Monthly Archives: ऑक्टोबर 2016

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.
मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो. चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचार घेतला. खेड्यामधले घर कौलारु म्हणतात त्याप्रमाणे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा वाडा. पुढे मागे मोठे अंगण व फुलबाग होती. वसंताची ह्या सत्तरीमधली दिनचर्या बघून मी हरकून गेलो. खूप गम्मत मौज आनंद वाटला. त्याच्या प्रत्येक हलचालीने मनाची बरीच करमणूक झाली. आणि कांही प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न झाले.
प्रातःसमयी चारचा सुमार असावा. माझी झोपमोड झाली, ती कानावर पडलेल्या भजनानी. वसंता तानपूरा घेवून संतांचे अभंग अतीशय तन्मयतेने ताना मारीत, आलापांत एकरुप होऊन पहाडी अवाजांत म्हणत होता. त्यानेच छेडलेले सतारीचे बोल, त्याला साथ करीत होते. मी गादीवर बसून ते सारे एकाग्रतेने ऐकत होतो. एक वेगळांच आनंद घेत होतो. वसंताची ही गायनकला माझ्यासाठी अपरिचीत होती. त्याने साठीनंतर ती आपल्यापरी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालवला होता. प. भिमसेन जोशींचे आलाप व गायन त्याने तंतोतंत उभे केले होते. त्याच्या ईश्वराच्या भजनासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देत अभिवादन केले.
संध्याकाळचा चहा अटोपून आम्ही मागील अंगणात गेलो. त्याचे दोघे नातू ७-८ वर्षाचे व त्यांचे तीघे मित्र गोट्या खेळत होते. मध्यभागी गल केलेली होती. त्याच्या भवती वर्तूळ केले होते. व प्रत्येकाची एक रंगीत गोटी विखूरलेली होती. प्रतिस्पर्ध्याची गोटी रिंगणाबाहेर गोटीच्याच सहाय्याने उडविणे, व आपली गोटी रिंगणात गलीमध्ये टाकणे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता. बोटाच्या कांड्यावर गोटी ठेऊन बोटाला बाक देत स्प्रिंगचा आकार व गती ने समोरची गोटी उडविण्याची कला सर्वानी साधली होती. अचुकता आणि नेम यानी तो खेळ मनास करमणूक करीत होता. आम्ही अंगणात जाताच सर्वानी गलका केला.
״ आजोबा तुम्हीपण या तुमचीच आम्ही वाट बघत होतो. ״ हे पालूपद सर्वानी लावले.
वसंताने मला बाकावर बसण्याची खून केली. व तो चक्क त्यांचा एक बालमित्र म्हणून खेळण्यांत सामिल झाला. आश्चर्य म्हणजे चार सहा गोट्या त्याच्या खिशांत आधीच होत्या. सर्वांचा खेळ खूप रंगला. वसंता आपले वय विसरुन त्यांच्यातला एक संवंगडी झाला होता. एकमेकावर आरोप करणे, ओरडणे, रागावणे, खोटेपणा करणे, खेळातील तथाकथीत नियमांना बगल देणे, व आपोआपच खरे कसे हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.
वसंता आजोबा म्हणून मागे पडला नाही. तो पण त्याचा सुरांत, वादविवादांत, हमरीतुमरीवर येत असे. खेळ संपला, गोट्याचे वाटप झाले. आणि आजोबांनी सर्वाना भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिला.


रात्रीच्या जेवणाची तयारी होत होती. गरम गरम कांदाभजी करण्याची सुचना दिली गेली होती. बैठकित मोठा गालीचा होता. मी मासिक चाळत बसलो होतो. माझे लक्ष कोपऱ्यांत बसलेल्या वसंताच्या तीन वर्षे वयाच्या नातीकडे गेले. ती तीच्या सहा वर्षाचा भाऊ दादू आणि वसंता सर्वजण समोरासमोर बसून आपडी थापडी खेळत होते. आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, तेलंगीचा एकच कान, धर ग बेबी माझाच कान. धर त्या दादूचा कान. पुन्हा आपडी थापडी, आपडी थापडी गुळाची पापडी तेच पालूपद चालू. आणि दुसऱ्याचा कान धरल्या नंतर फिरण्याच्या हालचाली केल्या जातात. चाऊ म्याऊ पत्राळूतले पाणी पिऊ, हंडा पाणी गुडूप, म्हणत सर्वानी तोंडावर आपले दोन्ही हात ठेवले. किती मजेदार हलकी फुलकी आणि आनंद निर्माण करणारा हा शुशूखेळ होता.
हसणे खिदळणे आणि ओरडणे, ह्यात छोट्या नातवंडासह वसंता एकरुप होऊन आनंद लूटत होता.
” गरम गरम भजी वाढली, चला जेवायला हांक आली ” आणि आम्ही सर्वजण उठलो.

