Tag Archives: जीननाच्या रगाड्यातून

एकत्र सर्पालय व बेडूकालय !

एकत्र सर्पालय व बेडूकालय !

दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते.  अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे,  दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे

त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्यांचीही प्रजनन क्रिया देखील वाढत राहावी,  ह्याचेपण वातावरण आयोजकांनी व प्रशासनांनी निर्माण केलेले होते. गंमत वाटलीकी साप व त्याचे खाद्य बेडूक व मासे एकाच वातावरणात जीवन  कंठीत होते. ज्याप्रमाणे आम्ही जंगलात वाघ सिंह आणि त्याच वेळी  हरीण झेब्रे ह्यांचेही कळप हे ही बघितले. जीवन मरणाचा आनंद व संघर्ष यांची कला निसर्ग  शिकवतच असतो. वेटोळे घालून शांत पडलेले वा  हालचाली करणारे अनेक सर्प, दिसत होते. आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे कित्येक बेडूक हे तेथील सापावरही  आरूढ होऊन बसलेले  दिसले.आम्हाला मार्ग दर्शकांनी सांगितले कि सापाचे पोट रिकामे असेल, तो उपाशी असेल तरच स्वत:चे भक्ष्य म्हणून बेडकाला व माशाला खातो.  एरवी कधी नाही. शिकाऱ्याच्या भूमिकेत साप वेगळाच व चपळ बनतो, त्याचा हालचाली वेधक बनतात. भक्ष्याना त्याची  जाण येते. तेही आपला जीव  वाचवण्यासाठी धावपळ करतात. इतर वेळी तेही बेफिकीर असतात. पोट भरलेला साप हा अनेक दिवस भक्षविना राहू शकतो. ही एक चांगली रचना. जेंव्हा भूक तेंव्हाच भक्ष्य  त्यावर लक्ष.     हा प्राण्यामधला निसर्गाचा गुणधर्म असतो. मानव प्राणी हाच जेवण झाल्या बरोबर पुढच्या जेवणाची काळजी करतो, तश्या तरतुदी देखील करीत असतो. साठा करणे हा फक्त मानवाचाच गुणधर्म. ह्याचमुळे शिकारी प्राणी व त्याचे भक्ष्य  प्राणी बराच काळ पर्यंत  एकत्र राहतात. एकमेकांना हानी पोहचवत  नसतात. हा निसर्गच गुणधर्म भक्ष्य होऊ घातलेल्या प्राण्यासाठी दिलासा देणारा निश्चितच असेल.

शिकारी अथवा शिकार दोन्हीही भूमिका त्यांच्या जीवन चक्रात सतत होत राहतात. ह्यालाच म्हणतात

    जीवो – जीवनस्य जीवनाम.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

भिकाऱ्याची अनमोल मदत !

भिकाऱ्याची अनमोल मदत !

संध्याकाळी फिरण्यास निघालो. बागेच्या दारापाशी एक ग्रंथ विक्रेत्याचे वाहन उभे होते. विशेष पुस्तकांची विक्री चालू होती. माझी नजर एका दुर्मिळ ग्रंथावर पडली. गेली कित्येक दिवस ते पुस्तक मी मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रकाशक, ग्रंथ भांडार, यांच्याकडून कळले होते कि त्याची नवीन आवृती येण्यास अवधी लागेल. मी ते विकत घेण्यासाठी पाकीट काढले. चार रुपये कमी पडत होते. हतबल झालो. पुस्तक विक्रेता नोकर माणूस होता. गाडी दूर गावची असून, लगेच जाणार होती. जवळपास कुणी परिचित दिसेना. सारे मार्ग खुंटले. मी निराश झालो. विवंचनेत पडलो. त्याच वेळी एक भिकारी, हात पुढे करून  मला भिक मागू लागला. ते सहन झाले नाही. मी हात करून त्याला  जाण्याची  खून केली. तो नमस्कार करून जाऊ लागला.  अचानक  मला त्याच्या हातात काही  नाणी दिसली.  एक विचार मनात चमकला. मी त्याला बोलावले.

” आहो तुमच्याकडे किती रुपये आहेत?”  मी विचारले.

” फक्त सहा रुपये साहेब. माझे ह्यात पोट कसे भरणार? “ तो म्हणाला.

” चल मी तुला जेवण देतो. प्रथम माझे एक काम कर ” मी म्हणालो.

त्याच्या चेहऱ्यावर  आनंद दिसला.

