Monthly Archives: सप्टेंबर 2010

झाडावारले निर्माल्ये !

रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने,  हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध  रंगांची  अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव  यांची भेट झाली.  हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते.  माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो.  

  ” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? ”      माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने  त्यांना एकदम आश्चर्य वाटले.  काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस पूजा केली होती. ही सारी उमललेली टपोरी फुले स्पर्श न करता, त्या ईश्वराचे चरणी अर्पण केली.  मनानेच वाहिली. आता माझ्या द्रीष्टीने ती निर्माल्य झालेली आहेत. ही फुले तुम्ही कशी देवाला वाहणार? ”  विचित्र आणि न पटणारे. परंतु तर्कज्ञानाच्या विश्लेषणाने मान्य होणारे हे तत्वज्ञान. एकनाथरावनी क्षणभर विचार केला व ते किंचित हसले. ” मी पण मानस पूजेचा विचार करीन. कदाचत निसर्गाच्या फुलण्यातल्या आनंदात, मला पण सहभागी होता येईल.” असे काहींसे पुटपुटत ते निघून गेले.  

मला  अचानक माझ्या अमेरिकेतील काही दिवसाची आठवण झाली.  मी मुलाकडे गेलो होतो. अतिशय स्वछ  आणि सुंदर  वातावरण होते. मनाला  प्रसन्न व आनंदित करणारे.  मोठे व अरुंद सिमेंटचे रस्ते. मध्य भागात Devider असून रंगी बिरंगी फुलांनी सुशोभित केलेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गवताचे मखमली गालिचे असून विविध रंगांची मनोहर फुले फुलली होती. गुलाबांची टवटवीत मोठी फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती. रस्त्याच्या कडेला आपल्यासारखी काश्मिरी गुलाबांची ताटवे ह्याचे मानस आश्यर्य वाटत होते. असे चित्र भारतामध्ये केव्हांच बघण्यात आले नव्हते. गुलाबाची टपोरी फुले, कुणाच्या घरातील बागेमध्ये किंवा एखद्या सार्वजनिक बागेमध्ये असतीलही. परंतु  त्याच्यावर नजर ठेवणारे, निगा राखणारे असतीलही. अमेरिकेत कुणीही केव्हाही फुले तोडताना बघितले नाही. किंवा  ” फुले तोडू नका ” ही सूचना देणारी, सूचनाफलक कोठेच दिसला नाही. इकडील सर्व सामान्या मध्ये  ही जाणीव इतकी रुजली आहे कि कुणीही रस्त्याच्या कडेलगतची फुले सार्वजनिक बागेतील फुले किंवा घरातील फुले  देखील झाडावरून काढीत नसतात.  झाडावरच फुलाने उमलणे,  बहरणे, आणि गळून पडणे ही नेसर्गिक प्रक्रिया त्यांच्यात घडताना दिसते.

मला ठाण्यात सकाळी फिरावयास गेलो असताना जे दृश दिसत होते ते आठवले. बरीचशी वयस्कर मंडळी सकाळी फिरण्यास जाताना दिसते. काही घरामधली बागेमाधली जास्वनदिची, कन्हेरीची, पारिजातकाची, गुलाबाची वा इतर काही मोठी झाडे, घर कुंपणाच्या बाहेर फांद्या वाढून बहरलेली दिसत. कित्येक महाभाग हाताला येतील तेवढी सर्व फुले तोडून पिशवीत जमा करतात. त्यांना त्यात आनंद वा धन्यता वाटते. पुजेसाठी ती सर्व फुले कशी मिळतील हे बघण्यातच ती प्रयत्नशील होती. मला अद्याप कळले नाही कि आपण  निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने  निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते. भावनेला जर विचाराची साथ मिळाली तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतील. ईश्वरावर नितांत श्रधा असावी हे सत्य आहे. त्याच्याशी जवळीक साधण्याच्या मार्गावर चिंतन व्हावे ही अपेक्षा.

अनुभवात ईश्वरी दर्शन !

