नामस्मरणाच्या खोलांत
जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे असो. त्यांत मानवी मर्यादा येतीलच. फक्त ईश्वरी तत्त्वच परिपूर्ण असते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही एक वैशिष्ठपूर्ण ईश्वरी निर्मिती असते. कोणतेही कार्य मग ते केवढेही महान असो. जर मानवी मर्यादांच्या क्षमतेमधील असेल तर ते कुणीही करु शकतो. ही नैसर्गिक देणगी आहे. फक्त दुर्भाग्याने हे तत्वज्ञान व्यक्ती समजत नाही. अंगीकारत नाही. तसा त्याचा प्रयत्न होत नसतो.
इतरांचे विचार, इतरांची समज ही तुमच्यासाठी फक्त ‘ मार्गदर्शक ‘ ह्या संकल्पनेंत असावी. एखाद्याचे त्या प्रांतातले यश देखील एक उदाहरण म्हणून असावे. मात्र हाच केवळ एकमेव सत्याचा मार्ग सर्वासाठी असू शकत नाही. जर प्रत्येकजण आपल्यापरी वैशिष्ठपुर्ण आहे, तर व्यक्तीने आपला मार्ग, ध्येय हे स्वतःच्या आत्म्याला साक्षी ठेवितच चेतवावे. कारण ते आन्तरीक सत्य, हेच फक्त त्याच्यासाठी एकमेव सत्य असेल. इतरांसाठी मार्ग दर्शनपर. कदाचित तो मार्ग आगदी त्याच पद्धतीने हाताळता येणे शक्यच नसते. त्यांत कोठेतरी कांहीतरी भिन्नता येणारच.
‘सदैव ईश्वरी नामस्मरण करावे’ हा संदेश माझ्या बुद्धीने, विचारांनी त्याला मान्यता दिली. कां कुणास ठाऊक माझा आत्मा मात्र शासंक होता. कुणाचे नामस्मरण ? कुणी त्याना बघीतले ? कुणी हे सत्य अनुभवले ? व जर हा अनुभव असेल तर हे फक्त त्याचे त्याच्यासाठीचे सत्य असेल. हे नैसर्गिक सत्य कसे असेल. हा एक मार्ग ठरु शकेल. पण पुन्हा तोच मार्ग चालणे केवळ अशक्य. उत्पन्न होणारे अनुभव देखील भिन्न असतील ना ?. जरी ध्येय ( Aim ) हे एकच असले तरी.
पुन्हा प्रश्न उत्पन्न होतो की कोणते ध्येय ? ईश्वर दर्शनाचे, अनुभवाचे, सान्तवनाचे, ईश्वरांत एकरुप होण्यांचे. खुप द्विधा मनस्थीती झाली. ईश्वराने, निसर्गाने मला त्याच्यापासून वेगळे काढले ते कशासाठी ? पुन्हा त्याच्यांतच मिसळण्यासाठी. एकरुपता तर होतीच की. मग भिन्नता कशासाठी निर्माण केली गेली. निसर्गाचे त्या जीवाचे चक्र पुर्ण करण्यासाठी. हेच ते प्रयोजन. मुल. ते आईच्या सान्नीध्यांत फार अल्प काळासाठी असते. पोटचा तो गोळा. आईचे एक अंग. तीच्याशी एक रुप झालेला. वाढत वाढत मातेच्या शरीरामधून वेगळे अस्तित्व निर्माण केले गेलेला. काळाच्या चक्रांत संपुर्ण वेगळा केलेले. आता तर त्याचे सर्व व्यवहार, दैनंदिन अस्तित्व भिन्न होऊन जाते. आपले जीवन स्वतंत्र व आपल्याच पद्धतीने ते जगते. सर्व जीवनाचा खेळ खेळून व्यक्ती बनुन शेवटी विश्रांतीसाठी त्याच ईश्वरी तत्वात विलीन होऊ इच्छीते. हेच त्याचे ध्येय असते. विश्रांति, पुन्हा खेळणे, अर्थांत आता खेळ वेगळा, वातावरण भिन्न. सारेच निराळे.
नामस्मरणाचा उद्देश कोणता ? लयबद्धता (वा मग्नता) आणि आठवण. त्या ईश्वराची आठवण काढीत एका लयबद्धतेमध्ये विलीन होणे. इष्ठ देवतेच्या सतत आठवणीत राहणे. परंतु खोलवर विचार केला तर हे दोन्ही साधणे आवघड नव्हे , अशक्य वाटते.