अर्थात् त्याच्या मदतीने,  माझे काम झाले. माझ्या करीता ते दुर्मिळ  पुस्तक मला मीळाले.  मी त्याला घरी घेउन आलो. मी त्याला जेऊ घेताले.

एका अनामिक, परन्तु   वेळेवर मदत ( Timely help )  करणाऱ्या  त्या व्यक्तीला, मी  कधीही विसरणे शक्य नाही.

परीस्थीतिचे  वलय फक्त वेळे भोवती फिरत असते. क्षणाचे महत्व  म्हणतात  ते ह्यासाठीच. जीवनाच्या एखाद्या प्रसंगी वेळ  ही तिचे महत्व  अतिशय कौशल्याने आपल्या मनावर बिमबवते. हा क्षण चुकला, हा क्षण मिळाला असता तर असे झाले असते. हा वाक्प्रचार  त्याच मुळे झालेला वाटतो. केंव्हा केंव्हा तर तुमच्या संपूर्ण  आयुष्याचे मोल ठरविण्याचे कार्य तो एक क्षणच करतो. भिकाऱ्या कडून योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे,  ह्यातील खरे तत्वज्ञान  मला पूर्णपणे जाणवले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान  घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.   मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.

” हे परमेश्वरा  काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ?  ” बघ किती माणसे  दगावलीत,  त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष?  तू तर ह्या जगाचा कर्ता करविता.  ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.”

अचानक प्रकाशाचे तेज वाढल्याचे जाणवले. समोर काही तरी हालचाल जाणवली. आणि शब्द ऐकू   येऊ लागले. मी एकाग्रतेने ऐकू लागलो.

” मीच ह्या सर्व विश्वाचा निर्माता. नदी नाले तलाव डोंगर वृक्ष वेली विविध वन्य प्राणी, आणि मानव. सर्वानीच आनंदाने जगावे ही योजना. माणसाला विचार करण्याची झेप  बऱ्याच वरच्या  दर्ज्याची  दिली  गेली.   हेतू हा कि त्याने माझ्या निर्मितीला सहकार्य करावे. साह्य करावे. परंतु तो स्वार्थी वा अहंकारी बनत चालला. हे सारे जग त्याचाचसाठी असल्याचा त्याने गृह करून घेतला. सर्व नैसर्गिक योजनांना  त्याने खीळ घालण्यास सुरवात केली. झाडे झुडपे, वृक्षलता, जीवप्राणी,  ह्यांची बेसुमार कत्तल चालविली, हवा पाणी अन्न ह्यांचे संतुलन बिघडून टाकण्याचा सपाटा चालविला. पर्यावरण खलास होऊ पाहत आहे. एक जीव निर्माण केला गेला.  त्यात कांही गुणधर्म दिले गेले. ते त्याच्या रक्त मास पेशीत घातले. त्यातून तसेच पुनर्निर्मिती करण्याची योजना दिली. परंतु ह्या सरळ साध्या  मार्गाची  वाट चालण्या ऐवजी  मानवाने दिलेल्या  ज्ञानाचा अहंकारी दुरुपयोग सुरु केला. त्याच रक्त मास पेशी यांच्या गुणधर्माचा  गैर उपयोग करून, संमिश्र करून एक नवीन रक्त पेशी वा मास निर्माण करण्याचे  दु:साहस केले. कोणत्याही पेशीचे एकत्रीकरण करून वेगळ्याच जीवाची निर्मिती केली. सर्वात जो सूक्ष्म विषाणू  निर्मिला  होता,  त्याचे म्यूटेषण होत होत त्यापासून विविध विषाणूची निर्मिती होत गेली. ह्याच दुर्देवी मानवी  दु:साहसात आणि त्याच्या निरनिराळ्या रासायनिक प्रयोगात स्वाईन फ्लूच्या विषाणूची निर्मिती झाल्याची  शक्यता नाकारता येत नाही. तोच आता फोफावत आहे. ” –  – –

“  मी एकदाच भस्मासुराला निर्माण केले होते, त्याची खंत आजही वाटते. पुन्हा तो तसा निर्माण झाला नाही. परंतु हा स्वार्थी अहंकारी मानव तर आपल्याच दुष्ट प्रवृतीने अनेक भस्मासुर निर्माण करीत आहे. जे ह्या माझ्या सुंदर निर्मित जगाचा नाश करतील. ह्याला मी पायबंध घालण्यास असमर्थ आहे. कारण जे मी ज्या नियमाच्या आधारे निर्मिले,  त्यात बदल मुळीच केला जाणार नाही. पुढे काय होणार हे फक्त तो मानवच जाणे. “

अत्यंत निराश मानाने मी हे शब्द ऐकत होतो

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

सुप्त शास्त्रज्ञ !