आज रविवार सुट्टीचा दिवस. वसंताचे दोन्ही मुले घरांतच होती. एक महाविद्यालयांत जाणारी नात अन्विता. सकाळचा फराळ झाला. अन्विता क्रिकेटचा पेहेराव घालून आमच्या समोर आली. ״ चला बाबा बाहेर पटांगणात ״ सर्वजण जमा झाले आहेत.
״ चला ״ म्हणत वसंता उठला व त्याने मला पण बाहेर येण्याचे सुचविले.
״ काय ? ह्या सत्तरीमध्येही तू क्रिकेट खेळणार. ? ״ मी विचारले
״ आफकोर्स परंतु खेळाडू म्हणून नव्हे, तर अँपायर म्हणून ״
वसंता मला टाळी देत मोठ्याने हसला.
दोन तासपर्यंत अन्विताच्या मैत्रीनी आणि वसंताच्या दोन्ही मुलांचे मित्रमंडळ, या सर्वानी कमीजास्त भिडूची टिम बनवत खेळांत रंगत आणली. पंचच्या भूमिकेंत वसंताने काटेकोर अट्टाहासी परंतु प्रेमळ स्वभावाने पंचगिरी चांगलीच केली. खेळ खुपच रंगला. सर्वानी त्याचा आनंद लुटला. घरांतून बेल वाजली. सर्वजण खेळ आटोपून जेवणासाठी या. बोलावले गेले.
वसंता हा पेशाने डॉक्टर होता. सतत निरनीराळ्या रोग्यांच्या सहवासांत असे. एके काळी त्याला दैनंदिनीमधून इतर बाबीसाठी थोडीशी देखील उसंत मिळत नव्हती. आता वयानुसार तो दररोज सकाळी फक्त दोन तास प्रॅक्टीस करण्यांत घालवीत असे. सामाजिक कार्यांत आता त्याचा कल वाढला होता. वैद्यकिय शिबीरे आयोजीत करणे, गरीब गरजूना मदत करणे, ह्यात त्याचा बहूतेक वेळ जाई. शासनाच्या कुटुंब कल्याण योजना, पल्सपोलीओ, माताबाल शिबीरे, अशा कार्यक्रमांत तो हिरिरीने भाग घेत असे.
आजचा माझ्या मुक्कामाचा वसंताच्या घरातील शेवटचा दिवस होता. दुपारचे जेवण आटोपून मी निघणार होतो. आज जेवणाचा स्पेशल व चमचमित बेत आखला असल्याचे कळले. त्याच बरोबर मी तेथील इतर मित्र मंडळीसमवेत गप्पागोष्टींत व्यस्त रहावे, ही वसंताची प्रेमळ सुचना होती. आज तो स्वयंपाक घरांत राहून, खाद्य पदार्थांचे मार्ग दर्शन करणार होता. मी हसतच त्याच्या उत्साहाला मान्यता दिली.