२
लयबद्धतेच्या प्रक्रियेंत सर्व सभोवताल, परिस्थिती, स्वतःचे देखील अस्तित्व हे संपूर्ण विसरुन जाण्याचा प्रयत्न असतो. नामस्मरण करीत करीत अशा स्थितीमध्ये जाणे जरुरी असते, जेंव्हा हेच नामस्मरण विसरुन जावे लागते. शब्द जावून विचार, भावना, यांची एक तंद्री लागावी लागते. पुढे तेही विसरुन जावे लागते. सारे कांही जेंव्हा गळून पडते, त्याच वेळी ईश्वरी तत्वांत, अनुभवांत, नितांत आनंदात व्यक्ती पदार्पण करते. मग त्याला सारे विसरावे लागते. सर्वस्व विसरणे हा क्षण सर्व कांही मिळवणे ह्यासाठी ठरतो.
मी शांत बसलो होतो. नामस्मरणाचा प्रयोग चालला होता. एकाग्र होऊन इष्ठ देवतेचे चिंतन करीत होते. नामस्मरण चालू होते. अचानक ते एका मग्नतेत सुटले. तसा मला कविता करण्याचा छंद आहे. कवितेचे शब्द उत्पन्न होण्यासाठी भावनेचा कढ भरुन यावा लागतो. त्याच भवना मग शब्दरुप धारण करतात. कवितेचा जन्म होतो. मी माझ्याच विचारांत बराच वेळ गुरफटून गेलो होतो. भावना, विचार, आणि शब्द यांच्या द्वंद्वांत मग्न झालो होतो. एक काव्य बाहेर पडले. जे मला अत्यानंद देत होते. समाधान देत होते. मनाची शांती खऱ्या अर्थाने लाभली होती. हेच तर मला ईश्वरी दर्शन वाटले. कारण जर ईश्वर कसा व कशांत आहे हे निश्चीत नसेल, तर मग तो मला माझ्याच आन्तरीक विचारांत, भावनेंत, शब्दांत मिळाला असे मी समजतो. ते मिळण्याचा प्रांत कोणताही असेल. पण जर शेवट अत्यानंदांत, समाधानांत, असेल तर ह्यालाच ईश्वरी अनुभवाचे दर्शन समजतो.
नामस्मरण अतिशय चांगले व योग्य. महान व्यक्तीनी सांगितलेला मार्ग. एकदम पटणारा. परंतु अनुभव असा की ती ध्येयाकडे, पुढे घेऊन जाणारी एक पायरी असते. दुर्दैवाने असेही दिसते की व्यक्ती त्याच पायरीवर सतत घुटमळतच राहतो. एखादा घान्याच्या बैलाप्रमाणे. फक्त चकरा मारणारा. कोणताही दुरचा प्रवास न करणारा. जसे पुजाकर्म, आन्हीके इत्यादी. असतात. जे प्रथम पायरी प्रमाणे असतात. त्यांचाच आधार घेऊन पुढे लांब छलांग मारावी लागते. ईश्वरी तत्वांचा शोध घ्यावा लागतो. परंतु हे सहसा होत नाही. व्यक्ती त्याच पायरीवर, त्याच वातावरणात घुटमळत राहतो. अचानक कांही चमत्कार घडेल, वेगळाच मार्ग मिळेल, ईश्वरी अनुभव येईल, ह्या रम्य विचारांत रममान होतो.
अशाने हाती कांहीच लागत नाही. तो मात्र कर्मकांडी, व फक्त नामस्मरण घेणारा असाच राहतो. एकदम अपूर्ण. फक्त अंधश्रद्धावान. जर मार्ग दाखविला गेला तर चालताना मात्र स्वतःत्या आत्म्याला जागृत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण योग्य परंतु लयबद्धतेमधूनच ते विसरावे लागते. अर्थात हे विसरणे दुसऱ्या महान तत्वासाठी. हे विसरणे जाणून, समजून,नसावे. सहज असावे. चिंतनांत, घ्यानधारणेत, समाधी अवस्थेत जाण्यासाठी असावे. एका दालनात शिरलो. तेंव्हा पहीले दालन अपोआप सुटून गेले. त्याची आता त्या क्षणाला आठवण देखील नसावी. न नाम, न नामस्मरण, ना कोणती आठवण, ना कोणता विचार. नामस्मरणाला पर्याय असावा लय, एकाग्रता. आणि ती देखील विसरावयास हवी. आपोआप, सहजपणे. कशासाठी – तर त्याचे उत्तर नाही. तेथे असेल फक्त नितांत आनंद ( Ecstasy Of Joy ), समाधान, शांतता – – –
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com