सुप्त शास्त्रज्ञ !

बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे. तो लगेच दिसणारे चित्र काढण्याचा प्रयत्न करी. बाबू माझा शालेय जीवनामधील मित्र. परंतु गरिबी मुळे  तो फक्त शालेय शिक्षणच पुरे करु शकला.  माझी आवड माझ्या स्वभावाची ठेवण  ही बऱ्याच अंशी त्याच्याशी  मिळती जुळती होती. म्हणून आमच्या दोघांचे बरेच सख्य जमले होते. तो स्वत: खूप कष्टाळू होता. इतरांचेही कामे  करण्यात  त्याला समाधान व आनंद मिळत होता. अभ्यासात फार हुशार नव्हता. परंतु सर्व सामान्य विद्यार्थी म्हणून शिस्तप्रिय व सुस्वभावी होता. त्याचे हस्ताक्षर चांगले होते. रांगोळ्या काढण्यात तरबेज होता. प्रत्येक घटनेमध्ये दिसणाऱ्या वेगळेपणात त्याचा दृष्टीकोन शास्त्रीय उकल करण्याच होता. असलेल्या ज्ञानाच्या मर्यादा, कदाचित त्याचा  तर्कबुद्धीला बंधनकारक होत असाव्यात. एकदा गावी गारांचा पाऊस पडला. आम्ही अंगणात होतो. टप टप पडणाऱ्या गारा त्याने गोळा केल्या. माझ्या हातावर ठेवल्या. याला गारा का म्हटले, कळत नाही. हे बर्फाचे खडेच आहेत. ढग तर हवेचे वाफेचे असतात, त्यात पाणी असते. मग गारा कोठे बनतात.त्याला वेळ लागत असेल ना ? पाणी पडताना गारा बनतात कि वरच बनून जमिनीवर पडतात.”   अशी  प्रकारची अनेक प्रश्ने, त्याचा मनांत येत असत. आणि ते तो प्रकट करीत असे. इंद्र धनुषाचे रंग दाखविताना, त्याचे विश्लेषण करतना त्याला समाधान वाटत  होते.  बागेमधली उमललेली फुले बघताना, “ ही किती छोटी काळी, ही त्यापेक्षा मोठी, ही तर टपोरी काळी, हे बघ ही फुलण्याची क्रिया  सुरु झालेली काळी, आणि हे पूर्ण ” उमललेले  फुल. “  फुलांच्या उमलणाऱ्या क्रिया तो अतिशय बारकाव्याने बघत होता. निरीक्षण व वर्णन करण्यात त्याला आनंद होत असल्याचे जाणवत होते. परंतु फुले पाने वा काळ्या तोडण्यास त्याचा  विरोद्ध असे. निसर्गाला त्याच्याच पद्धतीने फुलू द्या, सुगंध देऊ द्या व झाडावरच कोमेजून  जाऊ द्या. ती नंतर जमिनीत जातील. “  हे त्याचे सांगणे असे. सहलीला गेलो असता, एक धबधब्याजवळ आम्ही उंचा वरून पाण्याचे पडणे बघत होतो.  ” लक्ष दे, तू ऐकलस ते.  पाणी पडण्याच आवाज कसा येतो बघ. सतत अधून मधून कमी जास्त, किती लयबद्ध, आणि पुन्हा त्याच प्रकारे चक्राप्रमाणे भासणारा. ए ही गमत बघ. कसे पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतात. आणि त्यावर पडलेल्या सूर्य किरनामुळे तेथेही आकाशात दिसणारे इंद्र धनुष्य दिसत आहे.”   बाबू हे वर्णन तल्लीन  होऊन करीत असे. फक्त हे घडले, असे दिसले, हाच त्याचा बघण्या बोलण्यातील आनंद दिसला. हे असे कां घडते ह्याचे शास्त्रीय कारण समजण्याची त्याची झेप दिसली नाही.

कोकिळेच्या  मारलेल्या ताना, पक्षाचा चिवचिवाट वा कलकलाट , ऐकून तो माझेही लक्ष त्यांच्या आवाजाकडे देण्यास सुचवीत होता. पौर्णिमेचे चांदणे,  थंडगार हवा हे त्याचे लक्ष खेचीत होते. त्यांचा मंजुळ आवाज ऐकून

” बघ ही हवा माझ्या कानात कांही  तरी सांगत आहे. पण मला तिची  भाषा  येत नाही. “  तो हसायचा.