दोन अडीच तास झाले, अजून वसंता कां आला नाही. काय करतो इतका वेळ त्या स्वयंपाक घरांत. मला उत्सुकते बरोबर गम्मतही वाटली. मी उठलो व स्वयंपाक घरांत जाऊन डोकावले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वयंपाक घरांत फक्त वसंता एकटाच होता. आणि तो जेवणातील पदार्थ करण्यात मग्न होता. One man’s show. It was great Vasanta only. त्याच हेही रुप बघून मी चकीत झालो. भारावून गेलो. गरम गरम जिलेब्या तो तळत होता. भरलेल्या वांग्यांची भाजी, पुलाव, ताकाची अतिशय चवदार कढी हा अप्रतीम बेत त्याने एकट्याने यशस्वी केला होता.
जीवन एक रंगभूमी आहे असे म्हणतात. आपण प्रत्येकजण फक्त नटाच्या भूमिकेंत असतो. नटाला वेळोवेळी, प्रसंगाप्रमाणे मुखवटे बदलावे लागतात. त्याच भूमिकेत इतके एकरुप व्हावे लागते की ते पात्र जीवंत वाटावे. परिणामकारक भासावे. कुणी संत सज्जन बनून व्यासपिठावर येतो. सर्वांची मने प्रेमाने वा आदराने भारवून टाकतो. तोच खलनायक या भूमिकेत सर्वांच्या मनामध्ये राग तिरस्कार ह्या भावना नीर्माण करतो.
ह्याच ठिकाणी त्या कलाकाराच्या कलागुणांची कदर होते. त्यालाच प्रेक्षक नटसम्राट ही पदवी देतात. संसारातील त्याचे निजी जीवन आणि रंगभूमिवरचे जीवन ह्यात खूप तफावत असते. रंगभूमि ही नैसर्गिक जीवन कसे असते, हे दाखवितानाच, ते कसे असावे ही देखील अपेक्षा व्यक्त करते. येथेच नट वा कलाकार आपल्या भावना सुलभतेने बदलताना दिसतात. हे सारे बाह्यांगी घडत असते. बदल हा जणू मुखवटा ( Mask ) बदलण्या सारखे सहज होऊ शकते. निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ त्याच्या अंतरात्म्यापर्यंत केंव्हांच पोहचत नसते. मनालाही फारसा धक्का बसत नसतो. सारे होत राहते ते वैचारीक स्थरावर. हा केवळ विचारांनी विचारांचा संवाद असतो. त्यानुसार चेहऱ्यावर भाव व हातवारे करुन भाव दर्शविले जातात. त्यांचा उगम बौद्धिक स्थरावरच असतो. त्यात खऱ्या भावनेचा ओलावा नसतो. येथे खरी भावनिक गुंतवणूक केंव्हांच नसते. हां हे मात्र सत्य असते की, व्यासपिठावर जो वैचारीक व भावनिक गुंता निर्माण केला जातो, तो कृतिम असतो. परंतु हुबेहुब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न होतो.
सत्य जीवनातील व्यक्ती कशी असते. तीच बोलण, वागण, हालचाली, वेषभूषा, इत्यादी कशा असतात ? त्याच चित्रण केल जात. सार बौद्धीक वैचारीक स्थरावरच दर्शनी project केल जात, भावना विचार दिसतात. पण ती कढ वा खोली त्यात केव्हांच नसते. खरा भावनेचा अविष्कार हा मात्र त्याच्या सत्य आयुष्याचा रंगरुपांत कार्यांत दिसतो.
वसंतानी हे भिन्नत्वाच स्वरुप साध्य करुन जीवन एक आगळ वेगळच केल होत. जीवन कस असावे, ह्यापेक्षा जीवन किती अंगांनी परिपूर्ण असावे ह्याच झलक दर्शन मला त्याच्या त्या चार दिवसाच्या सहवासांत झाले.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

जीव ( प्राण-आत्मा )

जीव ( प्राण-आत्मा )

वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वताः केलेल्या प्रयोगांमुळे. तशीच मदत झाली ती, शरीर विच्छेदनाची (Dissection ), सुक्ष्म दर्शक यंत्राची, चार्टसची, ग्राफसची, आणि अशाच अनेक साधनांची.
मला अध्यात्मिक विषयामध्ये रुची आहे. हा जीव (प्राण वा आत्मा ) ज्याला संबोधीले, तो ह्या देहांत कोठे असतो, कसा असतो, ह्याचा मी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत, मासिकांत, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नोंद आढळून आली नाही. तरीही जेव्हां शरीरांतील टिश्युंचा वा सेल्सचा रचनात्मक उल्लेख होताना, ज्यामध्ये हलचाल दिसे त्याला जीवन्त असल्याची नोंद ‘ जीवमय ( प्राणमय ) live cells ‘ अशी होत असे. हलचाल नसलेल्याना ‘ मृत dead cells ‘ संबोधीत.
हलचालीचा मुख्य स्रोत, शक्ती, वा उर्जा हीच त्याचा जीव वा प्राण म्हणूनच ओळखली जाते.
यंत्राचे भाग निराळे, परंतु ते कार्यारत होण्यासाठी त्याला उर्जा लागते. ती विद्युत, उष्णता, इलेक्ट्रॉनिक वा दुसऱ्या कोणत्या प्रकारची असेल. जशी उर्जा यंत्रासाठी तसेच प्राण हा देहासाठी असतो. जरी प्राण दिसला नाही, तरी त्याचे अस्तित्व जिवंतपणासाठी गरजेचे. प्राण संपुर्ण देहामध्ये पसरला असतो. देहाचे प्रत्येक सुक्ष्म सेल्स जेव्हां जीवंतपणाचे लक्षण दाखवते, त्याचवेळी तीच्यामध्येंही आत्मा आहे. मेंदूपासून नखापर्यंत जे चैत्यन्य जाणवते. जी जीवंतपणाची लक्षणे दिसतात, ती त्या जीवात्म्यामुळेच. त्या उर्जा शक्तीसाठी, देहामध्ये स्वतंत्र, वेगळे अवयवा सारखे स्थान वा कार्य दिसून आले नाही. संपूर्ण शरीरावर शक्तीरुपाने ताबा ज्याचामुळे असतो, तो जीवात्मा. शरीर मृत होताच त्याच्यातील जीवात्म्याचे अस्तित्व नाहीसे होते. शरीराचे जेव्हां कांही कारणामुळे कार्य बंद पडते, त्याच क्षणी जीवात्म्याचे तेथील अस्तित्व नाहीसे होते. जीवाला शरीरांची एक प्रकारे ओढ असते. तो शरीरांत गुरफटून राहीलेला असतो. संपूर्ण शरीरांत पसरलेला असतो. जीव स्वतः शरीर त्यागीत नसतो. परंतु अवयवातून जे जे सेल्स निकामी होऊ लागतात, तेथून जीवात्मा लोप पावतो. शेवटी शरीराचे कार्य शिथील होता क्षणीच जीवात्मा ते शरीर सोडून देतो. शरीर व जीव दोघेही सदैव एकरुप असतात. फक्त कार्य करणे हे जीवामुळे तर कोणते कार्य करावे हे शरीर ठरवितो. दोन्हीही भिन्न बाबी आहेत. जसे घोडा फक्त घोडेस्वाराला वाहून नेण्याचे कार्य करतो. परंतु कोठे जायचे हे मात्र घोडेस्वारच जाणत असतो. त्याच प्रमाणे देहामधले जे अनेक इंद्रिये आहेत, त्याचे कार्य कसे चालावे हे त्यातील एक इंद्रिय मेंदू वा बुद्धी सतत ठरवित असते. मेंदूची चालक शक्ती जीव ही मेदूला जीवंत ठेवते. मेंदूने कसे व कोणते कार्य करावे हे मेंदूच स्वतंत्रपणे ठरवित असतो.