 प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला  वा दिसला,  ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही.  परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे. आणि तो केवळ अनुभव जरी मिळाला तरी त्यात संपूर्ण समाधान व सार्थक असेल. ही भावना हेच ईश्वरी अनुभूतीचे दर्शन ठरविणारे असेल. ईश्वर निराकार अस्तित्त्वामध्ये समाजाला जातो. त्याच्या सगुण अंगाच्या  दर्शनापेक्षा प्राप्त होणाऱ्या चैतन्यमय अनुभवाच्या झलकेमध्येच, समाधानात डुबून जाणे त्याचे दर्शन झाल्याचा आनंद देणारे असेल.  कोठे शोधावयाचे त्याला ?  स्वर्गात, समुद्रात, पर्वतमय रांगात , फुलात, स्वभोवातालच्या जीव जंतू वनस्पतीमध्ये, आमच्या देहात, मनांत, कोठेही.  कोठे तो नाही? ज्या दृश अदृश वस्तू वा सभोवतालच्या वातावरणात त्याची आपणाला जाणीव होते, त्या सर्वामध्ये त्या चैतन्यमय ईश्वराचे अस्तित्त्व असते. ते फक्त जाणावे लागते. अनुभवावे लागते. निराश्या तेव्हांच  येते,  जेव्हा त्याला दृश्य स्वरुपात कुणी बघू इच्छितो.  कारण खऱ्या अर्थाने कुणीही त्याला न बघताच त्याच्या भव्य वा  दिव्य शक्ती सामर्थ्यास कल्पनेच्या आधारावर रंग रूप देण्यात आलेले आहे. तसेच स्वरूप इतरांना कसे दिसणार? फक्त दिव्यत्वाचा  वेगवेगळा  अनुभव मात्र कुणालाही येऊ शकतो.  जेव्ह्ना कित्येक प्रसंग सामान्यांना कल्पनाशक्तीच्या बाहेरचे वाटतात, विस्मयकारक असतात, मानवी विचारांच्या पलीकडले घडतात, त्याचवेळी ते निसर्गाच्या चक्रातील विशेष परंतु ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव देणारे असतात. ह्याच प्रसंगामध्ये, अनुभवामध्ये, विचारांनी एकरुप  झालात, तर त्याक्षणी ईश्वराचं  दर्शन झाल्याचा आनंद मिळाल्याचे समाधान मिळेल. प्रतिमेचा अट्टाहास, कल्पनेच्या  स्वरूपाचे  दर्शन,  मात्र निराशाच पदरी पडेल.

ईश्वर म्हणजे काय कोण कसा, ह्या प्रश्नाचे उत्तर आज पर्यंत तरी अगदी निशित स्वरुपात वा 