अझ्याक न्युटनने झाडावरून पडणाऱ्या फळाकडे  बघीतले आणि जगाला गुरुत्वाकृष्णाचे ज्ञान मीळाले.  जार्ज स्टीवन्सन याने गरम चहाची किटली व त्यावर वाफेमुळे हलणारे झाकण

बघीतले, आणि वाफेच्या शक्ती  बद्दल शोध लावला. वाफेचे इंजिन बनविले. जगातले अनेक शोध फारसे शिक्षण न घेतलेल्या संशोधकांनी लावले. ते दैनंदिन निसर्ग बघत होते. असे का घडते ह्याची त्यांना उत्सुक्ता लागली. जगाला शोध कळले. बाबू हा देखील त्याच पठडीतला होता. समोरच्या प्रत्येक नैसर्गिक हालचालीमधला अविष्कार तो हेरत होता. त्याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. निसर्ग योजनांचा परिचय करून घेत होता. त्याची बाल वयातील  चौकस बुद्धी, निसर्गाचे निरीक्षण,  त्याचे कारण जाणण्याची जिज्ञासा विलक्षण होती. आज वाटते की त्याचात एक सुप्त शास्त्रज्ञ लपलेला होता. तो उफाळून बाहेर आला नाही. 

हे बाबूचे नव्हे,- –  तर जगाचे दुर्भाग्य नव्हे काय ? .

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा

दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा

मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे,  काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला. त्यावरती दहा मेणबत्या लाऊन एकदम फुंकून  विझउन  टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट Happy  Birth  Day  चे गाणे म्हंटले गेले. फुगे फोडणे, गाणे, नाचणे झाले. सर्वाना खाण्याच्या डिशेस दिल्या गेल्या. आनंदामध्ये सर्वांनी वेळ घालविला. नातवाला अनेक भेट वस्तू मिळाल्या. आठवणीने त्याने फोन करून, काकांकडे अमेरिकेत गेलेल्या आजोबाना, हा आनंदमय वाढ दिवसाचा वृतांत सांगितला. आजोबा भारावून गेले.  “ आजोबा माझ्या वाढ दिवसाला मला काय देणार ? “

त्यांचे डोळे पाणावले. नातवंड ही दुधावरची साय असते म्हणतात. अर्थात समाधानाचा उच्य बिंदू. हा निसर्ग असतो. त्यात कृत्रिमता नसते.

“ काय देऊ मी तुला बाळा,  माझे कुणालाही काही देण्याचे दिवस आता संपलेले आहेत. आता जर कुणी काही मलाच देईल, तर ते आनंदाने घेण्याचा हा माझा   काळ. हां! मला वयाचा अधिकार आणि अनुभवाची गाठोडी मिळालेली आहे. त्यातूनच मी तुला काही देऊ इच्छितो.  हे मात्र निश्चीत कि जर तू घेण्यामध्ये, ग्रहण करण्यामध्ये,  रुची प्रेम  व आदर  व्यक्त केलास, तर ती भेट तुला मिळालेल्या इतर कोणत्याही भेटीपेक्षा खूपच चांगली व वरचढ  असेल. कदाचित तुझ्या जीवनाला एक वेगळीच दिशा देणारी ठरेल.”

“ आजोबा ती कोणती ते मला सांगा. तुम्ही सांगाल ते मी करेन. ”

“ प्रथम तुला तुझ्या दहाव्या वाढ दिवसाच्या शुभेच्या आणि आशिर्वाद. खूप आभास कर. शहाणा हो. कुटुंबाच्या नावाला पुढे आण. चांगला नागरिक बनून नाव कमव. तुझा हा दहावा वाढ दिवस, जीवन चक्रामधील अत्यंत महत्वाची पायरी  असते.    शुशू म्हणून, बालक म्हणून, लहान मुल म्हणून, तू आजपर्यंत जगलास. बाल्यावस्थेचा हा तूझा काळ  संपवून, तू आता वेगळ्या दालनात पाउल ठेवीत आहेस.  वय काळ साधारण १० ते १५ ह्याला  पौगनडावस्था म्हटले जाते. जीवनाच्या तारूण्यावस्थेमध्ये पदार्पण करण्याच्या पूर्वीचा हा काळ. व्यक्ती म्हणून जगण्याची ही पूर्व पीठिका असते. निसर्गाचा Reharsal of  adulthood period  म्हणा हवे तर. ह्याच काळात तुझ्या शरीर  ( Physical )  आणि मानसिक  ( Psychological )  वाढीमध्ये एकदम वाढ होऊ लागते. त्यावाढीचा काळ  तुला तुझ्या तरुण बनण्यास  मदत करणारा असतो.  वाढीच्या आलेखामधली ही एक झेप असते.