नैसर्गिक संसारीक घटनांचे पडसाद मेंदूवर सतत पडतात. त्याला जगाचे ज्ञान होत राहते. क्रियात्मक वा प्रतिक्रियात्मक गोष्टी मेंदू आपल्या देहाच्या अवयवाकडून करुन घेतो. संसाराचे चक्र चालत राहते.
मेंदूकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचे परिणाम सुख वा दुःख ह्या भावनिक अविष्कारांत होतात. त्या प्रमाणे परिस्थितीचा गुंता होत जातो. ह्या सर्व घटनामध्ये मेंदूचा सहभाग असतो. जीवाचा नव्हे. ह्यालाच केलेल्या कर्माचे फळ म्हणतात. कार्य कोणते व परिणाम कोणता ह्याच्याशी जीवाचा संबंध नसतो. म्हणजेच त्या ईश्वराचा संबंध नसतो. ईश्वर देहाशी एक रुप होऊन देखील नामानिराळा असतो. व्यक्ती अर्थात त्याच्या देहाशी संबंधीत त्याचा मेंदू , बुद्धी, मन, विचार, भावना इत्यादी होणाऱ्या कर्मात प्रत्यक्ष सहभागी असतात. जीव वा त्याची उर्जा नव्हे.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मला समजलेले कर्मफळ