एकमुखाने मिळालेले नाही.आपल्या द्रीष्टीक्षेपात  ज्या ज्या    आकारामय गोष्टी दिसतात, त्याचे आम्ही नामकरण करीत गेलो. हे सारे एकमेकाच्या संवादासाठी. तो पर्वत, तो समुद्र, ती नदी, ते जंगल,  धबधबा, हवा, पाऊस, वादळ, ढग, झाडे, हिमाछादीत पठारे, सूर्य चंद्र अग्नी वारा, इत्यादी. अनेक अनेक आकारमय गोष्टी आपल्या द्र्ष्टीपटात येत जातात.    त्याला सामुहिक वा वैयक्तिक आम्ही संबोधित आलेलो आहोत. सर्व वस्तू आम्हाला समजल्या. त्याचे नाव ऐकताच  प्रत्येक वस्तू आमच्या  नजरे  समोर येते. हा समजण्याचा परिणाम होय. परंतु हे वरवरचे ज्ञान आहे. झाड म्हणजे काय, नदी म्हणजे काय, पर्वत  म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय? ह्या  अनेक  गोष्टी बद्दल आम्ही अज्ञानातच असतो. त्यांना समजतो जाणतो  त्याची बाराकाईने  विश्लेषणात्मक माहिती मिळते. येथ पर्यंतच आमच्या मर्यादा पडतात. हे सारे विज्ञान आहे.    आम्ही त्या विज्ञानातच आनंद घेतो. समाधान मानतो. परंतु हा आनंद अज्ञानाच्या रूपाने जणू पडदाच असल्याप्रमाणे आहे. वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे. सुंदर गुलाबाचे फुल बघताना, उंचावरून  पडणाऱ्या  धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या शीतल चन्द्राकडे बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा पिसारा फुललेला  असताना नाच  बघताना,  एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण  स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्रिष्टीला वस्तू दिसते, ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते  तोच ईश्वर नव्हे काय? .  म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे. अपल्या द्रीष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल. हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तर परमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोच तर ईश्वर. त्याचे ऋषीमुनींनी वर्णन केले आहे ” सत चित  आनंद ”  याचा साधा अर्थ जेंव्हा चित्त अर्थात मन सत्यमय होते   आनंदमय होते, त्याच क्षणी  प्रत्येकास त्या ईश्वराच अनुभव आलेला असतो. असे आनंदाचे क्षण आम्हास  क्वचित  प्राप्त  होतात.   जेंव्हा आमचा बघण्याचा विचाराचा स्वभावाचा दोष असतो, आमचे राग लोभ मोह अहंकार इत्यादी आम्हास त्या आनंदा पासून सतत वनछीत करतात.    प्रसन्न वा शांत मनच सभोवतालच्या परिस्थितीतून ईश्वरी आनंदाचा अनुभव मिळवू शकते. ईश्वरी अनुभवाचा उद्देश वा साध्य ह्या फक्त परमानंदातच असतो. आणि तो प्रसंगानुसार प्रत्येकाला मिळत असतो. ईश्वरी सानिध्याच्या कल्पना जेंव्हा ” सगुणरूप अपेक्षेमध्ये दर्शन”  अथवा इच्छित मनोकामना पूर्तीत असते, तेंव्हाच आपण निराशेच्या वातावरणामध्ये जातो.  संसारिक सुख दुःखाची निर्मितीच मुळी वासनेच्या पायावर आधारलेली असते. देहाच्या कार्यात वासना ( desire ) हीचा सतत सहभाग असतो. माझ्यात सभोवताली द्र्ष्टीक्षेपात अगदी जवळ असलेल्या  त्या परमेश्वराला मी माझ्या अज्ञानामुळे जाणत नसतो.  कल्पनेच्या राज्यातून त्याची जवळीक साधतो. त्याला सगुण रुपात बघू इच्छितो.  जे वाचलेले ऐकलेले पौराणिक कथामध्ये ज्याची वर्णने  समजली त्या देहमय रूपाचे आम्ही दर्शन घेऊ इच्छितो. पण हे केव्हांच घडणारे नसेल. तुमची इच्छा भावना ही केवळ अंधश्रधा ठरेल.  कुणाला काही साध्य होणे हे कदाचित प्रासंगिक म्हणून क्वचित असेल ही. तो परमात्मा म्हणजे एक विशाल प्रचंड असा निसर्ग आहे. त्याच्याच आखून दिलेल्या निअमानुसर सर्व चालत असते. विशेष कृपा वा चमत्कार यांना येथे जागा नसते. श्रीमदभग्वतगीतेच्या महान शिकवणीनुसार हे संपूर्ण विश्व ज्यात सूर्य चंद्र प्रथ्वी तारे तुम्ही आम्ही सारे सारे एकाच असून एकाचेच हे अनेक भाग असलेले आम्हास भासते. हेच अद्वैत तत्वज्ञान आहे. ( Divine presence is monism ) अथवा knowledge of Unity .  प्रत्येक पदार्थ दोन गुणांनी संपन्न असतो. एक दिसतो, भासतो, समजला जातो, हा गुणधर्म. दुसरा त्या पदार्थामध्ये शक्ती रूपाने ( उर्ज्या )  सर्वत्र पसरलेला असतो. दोन्हीही गुणधर्म एकरुप होऊनच त्या पदार्थाचे खरे अस्तित्व झालेले असते. ह्यालाच ” शिव आणि शक्ती ” स्वरूप म्हणतात. पदार्थ ( Materialistic ) म्हणून आपल्या ज्ञानद्रीयाला समजते.  त्याचा रंग रूप आकार इत्यादी परिमाणाने त्या समजतात. प्रत्येक पदार्थाला जसे स्थूल आकारमान असते, त्याच प्रमाणे तो पदार्थ अनेक वा अगणित सूक्ष्म घटकापासून बनलेला असतो. आजच्या घडीला विज्ञान शास्त्राला त्या सूक्ष्म घटकाची माहिती मिळाली त्यानुसार त्याला अणू ( ATOM ) संबोधले गेले. ह्या “अणूच्या ” अंतरंगात अनिमध्ये प्रचंड शक्तीची साठवणूक असते. आपणास ती सूक्ष्म अवस्तेत भासत असली तरी तिच्या प्रचान्दातेचे, भावातेचे, परिमाण करणे केवळ शक्य होणार नाही. आणि अनिमाधली सर्व उर्जा शक्ती ही त्या संपूर्ण पाधार्थामाधालीसतात कार्यरत परन्तुअवक्त शाकी समजली जाते. सजीव असो वा निर्जीव असो तो पदार्थ ( materialistic ) आणि त्याची शक्ती ( Energy  ) ह्याच दोन अंगानी विश्वात विखुरलेल्या आहेत. अद्वैत तत्वज्ञानामध्ये ह्यालाच परमेश्वर समजले गेले आहे. सभोवतालच्या दृश्य वस्तू  संग्रहातून आणि माझ्यातून त्याचे जसे ज्ञान होते, तसेच त्याला एकरुप होऊन अनुभवाने ( Awareness of that consciasness ) अथवा  (   तो experience of that Divine Suprime ) ह्यालाच परमेश्वराचे दर्शन झाले असे म्हणता येईल.