तुझी आज पर्यंत वाढत जाणारी समज  अर्थात ज्ञान हे ह्या एकदम वाढत जाणाऱ्या  फरकाला  समजण्यास सक्षम होउ लगते.  फक्त तुला सतर्क राहण्याची गरज  असते. चांगले, सदाचारी  भव्य व्यक्तीमत्व  अंगीकारणे अथवा  वाईट प्रवृतीना, हेकेखोर अहंकारी स्वभावाला जवळ करणे, सद्गुणाचे वा दुर्गुणाचे दोन्हीही मार्ग तुला समोर दिसू लागतात. त्यात तुला आवड निर्माण होऊन  कोणत्या मार्गाने जायचे, हे केवळ तू स्वत: च ठरवू शकतोस.

आजपर्यंत तू अर्जुनाच्या, भीमाच्या, एकलव्याच्या, शिवाजीच्या, कृष्णाच्या, रामाच्या, हनुमानाच्या, व अशाच व्यक्तींच्या कथा ऐकल्या आहेस. तसेच  Harry  Potter, Spider Man, Supper Man, घटोत्कच, इत्यादींच्या कथा ऐकल्या, वाचल्या, वा बघितल्या. त्यात तू आनंद घेत होतास. परंतु आता त्या त्या व्यक्तींच्या  चमत्कारामध्ये, दिव्य शक्तीमध्ये, तू एकरुप होण्याचा प्रयत्न करशील. मीच भीम आहे, मीच अर्जुन आहे, मीच हनुमान आहे, यांच्या भूमिकेत जाशील. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुझ्या शारीरिक वा मानसिक हालचाली होऊ लागतील. स्वभावातील हे बदल इतरानाही जाणवतील. ” तू देखील  त्यांच्या प्रमाणे भव्य हो ” हा निसर्गाचा तुला संदेश असला, तरी तुला त्याची सत्यता, आणि वास्तविकता, ह्याचे सतत भान असावे. भावी अर्जुन वा भीम वा हनुमान हो – ह्या संदेशा बरोबरच, आज तू ते नाहीस, ह्याची जाणीव असुदे. कल्पना रम्यतेत आकाशामध्ये भरारी घेण्याचे हे वय असते. वस्त्व्यतेला विसरायला लावणारे हे वय आहे.     ह्यासाठी नेहमी सतर्क राहा. ध्येय मात्र भव्यतेचे असू दे.

वाढ दिवसाच्या निमित्य एक वही लिहिण्यास सुरवात कर. रोज एक पान लिही. आजचा दिवस तू कसा घालविलास. त्यात तुझ्या अभ्यासाची, खेळाची, मित्रांच्या गाठी भेटींची, आई बाबा वा इतर नातेवाईक यांच्या संपर्काची नोंद घेत जा. काही विशेष घडले ते टिपत जा. फक्त जे सत्य तेच लिही. हे केवळ तुझ्यासाठीच असावे. रोज झोपण्यापूर्वी ते तूच वाचवे. चिंतन कर, चर्च्या केव्हाच नको. रात्री झोपताना व सकाळी उठताच तुला प्रिय असलेल्या देवाला वंदन कर. ज्या ज्या वेळी कोणताही चांगला विचार तुझ्या  वाचण्यात आला, तर तो लगेच लिहून घे. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर.

मी स्वत: बघितलेल्या, ज्या थोर व्यक्ती झाल्या आहेत, त्यांचेच हे वर्णन आहे. हाच माझा अनुभव लक्षात राहू दे. तुला आशीर्वाद- आजोबा.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

 

,

.

” भूमिका “- – – आजोबांची !

” भूमिका “- – – आजोबांची !

 

 आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले.  क्रिकेट चेंडू  फेकणे घरातच झाले. फ्रेम पडली व फुटली. हे सारे बालवयातील त्यांना आनंद व मजा  देणारे, परंतु इतरांना वैताग आणणारे होते. सुटीचा दिवस तेंव्हा घरी त्यांचे आई बाबा दोघेही होते. सहन शक्तीचा अंत बघणारे झाले, तेंव्हा बाबा उठले, रागावले, थोडीशी शिक्षा पण केली. त्यांचे सारे खेळ बंद केले.