मला समजलेले कर्मफळ

प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो. व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सतत घडणारी क्रिया व त्याप्रमाणे त्याचे होणारे परिणाम. जीवन म्हणजेच एक हलचाल. हलचाल म्हणजेच कर्म. कर्म म्हणजेच सुख दुःखाचे चक्र. जीवनभर चालणारे. हे टाळता येत नसले तरी ते सहज आणि सुकर करता येवू शकते. निसर्ग हा त्याच्या ठरलेल्या नियमानुसार चालत असतो. त्यात कधीही बदल केला जात नाही. व्यक्ती आणि त्याचे कर्म ह्याच्याशी निसर्गाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. व्यक्ती आपल्या प्रत्येक हालचालीसाठी, म्हणजे कर्म करण्यासाठी स्वतंत्र असतो. ज्यामुळे ज्याचे कर्म त्याचे त्यालाच फळ. सुख वा दुःख ह्या भावनीक समस्या त्यानेच केलेल्या कर्माचे परिणाम असतात. व्यक्तीमध्ये कांही नैसर्गिक उपजत गुणधर्म असतात. अहंकार ( Ego) आणि वासना ( Desire ) . ह्यामुळेच निसर्गाने तुम्हास दिलेल्या जीवनाबद्दल आपूलकी (अस्था) (Attachment ) वाटते. जीवन जगण्या विषयी प्रेम वाटते. कर्माचे होणारे नैसर्गिक परिणाम ही व्यक्तीची चिंताजनक समस्या नसते. परिणाम कसे होईल हा त्यात खरा भाग असतो. व्यक्तीची समस्या असते ती त्याच्या अपेक्षित कर्मफळामुळे. कोणत्याही गोष्टीचे परिणाम कसे होतील, ह्यापेक्षा ते कसे व्हावे ह्या त्याच्या मनांत दडून बसलेल्या विचारामुळे. विद्यार्थी अभ्यास करताना पास होण्याची अपेक्षा करतो. प्रथम येण्याची इच्छा बाळगतो. हे केंव्हाही चांगले व प्रेरणादायी. परंतु हे सारे त्याच्या योग्य प्रयत्न्यावर अवलंबून असते. याची त्याला जाणीव असावी. म्हणजे यश वा अपयश ह्याचे तो विश्लेषन करु शकेल. वासना (Desire) ह्या सुख दुःख निर्माण करीत नसतात. त्या फक्त जीवनचक्र चालविण्यास देहाला मदत करतात. Desire creates attachments for the life. परंतु जीवन कसे असावे, कसे चालावे, कर्माचा कोणता परिणाम व्हावा, ह्या विचारांमध्ये व्यक्ती गुंतला जातो, त्याचवेळी त्याला सुख दुःखाशी सामना करावा लागतो. दुःखाचे कारण इच्छीत अपेक्षाभंग. निसर्गचक्र व निसर्ग नियम ह्यावरच जगातील घडामोडी घडत असतात. त्यामध्ये परिस्थिती, सभोवताल, व व्यक्ती ह्या सर्वांचेच समीकरण लक्षांत घेतले जाऊन घटनेचा सांघीक परिणाम होतो. परंतु व्यक्ती त्या घटनेमध्ये केवळ स्वतःला गुंतवून स्वतःच्या विचारानुसार त्या गोष्टीचा परीणाम कसा व्हावा ही अपेक्षा करतो. हेच कदाचित् निराशेचे कारण बनू शकते. कोणत्याही गोष्टीचा परीणाम प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे केंव्हाही होऊ शकणार नाही. हे सत्य आहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी योग्य आणि खुप प्रयत्न करणे गरजेचे असते. यश संपादन करण्याचा तो मार्ग आहे. त्याचमुळे तुमच्या विचारांच्या झेपेला मर्यादा असतात.

सभोवताल, काळ, वेळ, परिस्थिती इत्यादी अनेक पैलू प्रत्येक घटनामध्ये गुंतलेल्या असतात.त्या घटनेच्या गुंत्यामधले अनेक दोर त्या घटनेला बांधलेले असतात. ही व्यक्तीच्या अकलनाबाहेरची गोष्ट असते. निसर्गच त्यांच्या पद्धतीने तो गुंता सोडवू शकतो. व्यक्ती स्वतःच्या विचाराने त्या गुंत्याचा एखादा दोर खेचून निरनिराळ्या गाठी मात्र निर्माण करेल. म्हणूनच म्हटले जाते की घटनेची उकल निसर्गालाच करुं द्या. त्याने दिलेल्या निर्णयास अर्थात परिणामास मान्यता द्या. कर्माच्या फळाची अपेक्षा न करता फक्त योग्य प्रयत्न व्यक्तीने करावे. हाच जीवनाचा महान संदेश असेल. ईश्वरानी प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन उपजत चेतना शक्ती दिलेल्या असतात.
१ ज्ञान शक्ती. (Power of Knowledge)
२ इच्छा शक्ती. (Power of Desire)
३ क्रिया शक्ती.(Power of Action)
ह्या सर्व उर्जा शक्ती आहेत. कोणतेही काम करण्यासाठी ह्या उत्तेजनात्मक गोष्टी असतात. ह्याच मुलभूत गोष्टीमुळे व्यक्ती कोणतेही कर्म करण्यास उद्युक्त होतो. एक महत्वाचे म्हणजे काम करण्यासाठी चेतना मिळणे ही बाब निराळी.ती निसर्ग देतो. परंतु कोणते काम करावे त्याची दिशा व योजना आखण्याचे कार्य मात्र निसर्ग केव्हांच करीत नसतो. माणसाला दिलेल्या मेंदू–बुद्धी–मन ह्या इंद्रियामार्फत ते होत असते. कार्य करणे ही चेतना वेगळी, कोणते कार्य करणे हा भाग सर्वस्वी निराळा असतो. ते व्यक्तीच्या संस्कारीत विचारावर अवलंबून असते. याचा अर्थ कर्म प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने, आवडी निवडी नुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार करीत असतो. त्याला निसर्ग फक्त शक्ती देतो. त्यामुळे कर्माचे स्वरुप व त्याचा परिणाम ह्याला फक्त व्यक्तीच जबाबदार असते. कर्मफळ हे त्यालाच भोगावे अथवा उपभोगावे लागते.
येथेच एक गैरसमज निर्माण होत असतो. प्रत्येक कर्मामध्ये व्यक्ती स्वतःला
” कर्म करता ( The Roll of DOER ) ” याच्या भुमिकेत समजतो. हे अर्धसत्य आहे. कारण विचार, योजना, दिशा, कल्पकता, इत्यादी त्याच्या असतात. तो उर्जा शक्तीला (निसर्गाला ) दुय्यम स्थान देतो. किंवा दुर्लक्ष करतो. स्वताःकडे संपूर्ण घेतलेल्या कर्त्याच्या भूमिकेमुळे जेव्हां इच्छीत कर्मफळ न मिळाल्यास त्याला दुःखी व्हावे लागते. जर हाच कर्मफळाचा भाग प्रत्येक कर्म करताना ही “ईश्वरी ईच्छा वा योजना ” समजून अंगीकारल्या, तर त्याचे तेच दुःख शिथील होईल. कर्माचा जो परिणाम होणार असतो, तो तर होणारच. परंतु ” मी हे केले ” हा अहंकार मीपणा कमी होण्यास मदत होईल समाधानी वृत्ती निर्माण होईल. ते कर्मफळ स्विकारण्याची मनाची तयारी असेल. असे म्हणतात की प्रत्येक काम ईश्वराला साक्षी ठेऊन, त्याची आठवण करीत करावे. आणि शेवटी ते कृष्णार्पण वा ईश्वरार्पण करावे. त्यांतच समाधान व शांतता लाभते.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