(चुकाबद्दल क्षमा असावी. )

पडछाया!

चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती  
संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती.   
वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग
खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग
तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली
समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली 
ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला
प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला
पडू लागले पावूल माझे मंद मंद आता
श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता 
दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी  
काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी
एकटाच मी होतो तेथे, अंधाऱ्या रात्री
प्रकाश्यातली साथ लाभली, ती छाया नव्हती
सुखामधली सोबत सुटते,  दु:खाच्या वेळी
सगेसोयरे साथ सोडती, पडत्या संकट काळी
पहाट होता बघू लागलो, पुनरपि छायेला 
सोडून गेली रात्री, त्याचा निषेध नोदविला
 छाया म्हणते:
रविकिरणांच्या संगे गेली, मीही त्यांच्या  मागे 
आठव देण्या रवि उदयाची,  त्याला मी सांगे
तुझे नि माझे अतूट नाते, त्याच्या अस्तित्वाने 
पुनरपि आले  तव सहवासे, त्याचाच साक्षीने  
 
( कविता )

 

आजी ग आजी!

 सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते. लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर  केलेल्या  असतात. तिने जीवनाचा  संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच  व्यस्त होती.  आज्ञा ऐकणे पाळणे,  वा  करणे,  ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती.   आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते.  तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात. 

आज मला माझ्या बालपणीची आठवण झाली. मी त्यावेळी दहा वर्षाचा असेन. मला शिकवण्यासाठी  एक शिक्षक  ( त्यांना आम्ही गुरुजी  म्हणत असू ) घरी येत होते.   चांगले शिक्षक परंतु अतिशय शिस्तप्रिय व कडक अश्या स्वभावाचे होते. त्याकाळी मुलांना त्यांच्या चुकाबद्दल बेशिस्तपनाबद्दल सतत मार बसे. रागावले जायचे. कोणतीही गोष्ट मुलांना समजावून सांगणे,  त्यांच्या भावना जाणणे, ह्याबाबतीत पालकांना, शिक्षकांना, आणि कोणत्याही वडील व्यक्तींना मुळीच आस्था नव्हती. हा केवळ वेळ व्याया घालविण्याचा मार्ग आहे ही त्यांची धारणा असे. ” छडी लागे  छम छम,  विद्या एयी घम घम.”  ह्या पुर्वकालीन तत्वज्ञानात त्यांचा विश्वास होता. त्याच प्रसंगी योग्य वेळी योग्य शिक्षा ही धाक व शिस्त निर्माण करते ही त्यांची अनुभव संपन्न समजूत होते. ( आता काळ पूर्ण बदलला, शिक्षक बदलये, आणि विद्यार्थीही.).