” आज कोठेही बाहेर बागेत जायचे नाही.”  हीच शिक्षा, बाबा ओरडले.

रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.

” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती. त्यांना आज बाहेर बागेत जाण्याची बंदी घालण्यात आलेली होती. आजोबा म्हणजे बाबांचे बाबा. सर्वात मोठे. हा विश्वास व अपेक्षा घेऊन नातू धावत बिलगला.  मुलांना फक्त येथपर्यंतच थोडस गणित समजत होत. वय अधिकार आणि भूमिका हेच  ते गणित. वयाबद्दल खूपस कळलेल होत. मोठे म्हणजे सर्व आधिकार असलेली व्यक्ती, ही त्यांची समाज. भूमिका ही संकल्पनाच  त्यांना माहित नव्हती. जीवनाच्या त्रिकोण मधली महत्वाची बाजू. वय आणि आधिकार ह्या जर दोन बाजू असतील, तर त्या त्रिकोणाचा पाया ” भूमिका ”  असते.  व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये ह्या तिन्हीही बाबी महत्वाच्या असतात. ह्या मानवी सामाजिक व कौटुंबिक संकल्पना होत. वयाप्रमाणे व्यक्तीवर बंधने, कर्तव्ये, आणि त्याप्रमाणे मिळणारे अधिकार आपोआपच मिळत राहतात. ह्यामधून निर्माण होती, ती भूमिकांची साखळी. ती त्याला तशीच वठवावी लागते. त्या भूमिका असतात- बाल वय, विद्यर्थी, तारुण्य, प्रौढत्व, आणि जीवनाच्या अनुभवाचे गाठोडे बांधीत,  शेवटी येते ते जेष्टत्व. जसे वय निघून जाते, त्याच वेळी त्या त्या वयाची कर्तव्ये व अधिकार, ही देखील निघून जातात. भूमिका बदलत जातात. जेष्टाच्या भूमिकेत असते, ते फक्त बघणे, जे समोर घडत आहे ते. ऐकणे जे ऐकू  येईल तेवढेच.  मात्र न बोलणे.  सर्वात  महत्वाचे  म्हणजे जे होत आहे, ते चांगल्याकरिता  व  चांगलेच होत आहे, ही मानसिकता बाळगणे. आणि हीच भूमिका वठवणे. त्यातच मनाची शांतता लाभेल.

प्रेमाचा आलेला कढ, आणि किंचित पाणावलेले डोळे, ह्यांना रोखीत,

मी नातवाच्या डोक्यावरून  हात फिरवीत म्हटले

” तुझ्या बाबाना विचारून,  मज बरोबर बागेत चल. “

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

युगपुरुषाचे दर्शन-

   युगपुरुषाचे दर्शन-

१९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धार्थ महाविद्यालय  ( ज्याचे नामकरण नंतर  मिलिंद महाविद्यालय  असे बाबासाहेबानीच केले होते.)     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी  बरेच ऐकले होते. ते एक महामानव, युगपुरुष, असल्याचे कळले. ( त्यावेळी त्यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले नव्हते.) अशा ह्या थोर पुरुषाला बघवे, दुरून का होईना दर्शन घ्यावे, ही मनांत तीव्र इच्छा होती. परंतु त्यांच्या दिव्य भव्य आणि  महानते पासून माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यापर्यंतचे  अंतर इतके प्रचंड होते, की त्यांचे केवळ दर्शन मिळणे, ही देखील एक अशक्य गोष्ट होती.  सिद्धार्थ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. कळले की त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मी त्यांना बघण्यासाठी त्या महाविद्यालयात गेलो. एक भव्य  सभागृह भरू लागले. दरवाजावर वा इतर जागी त्याच कॉलेजचे विद्यार्थी सर्व समुदायाला मार्गदर्शन करून योग्य त्या जागेवर बसण्यास मदत करीत होते. त्याच विद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि निमंत्रित यांनाच आत प्रवेश मिळत होता. माझ्याकडे न पास, न मी त्या कॉलेजचा विद्यर्थी. कार्यक्रम  बघण्यात मला तसा फारसा रस नव्हता.  फक्त बघायचे होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. हॉलच्याबाहेरून मी हेरु लागलो. कार्यक्रम हॉलच्या शेजारी एक मोठी खोली होती. तेथेच सोफ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसल्याचे कळले. परंतु स्वयंसेवकाच्या  गराड्यात तेथे जाणे शक्यच नव्हते. काय घडले कुणास माहित.  परंतु माझी आंतरिक ईच्छा इतकी प्रबळ झाली, की मी होऊ शकणाऱ्या भावी परिणामाचा विचार त्या क्षणी न करता, अतिशय  चपळतेने त्या खोलीत शिरलो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ह्यांच्या समोर अगदी जवळ गेलो. माझ्या पाठोपाठ दोन स्वयंसेवक  पटकन आत धावून आले. एक विचित्र परिस्थिती. एकाने मला रोखण्यासाठी हात पकडला. समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर  असल्यामुळे,  त्याने आपला संताप न दाखवता,  प्रेमाने पाठीवरून  हात फिरवला. व बाहेर जाण्यास सुचविले.     ( माझी त्यावेळी चांगलीच धुलाई झाली असती.)