वर्तमान काळांत जगा.

वर्तमान काळांत जगा.

काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईल. परंतु खऱ्या अर्थाने त्याचे अस्तित्व नसल्यासारखेच असेल मानवाने वर्ष महीने दिवस तास मिनीटे सेकंद आणि सेकंदाचा हजारावा भाग मॅक्रो सेकंद हा यांत्रीक साधनानी केला आहे. परंतु मानवाच्या बुद्धी अनुभवाने त्या Micro Second चा केंव्हाच अनुभव घेणे शक्य नाही. ते शरीराच्या कोणत्याच हलचालीमध्ये मोजता येणार नाही. म्हणूनच वर्तमान काळ मोजणयाच्या क्षमतेत येत नाही. काळ आला नी गेला. त्या दोन क्रियाच्या मधली कालपनीक दुभंगमारी रेषा काठ वा कुंपण म्हणा हवे तर. उपनिषदामध्ये तर वर्तमान काळाचे अस्तित्व पण दाखविले नाही. इतका तो क्षणीक वा नामधारक झालेला आहे. तरीही अध्यात्मीक क्षेत्रात मानवी जीवनात संसारात वर्तमान काळाला अत्यंत महत्व दिले गेले आहे. प्राप्त झालेले आहे.
सर्व श्रेष्ठ काळ म्हणजे वर्तमान काळाला समजले गेले आहे. दोन अ-सत्या मधले एक सत्य समजले गेले आहे. ईश्वरी अनुभवाची प्रचीती, मनाच्या शांततेचा सर्वोतम क्षण, आनंद उपभोगण्याचा खरा काळ, म्हणजे केवळ वर्तमान काळच असेल. भविष्य काळ सदा अनिश्चीततेच्या लाटेवर आरुढ झालेला असतो. त्याच्या कोणत्याच क्षणाच्या सत्यतेची कल्पना करता येत नाही. एक सत्य म्हणून निश्चीत म्हणून कुणालाही समजणे शक्य नाही. तर्कज्ञानाला मर्यादा असतात.जरी ते ईश्वरी वा नैसर्गिक चक्रामधले असले तरी मानवासाठी काल्पनीक अनिश्चीत म्हणूनच अ-सत्य असा तो काळ असतो.
भूत काळ तर तुमच्यापासून दुर गेलेला असतो. पून्हा कधीही न येणारा न मिळणारा. तो फक्त फोटो अल्बमप्रमाणे आठवणीच्या कप्यात कोरला जाऊन तुमच्या जीवनातील प्रसंगाची चाळवा चाळव करण्याच्या फक्त कामाचा ठरतो. निश्चीत परंतु गेलेला काळ. म्हणून तुमच्यासाठी शेवटी एक अ-सत्य म्हणूनच समजला जातो. अनुभवाच्या फक्त मर्यादा असतात. कारण येणारा प्रत्येक क्षण अर्थात भविष्य काळ सतत नाविण्याचे प्रयोग करीतच येत असतो. त्यामुळे गेलेला क्षण वा भूतकाळ वर्तमान काळाच्या सत्यतेला साथ देण्यास सक्षम रहात नाही. म्हणूनच तो एक असत्य विचारांत जातो. हाती फक्त राहतो तो वर्तमान काळ. एक सत्य, चैतन्यमय, चंचल Ever moving period. भविष्य काळ त्याला स्पर्श करताच त्याचे रुपांतर भूतकाळांत होऊन जाते.
बुद्धीचा जीवंतपणा म्हणजे विचारांच्या लाटा सतत निर्माण करणे. विचार उत्पन्न होणे व त्याचा लय होणे. भविष्य काळाच्या चक्रात उत्पन्न होणारे विचार एका मागोमाग एक उत्पन्न होतात. ते वर्तमान काळाच्या सिमेवर आदळत भूतकाळाच्या दालनात निघून जातात. शरीर मनाला वासना-इच्छा शक्तीचे वरदान असते. ती नैसर्गिक क्रिया शक्तीचा एक भाग असते. शरीर मनाला सतत चैतन्यमय उर्जा शक्तीमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम ह्या वासना शक्तीमुळे होत राहते.

