Monthly Archives: ऑगस्ट 2020

गांवमामा

जीवनाच्या रगाड्यातून

गांवमामा

हा  एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग

गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने  गांवमामा   झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय  प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव,  मदत  करण्याची आंतरिक  इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे  मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना  आपल्या वागनुकीने  सर्व समाज अर्थात  ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच  परिवार. लहान कुटुंब व सुखी कुटुंब ह्या व्याख्येमध्ये सीमित.शेती हा प्रमुख व्यवसाय होता. गांवातील लहान सहान कामे करून पैसे मिळत ते मिळवीत.  मुलगा मोठा झाला. शहारांत जाऊन वेगळा व्यवसाय करू लागला. शेती करण्यात त्याला न रुची ना सवड. लग्न झाल   स्वत: चा वेगळाच संसार  शहरामध्ये थाटला. आधुनिकतेमध्ये  जाण्यात आनंद घेत असे  ज्या गोष्टी  खेड्यात त्याला मिळत नव्हत्या  त्या  सर्व शहरी जीवनात मुबलक मिळू लागल्या.   त्याला दोन मुले झाली.  गोविंद मामा व जानकीबाई  दोघेच खेड्यात रहात होते.  सर्व गावाला भूषण  असलेले व सतत आनंद देणारे गोविंदमामा गांव मंडळीना उत्तम संस्कार  देण्यात यशस्वी झाले. परंतु आपल्या स्वता:च्या मुलाला आपुलकी व सह जीवनाचा पाठ शिकऊ शकले नाही. तो अलिप्त रहाण्यात  समाधान  मानीत  होता. 

गोविंद मामांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पत्नीवर जणू आकाश कोसळले. परंतु काय करणार. मुलाचा आधार  असून तिला मिळाला नाही. अच्यानक एक दिवशी  त्यांना  शासकीय पत्रक  मीळाले.  त्यांच्या खेडे गांवाजवळून  एक पाण्याची  मोठी धरण योजना  शासनाने आखली होती. गोविंद मामाची शेती त्या योजना अंतर्गत शासकीय कार्यसाठी  जमा केली जाणार असल्यची नोटीस होती. जानकीबाई साठी ते संकटच  होते. गोविंदमामानी जे प्रेम गांवात पेरले होते, त्याला चांगलीच फळे येणार होती. सर्व गांवकरी  एकत्र जमा झाले. त्यांना धरण  योजने बद्दल सहानुभूती होती. ती योजना राबवावी परंतु त्याच वेळी जानकीबाईना  त्यांच्या  शेतीची योग्य  व चांगली  किंमत दिली  जावी हा  त्यांचा  प्रयत्न. होता. सर्वजन एक झाले. प्रकरण थेट  मंत्र्यापर्यंत  मंत्रालयात गाजले. प्रचंड धावपळ व प्रयत्न झाले. जानकी बाईंच्या नावे त्या शेतीच्या मोबदल्यात २६ लाख रुपयाचा धनादेश जरी केला गेला. शेती जी कोणतेही उत्पन्न देत नव्हती, केवळ डोंगराळ  भागाजवळ  असल्यामुळे धारण योजनेत गेली. परंतु एक प्रचंड रक्कम जानकी बाईना देवून गेली. गोविंद मामाचे प्रेम आणि  गांवमामा बनण्याचे योग्य इनाम देऊन गेले. त्यांच्या पश्च्यात  जानकीबाई त्या ठेवीच्या  व्याजावर समाधानी जीवन जगत होत्या.  

डॉ. भगवान नागापूरकर 

९००४०७९८५०

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

जीवनाच्या रगाड्यातून

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी आले होते. त्यांनी घरांत पांच वर्षापर्यंत कुणी बालके आहेत कां ? म्हणून चौकशी केली. मी लगेच पुढे झालो व माझ्या नातीस बोलावले.  तिने नुकतेच चार वर्षे पूर्ण केले होते. तिला त्यांनी पोलिओचा डोस पाजला. त्यांनी  तिचे नांव लिहून घेतले. पुन्हा त्यांनी विचरण केली की ” घरांत आणखी कुणी लहान मुल  आहे कां? “    आम्हाला न सांगताच , मानसी, माझी नात घरात गेली व लगेच परत आली. ती त्यांना विचारू लागली ” काका  माझ्या सोनुलापण पोलिओचा डोस देणार कां? ” थोडेसे कौतुक परंतु संभ्रमित होऊन ते तिच्या प्रश्नाकडे निरखून बघू लागले. आपल्या हातातील बाहुली उंचावून  दाखवीत ती म्हणाली ” ही माझी सोनू “ 

 आणि सर्वजणच हास्याच्या लाटेत वाहून गेलो. कालचक्राचा वेग बघून  खूपच  आश्चर्य  वाटते. लहान मुलांचे बोल ऐकून  त्यांच्यातील वैचारिक समज ही अनेक वेळा चकित करून टाकते. केंव्हा केंव्हा त्यांत विनोद ही निर्माण होतात. दूर दर्शन आणि त्यावरील जाहिराती मुलांना मुखोतगत होऊ लागल्या 

आहेत. त्या सुरांत म्हणताना एक आनंद लुटीत असल्याचे अनेकदा दिसते.  नातीने जी विचारणा केली होती, त्यात सत्य होते, चौकस बुद्धी होती, त्यात सहजता होती. विनोदी  बोलण्याची इच्छा नव्हती, परंतु जे तिने विचारले, त्यात विनोद झाला होता.  

जेष्ठाच्या  ह्याच चौकशीला मार्मिकता व गम्मत म्हणून  ठरविले   गेले असते.   कसे कां होईना  ऐकनाऱ्याला ते आनंदच देणार नाही कां?

 डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०