माझे शिक्षक अर्थात पूर्वकालीन होते. रोज रात्री सात वाजता ते एकतास शिकवीत असे. त्या वेळचे पाठ शिकवीत व गृहपाठ देत असे. बालवय  व विद्यार्थी म्हणून अनेक चुका करीतच शिक्षणाचा मार्ग चालला होता. मात्र चुकले की ” गाढवा, मूर्ख ” असल्या शिव्या ते देत व अधून मधून पाठीत धपाटा ही लागावीत. मी निराश होत होतो. केव्ह्ना केव्ह्ना रडू येत होते. परंतु   ” रडतोस काय असा ?” म्हणून त्यावरचा शांत करण्याचा उपाय म्हणून आणखी एखदा धपाटा पाठीत बसत असे. शिकणे तसे सारे दिव्यच  होते.   त्या वेळेला कळवळंल्याच्या आजही आठवणी येतात व हसू येते. 

माझी वेगळी  खोली  होती. खाली सतरंगी अंथरून आम्ही बसत असू. एक दिवस अचानक माझी आजी तेथे आली. तिच्याजवळ कापूस होता. ती वाती व फुलवाती करीत तेथेच बसली. नेहमीच्या सवयी प्रमाणे, माझे चुकतच ” गाढवा ही बेरीज अशी होती का?”  म्हणत गुरुजींनी  माझा कान पिळला व मला धपाटा लगावला. मी कळवळंलो. मला रडू आले. आजी जवळ होती. तिला वयाचा एक अलिखित अधिकार  मिळालेला होता.  ती उसळून गुरुजीना म्हणाली ” अहो एवढे काय मारता त्या लहान मुलाला. चुकला असेल तर समजावून सांगा.”  गुरुजी एकदम सटपटले. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांच्या वागण्यातला झालेला बदल जाणवला. आता आजीच्या केवळ तेथे अस्तित्वामुळे वातावरण बदलल्याचे माझ्या लक्षात येऊ लागले. शिक्षेऐवजी प्रेमळ शब्दात  समजावणे हे होऊ लागले. दुसऱ्या दिवसा पासून सतरंजी टाकून ठेवणे, वह्या पुस्तक पेन्सिल घेणे, ह्याच बरोबर ताटात कापूस, वाटीत थोडीशी रांगोळी आणि खिडकीजवळ आजीसाठी पाट ठेवणे हे आठवणीने केले जायचे. कदाचित त्यासाठीच व अशाच प्रसंगांना आई बाबा पासून वेगळ्याच संरक्षणाची भिंत बनणारी आजी मला खूप आवडायची.

सोनेरी तसवीर !

त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या       ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते.  भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके  मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती.  मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद  चिकटवलेला  होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या  लहानश्या  तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता.   वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन  ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले.  त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना  पेनिसिलीन  विषयी  प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान    कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या  पाऊलखुणा दाखवीत होता.

आनंद लुटणारे मन !

 

 

सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु  माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही  वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर  टिप्पणी करीत होत्या.  मान डोलावाने,  टाळ्या  वाजवणे, वाहवा ! म्हणत आपला आनंद व्यक्त करणे, चालू होते. “ काय गाण्याची चाल, किती सुंदर वाद्यसंगती जमली आहे, काय चांगली तान मारली आहेह्यातील बासरी तर किती सुमधुर वाजवली, तबल्याचा ठेका कसा धरला आहेसतारीचे बोल किती मधुर जमलेत, पेटीवादन तर अप्रतिम साधले, शंकर जयकिशन याचं संगीत खूपच मनाला मोहून टाकते, नौशादअलीचे हे गाणे काय सुरेख  जमले —– एक नाही अनेक हालचालीच्या  पैलू  मधून त्या बाई आपले संगीतातले,  गाण्यामधले आत्मिक समाधान अभिव्यक्त करीत होत्या.  न जाणो मी मात्र त्यांच्या अतिउत्साहामुळे  निराशलो होतो.  कारण त्यांच्या सततच्या हालचालीमुळे माझे लक्ष विचलीत होत होते. संगीतातील मला मिळणाऱ्या आनंदात बाधा निर्माण होत होती. तरीही माझ्या मनाला आवर घालून सारे सहन करीत होतो.