वासना लाटाप्रमाणे उत्पन्न होत असतात. त्यातून निर्माण केला जातो उद्देश वा हेतू ( Object ). हा उद्देश शरीर मनाच्या हलचाली निर्माण करतो. भविष्यातले विचार व भूत काळांत आठवणीच्या दालनात गेलेले विचार, विचार म्हणून कदाचित मार्गदर्शक होऊ शकतील. परंतु ‘क्षणाचा’ ‘वेळेचा ‘ विचार करताना वर्तमान काळावरची तुमची पकड सत्याचे दर्शन घडवणारी ठरते.
सतत उत्पन्न होणाऱ्या विचारांना थोपून धरण्याचा प्रयत्न करणे व उत्पन्न झालेले विचार त्वरीत बाजूस सारणे ह्या दोन प्रक्रिया आहेत. तुमच्या मनाच्या चंचल स्वभावाने ह्या दोन्हीही क्रिया सतत होत राहतात. त्या क्रियांच्या होण्यामध्ये बाधा निर्माण करणे म्हणजेच मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे. विचार रहीत वातावरणाची निर्मीती करणे. Objectless Thought चे वातावरण निर्माण करणे. वर्तमान काळाचे खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणणे ह्यालाच म्हणतात. शरीरासाठी मनासाठी तुम्ही एका बाजूने भविष्याला जणू थांबवित असता व भूतकाळाला दुर सारुन ( काल्पनीक ) फक्त वर्तमान काळांत असतात. आणि हाच सत्याचा काळ असेल. ह्यालाच अनंत Infinite म्हणता येईल. यांत्रीक पद्धतीने ह्याचे मोजमाप करतां येणार नाही. परंतु आत्म्याच्या स्थरावरचा हा अनंत काळाचा क्षण असेल. ह्या ठिकाणी मिळणाऱ्या आनंदाला सिमा नसेल. Ecstasy of Joy हे सर्व फक्त ध्यान प्रक्रियेमध्ये Meditation मध्येच शक्य आहे. योग धारणा, प्राणायाम, अन्तःकरणातील मनाचा संकल्प जर मजबूत असेल, प्रयत्न तळमळीचे असतील तरच तुम्हाला वर्तमान काळामध्ये जगण्याचा खऱ्या अर्थाने अनुभव मिळू शकतो.
वर्तमान काळात विचार उत्पन्न होऊ शकत नाही. कारण भविष्यातील विचार झेपाऊन लगेच भूत काळांत जातो. त्यामुळे विचार रहीत काळ अर्थात शांतता ( Silence ) हाच वर्तमान काळाचा प्राण बनतो. ह्याच शांततेमध्ये ईश्वरी शक्तीचे आधीष्ठान वास करीत असते. ध्यान धारणेच्या सुरवातीला तुमची केलेली ईश्वरासाठीची प्रार्थना व संकल्प हा ध्यानावस्तेधील शांतता सफल करण्याचा प्रयत्न करते. शब्दाच्या ताकतीने जे साध्य होत नाही ते अव्यक्त स्थितीमुळे अर्थात शांततेच्या काळांत पूर्ण होऊ शकते. सतत वर्तमान काळांत जगा म्हणतात ते ह्याचसाठी. Experience the present by Objectless Silence.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

नदीच्या पाण्यातील ओंडके.

नदीच्या पाण्यातील ओंडके.

अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुणीही कांही न बोलण्याची विलक्षण स्वभाव शैली, ह्याना जमलेली असते. आपण भारतीय गप्पा मारणे, मन मोकळे करणे, नको त्या चौकशा करीत समर्थानाचे मार्ग शोधण्यात तरबेज असतो. ” एक हात लाकूड, त्याची दहा हात धलपी ” ह्या प्रमाणे वेळ घालविण्याची कला साध्य केलेले.
निवृत्तीचे वय. सकाळ संध्याकाळ फिरावयास जाणे. अचानक बागेमध्ये माझ्याच वयाचे एक गृहस्थ डॉ. सुब्बुराज भेटले. दक्षिण भारतातले प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले. एकमेकाचा परिचय झाला. ते पण थोड्याश्या काळाकरीता त्यांच्या मुलीकडे आले होते. विचारांची देवान घेवन झाली. थोड्याच वेळांत लक्षांत आले की आमची वैचारीक बैठक, विषय आवडी निवडी बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत. वेव्ह लेंग्थ जमली म्हणतात तसे झाले. मुख्य म्हणजे दोघेजण भारतीय असून मित्र व मन मोकळे करण्यासाठी कुणाच्या तरी सहवासाची गरज पूर्ण झाली. दोघेही आनंदी व समाधानी झालो. वेळ ठरवून दररोज भेटू लागलो. वेळ खूप मजेत जात होता. दोघांजवळ पाठीशी जीवनामधल्या प्रचंड अशा अनुभवाचे गाठोडे होते. शिवाय अध्यात्म, समाजाची कुटूंबाची बदलत चाललेली रचना वा घडी ह्यावर बोलत असू. शिक्षण क्षेत्रामध्ये होत जाणारे बदल, राजकारण अर्थकारण ह्यात होणाऱ्या प्रचंड उलाढाली, वातावरणामधले बदल इत्यादी एक नाही अनेक विषय प्रसंगानुसार हाताळले जात होते. चर्चा होत होती. मतासाठी आग्रह होत होता. दोघांचे ही अनुभव मनाला चटका देणारे, रोमांचकारी, हसवणारे, राग आणणारे, निसर्ग वा ईश्वर अप्रतीम अस्तित्वाची जाणीव देणारे होते. आगदी थोड्याशा काळांत दोघानाही एकमेका बद्दल अस्था आदर व सहवासाचे प्रेम वाटू लागले. भेटण्याची वेळ ह्याची उत्सुकता होवू लागली. वेळेचे बंधन नसल्यामुळे पूर्ण आनंद उपभोगला जाई. कधी बागेत, कधी नदीकिनारी, जात असू. वृद्धापकाळी जे लागते ते मिळू लागले. चांगली हवा, चांगले जेवण, चांगली बौद्धीक चर्चा, शरीराला तजेले करणारे फिरणे, सारे आनंदी व समाधानी चालले होते.
अचानक कौटूंबीक वैयक्तीक कारणास्तव त्याना भारतात परत जावे लागले. ते माझा प्रेमाचा व निराशमय निरोप घेऊन ते निघून गेले.
नदीकिनारी खडकावर बसलो होतो. नदीला पूर आलेला होता. ती दुथडी भरुन वाहत होती. मन खिन्न झालेले होते. कसलीतरी निराशा मनाला बेचैन करीत होती. डॉ. सुबुराज ह्यांचा अचानक परीचय झाला. फार थोड्या दिवसाचा त्यांचा सहवास लाभला. त्या सहवासाची तिवृता, ओढ, आपूलकी, आदर, वैचारीक प्रेमाची देवाण घेवाण, ही हा छोटासा काळ आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो ही जाणीव होत होती. सहवास किती काळ असावा ह्यापेक्षा कसा असावा हेच महत्वाचे ठरते.


माझे लक्ष वेधले गेले ते दुर अंतरावरावरुन दोन दिशानी पाण्यांत वाहात येणाऱ्या दोन लाकडाच्या ओंडक्याने. पाण्याच्या लाटांनी दोन्ही ओंडके जवळ आणले. एकमेका जवळ आले. प्रवाहा मध्ये बरेच अंतर ते एकत्र राहून वाहात होते. अचानक पाण्याच्या उसळणाऱ्या लाटेने त्यांना वेगळे केले. दोघांचीही दिशा व प्रवाह बदलले. ते वेगळ्या दिशेने निघून गेले. नजरेच्या टापू आड झाले.
निसर्ग, वातावरण, परिस्थीती ही अशीच आपल्याशी खेळ खेळत असते. जीवनाच्या टप्यावर प्रत्येकजण एकमेकास भेटतो. सह चालतो. आणि एक दिवस दुर निघून जातो. पाण्याचे अस्तित्व, लाटांचे वाहणे, आणि ओंडक्यांचे अवलंबून असणे, ह्याची जर खऱ्या अर्थाने जाणीव झाली तर जीवनचक्राचे ज्ञान झाले म्हणावे लागेल. त्यांत नसेल निराशा, न खंत, न दुःख. फक्त एक सत्य अनुभव—जीवनाचा मार्ग — जीवन चक्र.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com