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बघीतले. मी पटकन म्हंटले

” सर मी शासकीय  विद्यालयाचा विद्यार्थी असल्या कारणाने,  मला  आपल्या कार्यक्रमाला  प्रवेश दिला जात नाही. ”  बाबासाहेबानी क्षणभर मजकडे बघीतले. किंचितसे हास्य केले. ते स्वयंसेवकला म्हणाले  ” ह्याला कार्यक्रमाला  प्रवेश द्या. हा माझा  पाहुणा आहे.”  बस! त्यांचा  आशिर्वाद मिळताच वातावरण एकदम बदलल्याचे मला जाणवले.  मला विद्यार्थ्याच्या समूहामध्ये चांगली जागा मिळाली. संमेलनाचा आनंद काही वेगळाच होता. मी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळालेहेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणपरमपूज बाबासाहेबांचा…. त्या युग पुरुषाचा क्षणिक सहवास.  जीवनामधील सोनेरी क्षण  

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!

नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलेल्या, अश्या माणसांची. हवामान थंड समशीतोष्ण असून देखील तेथील लोकांना सामान्यपणे, वर्ण मिळाला तो काळा. नव्हे खूपच काळा. चेहऱ्यावर एक प्रकारे राकटपणा, तेलकट वा नितळ कातडी. केस जवळ जवळ  कुरुळे.   भारतीय स्त्रीला  लाभलेला  नाजूक गहूवर्ण वा गोरारंग त्यांच्या चेहरेपट्टीवर कधीच दिसणार नाही.अर्थात

त्यांचे ते स्वरूप त्यांच्या सौंदर्याच्या द्रीष्टीकोनानुसार  नजरेमध्ये कदाचित मोहक व सुंदर  ह्या  संकल्पनेत असेलही.

अशाच एका आफ्रिकन महिलेशी आलेला, न विसरणारा एक प्रसंग:-

आफ्रिकन सफरीच्या मार्गावर एका हस्तकला वस्तूच्या दुकानावर आम्ही थांबलो होतो. मी आणि सौ. तेथील  प्रदर्शनामधील अनेक हस्तकलेच्या वस्तू

बघत होतो. सौ.ला एक माळ खूपच आवडली. निरनिराळ्या प्राण्यांची  छोटी कोरीव कालाकृती माळेच्या मण्यामध्ये अतिशय सुरेख दिसत होती. त्या दुकानाची  प्रमुख एक आफ्रिकन महिला होती. तीने आदरपूर्वक तिच्या अनेक वस्तू आम्हाला दाखविल्या. ती आवडलेली माळ तीने दहा डॉलरला देऊ केली.  सौ. तिच्या पाकीटमधून पैसे काढीत असता, सौ.च्या हातातील काचेच्या  बांगड्यावर त्या महिलेची नजर गेली.  तिच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य दिसले. काचेच्या बांगड्या तिच्या पाहण्यात नव्हत्या. “ हे काय आहे ? व हे तुम्ही का घालता.? “  तिच्या चौकस प्रश्नात आश्चर्य वा कौतुक पण दिसून आले.  विशेष करुन जेंव्हा बांगड्या ह्या भारतीय महिलासाठी सौन्दर्य  सौभाग्याचे  लक्षण असते हे  समजल्यावर. अचानक तिने इच्छा  प्रदर्शीत् केली.  ”  तुम्ही बांगड्याचा एक जोड मला देऊ शकता? “  आम्हाला तिच्या उत्छुकतेची    गम्मत वाटाली. सौ.ने  क्षणाचाही विलब न लावता, हातातल्या दोन काचेच्या बांगड्या   तिला प्रेमाने दिल्या. तिनेही त्याचा स्वीकार ” थंक्स”  म्हणत केला, तिने आम्ही निवडलेली हस्तकलेची माळ  बांधुन दिली. ती म्हणाली ”  तुमच्या बांगड्याबद्दल आभारी. कृपा करुन ही मजकडून मित्रत्वाची सप्रेम भेट स्वीकारा. ”  आम्ही देखील हासत तिच्या प्रेमळ  भेट वस्तुचा ( Return gift चा ) स्वीकार केला.   प्रेमाच्या संस्कृतीचेही एक समीकरण असते. त्याच्या अनुशंगाने जे उत्पन्न होते, जो परिणाम होत असतो, तो निश्चितच सर्वत्र तसाच असतो. जगातील कोणत्याही देशात जा. कारण प्रेम आहे निसर्गाचा एक आविष्कार.

