्याही अभिनयाला पाहून चिंतीत होऊ नका.

क्रमशः पुढे ७ वर चालू

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मानसिक तणाव

मानसिक तणाव (क्रमशः पुढे ६ वर चालू)

00 आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात. तुलना करुन चिंता नका
आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्य़ाबरोबर करुन चिंतीत होऊ नका. कारण, या विश्वांत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण आहात. या जगात आपल्या सारखा अन्य कोणी नाही.
दुर्दैवाने आपण स्वतःला ओळखत नसतो. जगाला मात्र समजण्याचा प्रयत्न करतो. सतत तुलनात्मक विचार चालले असतात. त्याचमुळे निराशेच्या वातावरणांत राहतो. इतरांच्या तुलनेमुळे स्वतःमधले वेगळेपण विसरतो.
नुकतीच क्रिकेटची वल्डकपची मँच बघितली. एक शॉटमध्ये सचिन तेंडूलकर व शाहरुख खान यांची थोडीशी चर्चा दाखवली गेली. सचिन म्हणतो की आपण एक चांगले अभिनेते असावयास हवे होते. तर शाहरुख खान याने आपण यशस्वी क्रिकेटीयर झालो असतो तर आनंद झाला असता ही इच्छा व्यक्त केलेली दिसली. हे सहज म्हटले असेल तर गम्मत म्हणून घेता येईल. परंतु अशी जर त्यांची सुप्त इच्छा असेल, तर ते मानसिक तणावाचे बळी ठरतील.
एक लक्षात ठेवा की प्रत्येकजण हा सर्वगुण संपन्न असू शकत नाही. जे मिळाले, जे तुम्ही कमावले त्यांत समाधानी रहा. चांगल व वेगळ मिळवण्या प्रयत्न असू द्या. परंतु ठेवीले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही वृत्तीच तुमचे मानसिक तणावापासून मुक्त ठेवेल.
000 निंदकाचे घर असावे शेजारी.
संत शिरोमनी श्री. तुकाराम महाराजानी म्हटले आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. एक महान तत्वज्ञान त्यानी सांगितले आहे. तुम्हाला घडवण्यात, तुमची मानसिक जडन घडन चांगली करण्यात, ह्या तत्वाचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येकजण चांगले वा वाईट गुणधर्म बाळगुण असतो. तुमचे मित्रमंडळ, नातेसंबंधी तुमच्या चांगल्या गुणांची नेहमी स्तुती करतात. हे चांगले आहे. परंतु तुमच्यामधील जे कांही दुर्गुण असतील, वागणूकीमधील अहंकारी, हट्टी स्वभाव ते फक्त तुमचे निंदकच चव्हाट्यावर आणतात. त्या निंदकाना आपलस करा, वा प्रेम करा हा संतथोर संदेश मी देवू इच्छीत नाही. परंतु निंदकाच्या सहवासापासून तुम्हास मिळणार, तुमच्या स्वभावातील दुर्गुणांची जाणीव करुन देणारा संदेश. त्यावर चिंतन करा. मनन करा. मात्र मुळीच कुणाबरोबर चर्चा करु नका. कोण सांगतो ह्यापेक्षा काय सांगतो, ह्यावर तुमचा वैचारीक भर असावा. चांगल्या मनाची ठेवण, चांगले चिंतन करु शकते. चांगला स्वभावच तुमचा मानसिक तणाव कमी करु शकतो.
नेहमी लक्षात असू द्या की तुमची निंदा करणारा तुमचा खरा मित्र आहे. जो तुम्हाला विनामुल्य एका मनोचिकित्सकाप्रमाणे तुमच्या ढोबळ चुका व कमतरतांकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो.

क्रमशः पुढे ७ वर चालू

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मानसिक तणाव

मानसिक तणाव (क्रमशः पुढे ५ वर चालू)

जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे.
जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.
जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका.
आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च केलीत. जर मागे वळून बघितल, तर तुम्हास दिसून येईल की तुम्ही लहान असताना ज्या जीवनाच्या मार्गाचा विचार केलांत, घटना कश्या व्हाव्यांत ही स्वप्ने रंगविलीत, तसे मुळीच झालेले नाही. सर्वच मार्ग एकदम भिन्न होत गेले. घटनाही वेगळ्या होत गेल्या. तरी देखील प्रत्येकजण म्हणेल
“भले कष्टमय जीवन का असेना, पण मी चांगल जगलो. मला माझ्या क्षमते नुसार, योग्यतेनुसार मिळत गेले.”
निसर्ग हा शेवटच्या अंकात तुम्हाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
“जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.”
हे जर जीवनाचे तत्वज्ञान असेल, तर ते तुमच्या अन्तरमनातून मान्य करीत जा. तशी स्वभावाची ठेवण निर्माण करा. अशा माणसाला सुख वा दुःख दोन्हीही सहज पचवण्याची शक्ती मिळत असते. मानसिक तणाव येथे कमी जाणवतो.

केवळ वर्तमानकाळातच जगा

भूतकाळातील चुकांबाबत पश्चाताप करु नका. भविष्याची चिंता करु नका. वर्तमान फक्त सफल करण्याकरीता संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस आपल्या हातात आहे. आज आपण रचनात्मक कार्य कराल तर कालच्या चुका सुधारतील आणि भविष्यांत निश्चितच फायदा होईल.
जीवन हे चक्रमय असते. काल्पनिक शक्तीनुसार तीन काळांत त्याचे विभाजन केले गेले. गेलेला तो भूतकाळ, येणारा तो भविष्यकाळ, आणि चालू सद्यःस्थितीतला तो वर्तमानकाळ. जरी हे तीन काळ वाटत असले तरी खऱ्या अर्थाने, फक्त दोन काळाचेच अस्तित्व माणसासाठी असते. भविष्य काळ येतो, वर्तमान काळाच्या सीमारेषेवरून छलांग मारीत भूतकाळांत अदृष्य होतो. भले काल्पनिक असो, वा असत्य असो, जगायचं असतं आम्हाला ते फक्त वर्तमान काळांत. तणावरहीत जगायचं असेल तर केवळ वर्तमान- काळाचा सहारा घेऊनच जगावं लागेल.भूतकाळातील अनुभव, कर्तृत्व यांची आठवण येणे चांगले, परंतु ते वर्तमान काळाचा आधार होऊ शकत नाही. भूतकाळातील गणितांची सांगड वर्तमानकाळाशी घालू नका. भविष्यकाळ तर अनिश्चित असल्यामुळे कल्पनेच्या झेपांना जागृत राहून आकार देत चला. फक्त वर्तमान काळांत जगण्याची संवय अंगीं ठेवा.
मानवी १०० वर्षाच्या मर्यादेत, तूम्ही सतत फक्त १० वर्षे जगण्याची वृत्ती मनाशी बाळगा. भूतकाळातली ५ वर्षे ही अनुभव व मार्गदर्शनासाठी आणि भविष्य काळातली फक्त ५ वर्षे जीवनाच्या योजने प्रित्यर्थ. पंचवार्षिक योजने प्रमाणे. ही योजना व्यवहारीक जीवनाची सांगड घालेल. वैचारीक झेप आणि कल्पना विलास यांना पायबंध घालेल. अशी आखणी तणावशीथिलता जीवनांत आणेल.
६ क्रमशः पुढे चालू

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com