कार्यक्रम संपला. सर्व श्रोते उठून जावू लागले. मी मात्र त्या बाईंच्या उत्साहाणे बेचैन झालो होतो.   शेवटच्या क्षणी  वैचारिक बांध फुटला. मी तिला विचारले. “ तुम्हाला संगीत कार्यक्रम खूपच आवडलेला दिसतो. ” परंतु  राग येणार नसेल तर सांगू का? तुमच्या सततच्या टिप्पणीमुळे  व हालचालीमुळे शेजारच्याना त्रास होतो का हे ध्यानात घेत चला. “   ती मागे वळून किंचित हसली. ” आभारी महाशय,  मी यापुढे काळजी घेईन. मी त्याक्षणी विसरले होते की  आपणामुळे  कुणाला त्रास होत असेल. ”   ती शांत होती. मी उठून जाऊ लागलो. दाराजवळ गेल्यावर मी सहज मागे बघितले. मला जे दृश्य दिसले,  त्याने मला धक्काच बसला. तिच्याजवळ बसलेले दोघेजण तिला हाथ देवून उठवीत होते. त्यांच्या  खांद्याचा  आधार घेवून ती पाऊले टाकण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे दोन्ही पाय अपंग झाले असावे.  माझ्या डोळ्यात  एकदम अश्रू आले. माझ्या विचारांची मलाच लाज वाटली. तिचे शरीर अपंग होते, पण मन किती तजेले, उत्स्ताही  होते. जीवनात निर्माण झालेली जबदस्त उणीव ते भरून काढीत होते. मनाची उभारी, आनंदाची फवारणी करून, कोमेजून जाण्याऱ्या शरीर संपदेला टवटवीत ठेवण्याचा    प्रयत्न  करीत होती.  फुलवीत होती. ह्या जगात जगायचे कसे? ह्याचा एक आदर्शवत संदेश देत होती.       

चिखलातले कमळ

जव्हार (  ठाणे  )   ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात  Medical Superintendent  म्हणून कार्यारात होतो.  रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली   की  दोन दिवसापूर्वी  ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता,  ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती. धावपळ झाली. सर्वांनी शोधा शोध केली. शासकीय स्थरावर जे करावयाचे ते केले गेले. 

अतिशय दु:खद व मनास निराश करणारी घटना होती.  त्या बाईने हे सारे योजूनच केले असल्यामुळे,  नाव गाव पत्ता हे सारे असत्य होते. कोणता दोष त्या नवबालीकेचा ?  जन्मताच तिला तिच्या जन्मदात्या आईने तिला टाकून दिले. जगात जगण्यासाठी लढण्याचा संदेश देवून,  ती माय मावूली निघून गेली.  तिच्या सर्वतो वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले गेले. मुल वाढू लागले.  शुश्रुषा करणाऱ्यानी तिचे नाव दुर्गा ठेवले. कुणाचे प्रारब्ध्   कुणीही हिरावून घेवू शकत नाही. त्या लहान बालिकेच्या ललाटी जे निसर्गाने  लिहिले तेच तिला मिळणार. हे सत्य आहे.

 एक दिवस एक प्रौढ जोडपे रुग्णालयात आले.  त्यांना मुलबाळ नव्हते.  त्या मुलीला ते दत्तक घेवू इच्छित होते.   स्थानिक श्रीमंत शेतकरी कुटुंब घरदार व स्वत: गेली दहा वर्षे अमेरिकेत  New Jersey   येते  मोठ्या      कंपनीत अधिकारी होते.  भारतात दर दोन वर्षांनी येत  असे. चर्चा झाली.  त्यांनी कायदेशीर अर्ज केला. सर्व संबंधित  शासकीय यंत्रने मार्फत परवानग्या मिळाल्या.  मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.  तीच मुलगी  करोडो  रुपयाच्या  संपत्तीची  कायदेशीर मालक बनली.  ह्याला काय म्हणावे?  निसर्गाची एक विचित्र परंतु आकर्षक  खेळी.  हृदह्याला   भिडणारी जीवनकथा.

 सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला.  दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो,  Washington येथील President’s  White House   बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते  कल्पनातीत होते

बागेतल्या तारका

बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी
रात्र पडुनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      1
 
बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे 
लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे           2
 
अगणित बघुनी  संख्यावारती     प्रसन्न झाले मन 
किती वेळ तो निघुनी गेला        राहिले नाही भान         3
 
शितलेतेच्या  वातावरणी           शांत झोप लागली
नयन उघडता बघितले मी      पहाट ती झाली           4
 
गेल्या निघून सर्व तारका       आकाशाला सोडूनी
शोधू लागले नयन माझे         त्यांना सर्व दिशांनी         5
 
चकित झालो फुले बघुनि मी      सुंदर फुललेली
सुचवित होती मिश्कील्तेने          का तारकांच खाली ?   6

अंगठ्याचा ठसा

गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये  पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” “किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.”  मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले.   त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची  झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई  विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण  झाली होती, त्याला केवळ त्या आकड्याने धक्का बसला. मी तिचा फार्म घेत पासबुक मागितले. अपडेटेड  असलेले  पास बुक  बघून  मी पुन्हा आवक झालो. त्यात थोडे थोडके पैसे नसून पांच लाख पेक्षा जास्त रक्कम होती. क्षणभर स्वताहाच्या समजा  बद्दल आणि परिस्थितिच्या अव्लोकित सामर्थ्या बद्दल थोडिशी  खंत वाटली. जास्त चौकाशी न करता, मी तिचा पैसे  काढण्याचा फार्म भरुण  दिला. तिला स्वक्षारी करण्यास संगीतले. ती  चटकन पुढे आली. वा तिने अपल्या दाव्या हाताचा अंगठा पुढे केला  “ मल लिव्हन एत नाही.  मी नेहमी डाव्या  हाताच्या  अंगठ्याचा ठसाच् देत असते.”  ती सहज  म्हणाली..    

“अग मावशे तुझी कामालच  आहे.  तुझ्या पासबुकात भरपूर पैसे आहेत. तुला लिहिता वाचता  एत नाही. तू अंगठ्याचा ठसा देतेस. कुणीतरी फसवील याची भीती वाटत नाही का?”  मी गंमत  म्हणून विचारले. हा ती मिश्कील्तेने म्हणाली, “ अहो सहीसारखी सही करून माणस  फसवितात कि. साह्यान धोका होऊ शकतो.  परंतु अंगठ्याच्या ठशाला नाही. माणस माणसालाच फासावितील परंतु माणूस देवाला फसवू शकेल का? साऱ्या जगात माझ्या हाताच्या अंगठ्यावानी दुसरा अंगठा कोठे मिळेल? हा अंगठा देवाची ठेव आहे. त्याच्या सारखा दुसरा मिळणार नाही. लोक लबाडी करतात ती साह्याची आणि लिखापढीची. मला कोण फसणार? “

             एक नैसर्गिक सत्य. महान तत्वज्ञान. तिच्या तथाकथित अशिक्षीत मुखातून   माझ्या तथाकथित सुशक्षित डोक्यावर आदळले जात असल्याच्या भास होऊ लागला.  समाज गैरसमज ह्याची दरी कोणत्या दिशेने रुंदावत जाते. ह्याचे माणसाला भान राहत नाही.  आजच्या आधुनिक युगाने   आणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनी सुध्या  ओळख  माण्यतेसाठी अंगठ्याचा  ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंक, शब्द, खुणा, प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभव संपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.

गायीचे प्रेम

रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती.  फक्त मानेची व शेपटीची  हालचाल अधून मधून चालू होती.  कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा  येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व  अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत  होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या   त्या गायीला,  प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे,  हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,   जणू तेहतीस  कोटी देवांचे  दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते.

तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती.  ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच  येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून  स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.

एक दहा वर्षाचा मुलगा हातात पिशवी घेवून तेथे आला. त्याने पिशवीतून प्रथम एक मोठा ब्रेड काढला. गाईचे लक्ष जातच ती त्याचावर झेपावली.  अतिशय अधाशीपणे तिने तो सर्व ब्रेड क्षणात  खावून टाकला. मुलगा बघतच होता. गायीला हात लावून तो निघून गेला.  गाय हलके हलके वळून दूर जाण्याऱ्या त्या अनामिक मुलाला बघत होती. तिच्या डोळ्यातून बाहेर पडनार्या  नजरेमधून तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद दिले जात असल्याचा संकेत स्पष्टपणे जाणवत होता.