 

डॉ. भगवान नागापूरकर

भ्रमणध्वनी- ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

सोनेरी तसवीर !

सोनेरी तसवीर !

त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या       ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते.  भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके  मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती.  मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद  चिकटवलेला  होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या  लहानश्या  तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता.   वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन  ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले.  त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना  पेनिसिलीन  विषयी  प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान    कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या  पाऊलखुणा दाखवीत होता.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

आनंद लुटणारे मन !

आनंद लुटणारे मन !

 सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु  माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही  वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर  टिप्पणी करीत होत्या.  मान डोलावाने,  टाळ्या  वाजवणे, वाहवा ! म्हणत आपला आनंद व्यक्त करणे, चालू होते. “ काय गाण्याची चाल, किती सुंदर वाद्यसंगती जमली आहे, काय चांगली तान मारली आहे ह्यातील बासरी तर किती सुमधुर वाजवली, तबल्याचा ठेका कसा धरला आहे सतारीचे बोल किती मधुर जमलेत, पेटीवादन तर अप्रतिम साधले, शंकर जयकिशन याचं संगीत खूपच मनाला मोहून टाकते, नौशादअलीचे हे गाणे काय सुरेख  जमले —– एक नाही अनेक हालचालीच्या  पैलू  मधून त्या बाई आपले संगीतातले,  गाण्यामधले आत्मिक समाधान अभिव्यक्त करीत होत्या.  न जाणो मी मात्र त्यांच्या अतिउत्साहामुळे  निराशलो होतो.  कारण त्यांच्या सततच्या हालचालीमुळे माझे लक्ष विचलीत होत होते. संगीतातील मला मिळणाऱ्या आनंदात बाधा निर्माण होत होती. तरीही माझ्या मनाला आवर घालून सारे सहन करीत होतो.

कार्यक्रम संपला. सर्व श्रोते उठून जावू लागले. मी मात्र त्या बाईंच्या उत्साहाणे बेचैन झालो होतो.   शेवटच्या क्षणी  वैचारिक बांध फुटला. मी तिला विचारले. “ तुम्हाला संगीत कार्यक्रम खूपच आवडलेला दिसतो. परंतु  राग येणार नसेल तर सांगू का? तुमच्या सततच्या टिप्पणीमुळे  व हालचालीमुळे शेजारच्याना त्रास होतो का हे ध्यानात घेत चला. “   ती मागे वळून किंचित हसली. आभारी महाशय,  मी यापुढे काळजी घेईन. मी त्याक्षणी विसरले होते की  आपणामुळे  कुणाला त्रास होत असेल. “   ती शांत होती. मी उठून जाऊ लागलो. दाराजवळ गेल्यावर मी सहज मागे बघितले. मला जे दृश्य दिसले,  त्याने मला धक्काच बसला. तिच्याजवळ बसलेले दोघेजण तिला हाथ देवून उठवीत होते. त्यांच्या  खांद्याचा  आधार घेवून ती पाऊले टाकण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे दोन्ही पाय अपंग झाले असावे.  माझ्या डोळ्यात  एकदम अश्रू आले. माझ्या विचारांची मलाच लाज वाटली. तिचे शरीर अपंग होते, पण मन किती तजेले, उत्स्ताही  होते. जीवनात निर्माण झालेली जबदस्त उणीव ते भरून काढीत होते. मनाची उभारी, आनंदाची फवारणी करून, कोमेजून जाण्याऱ्या शरीर संपदेला टवटवीत ठेवण्याचा    प्रयत्न  करीत होती.  फुलवीत होती. ह्या जगात जगायचे कसे? ह्याचा एक आदर्शवत संदेश देत होती.   

 

डॉ. भगवान नागापूरकर